

Satara LCB Appointment: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) निरीक्षक अरुण देवकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर एलसीबीचा नवा कारभारी आपलाच हवा, यासाठी भाजपच्या जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. साताऱ्याच्या एलसीबी निरीक्षकाच्या नियुक्तीचा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने पोलिस अधीक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे एलसीबीचा नवा कारभारी कोण? याची उत्सुकता आहे.
एलसीबीचे निरीक्षकपद हे जिल्हा पोलिस दलातील महत्त्वाचे पद आहे. जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याचे काम या विभागाकडून होते. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाच्या कामाची गुणवत्ता या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. जिल्ह्यातील अवैध धंदे असो किंवा अन्य कोणतीही अडचण असल्यास या विभागाला कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत हस्तक्षेप करता येतो. त्यामुळे पहिल्यापासून एलसीबीचा निरीक्षक म्हणून बसण्यासाठी पोलिस दलात चुरस असते. त्यातही हा विभाग चांगल्या पद्धतीने हाताळता येईल, अशी गुणवत्ता पाहूनच अधिकाऱ्याची निवड केली जाते.
मात्र, हा अधिकारी आपल्या हातात असेल, तर जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कायद्याच्या पळवाटांचा आधार घेत विरोधकांना नामोहरम करता येईल, याची जाणीवही राजकीय नेतृत्वाला झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पोलिस दलातील कामाबरोबरच नेत्यांची मर्जी सांभाळण्यात पटाईत असणे, हा गुणही या पदासाठीच्या निरीक्षकासाठी महत्त्वाचा ठरत आहे. यासाठी मातब्बर नेत्यांकडून नावे सुचवायला सुरवात झाली. त्यातून नेत्यांच्या मनाप्रमाणे कसे काम होते, हे जिल्ह्याने काही घटनांमध्ये अनुभवले आहे.
एलसीबीचे निरीक्षक अरुण देवकर यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या पदावर आपल्या मर्जीतला किंवा आपण सुचवलेलाच अधिकारी बसावा, यासाठी नेत्यांनी फील्डिंग लावण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. त्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवण्याचे काम सुरू आहे. ही रस्सीखेच भाजपच्याच दोन बड्या नेत्यांमध्ये सुरू आहे. ते नेते म्हणजे एक पूर्वेकडील आणि दुसरे पश्चिमेकडील आहेत. त्यामुळे कोणाची वर्णी लावायची, याबाबत निर्णय घेणे अधीक्षकांसाठी अडचणीचे झाले होते.
त्यात विशेष पोलिस महानिरीक्षकांचाही निर्णय महत्त्वाचा असतो. त्यामुळे एका नेत्याने त्यांच्यामार्फत फील्डिंग लावली, तर दुसऱ्या मंत्र्याने आपलाच माणूस पाहिजे, यासाठी थेट मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनाच फोन केल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित नेत्याचे पारडे जड होऊन अधीक्षकांनी सध्या तरी त्याच्या मर्जीनुसार पदभार देण्यास पसंती दिल्याचे दिसत आहे; परंतु त्याने दुसरा नेता नाराज झाला आहे. त्याने वरिष्ठांकडून हा निर्णय कायम होऊ नये, यासाठी फील्डिंग सुरू केली आहे.
एलसीबीचा कारभारी होण्यासाठी जिल्ह्यातील पुसेगाव व तालुका पोलिस ठाण्याचा कारभार सांभाळणारे विश्वजित घोडके व सध्या जिल्हा विशेष शाखेत असलेले राजकुमार भुजबळ यांच्यामध्ये चुरस सुरू आहे. घोडकेंसाठी मुख्यालयाच्या ठिकाणचा नेता आग्रही आहे, तर भुजबळांसाठी पूर्व भागातील नेता आग्रही आहे. त्यामध्ये कोणाची सरशी होणार, हे लवकरच समजेल.
खरंतर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या नेत्यांवर जिल्ह्यातील प्रशासन व कायदा, सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असते. 'पालकमंत्री बोले, दल हले' अशीच स्थिती सर्वत्र असते. ‘एलसीबी’सारख्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सांभाळण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या निरीक्षक नियुक्ती प्रक्रियेत पालकमंत्र्यांचे मतही विचारात घेतले जाते; परंतु एवढ्या घडामोडी घडत असताना पालकमंत्री कुठे आहेत? असा प्रश्न पोलिस दलाशी संबंधितांमध्ये विचारला जाऊ लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.