
Loksabha Election 2024 : सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील चिंचणी येथील असलेले संजय रामचंद्र पाटील (काका) हे तासगावचे माजी आमदार कै. दिनकरआबा पाटील यांचे पुतणे आहेत. दिनकरआबा यांना गुरू मानून त्यांनी राजकारणास सुरुवात केली. त्यांनी राजकीय जीवनाची सुरवात सांगली नगरपालिकेत नगरसेवक पदापासून झाली. त्यानंतर काही वर्षांतच त्यांना उपनगराध्यक्षपद मिळाले होते, त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर ते जिल्हा परिषद सदस्य झाले. कै. आर. आर. पाटील (आबा) यांच्या विरोधात त्यांनी दोनदा आमदारकी लढवली, पण त्यांना यश मिळाले नाही.
त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक लढवली. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा दोन लाख 38 हजार मतांनी पराभव करीत लोकसभेत प्रवेश केला. 2019 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली. यामध्ये त्यांनी काँग्रेसचे नेते विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला व दुसऱ्यांदा खासदार झाले. आता 2024 साठी ते इच्छुक असले तरी पक्षांतर्गत नेत्यांनी तीव्र विरोध केल्यास खासदार पाटील यांची उमेदवारी संकटात सापडू शकते.
संजय रामचंद्र पाटील (संजयकाका)
4 जानेवारी 1965
10 वी उत्तीर्ण
तासगावचे माजी आमदार कै. दिनकरआबा पाटील यांचे बालपणापासूनच खासदार संजय पाटील यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील पोलिस उपअधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पत्नी ज्योती, मुलगा प्रभाकर आणि एक मुलगी असा परिवार आहे.
शेती
सांगली
भारतीय जनता पक्ष
1982 मध्ये खासदार पाटील यांनी सांगली नगरपालिकेसाठी नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली. त्यामध्ये ते विजयी झाले होते. 1996 मध्ये चिंचणी गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली. तेथेही त्यांनी बाजी मारली. 1999 मध्ये तासगाव विधानसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री कै. आर. आर. पाटील यांचा विरोधात निवडणूक लढविली. मात्र तेथे त्यांना पराभव सहन करावा लागला. 2004 मध्ये पुन्हा आर. आर. पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. अवघ्या साडेतीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 2014 मध्ये पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढणारे काँग्रेस नेते विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला. खासदार पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदही भूषवले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव, जत हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. वसंतदादा पाटील, डॉ. शालिनीताई पाटील, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 1962 ते 2009 पर्यंत
पाटलांच्या घराणेशाहीच्या माध्यमातून काँग्रेसचे वर्चस्व राहिले. आता लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्याने राजकीय पक्षांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. सांगलीचे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी लोकसभेत हॅट्रिक करण्याचा चंग बांधला आहे. मात्र, मागील साडेनऊ वर्षांत खासदारांकडून पक्षासाठी कोणतेही योगदान मिळत नसल्याचा आरोप पक्षातील नेत्यांनीच केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांशीही खासदार पाटील यांची जवळीक असल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागला आहे. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही जिल्हाभर जनसंपर्क वाढवून लोकसभेसाठी शड्डू ठोकण्याची तयारी दर्शवल्याने खासदार पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्ष खासदार पाटील यांच्यावरच विश्वास दाखवणार का, हे पाहावे लागेल.
मूळचे तासगाव तालुक्यातील चिंचणीचे असलेले संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) हे सांगलीमध्ये राहत होते. त्यावेळी त्यांना सामाजिक कार्यात आवड निर्माण झाली. लोकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला. लोकाग्रहास्तव सांगली नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. 1996 मध्ये जिल्हा परिषद सभागृहात गेल्यानंतर दुष्काळाचा सामना करणाऱ्या तासगाव तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडली. 1999 पासून त्यांनी तालुक्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर सरकार विरोधात जोरदार आंदोलने केली. पाणी आणि चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्यातील बैलगाड्या एकत्र करून बैलगाडीसह मोर्चा काढून राज्याचे लक्ष वेधले होते. पाण्यासाठी जोरदार लढा देत माजी उपमुख्यमंत्री कै. आर. आर. पाटील यांना अनेकवेळा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार असलेले संजय पाटील यांनी कार्यकाल संपताच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपला आक्रमक चेहरा आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना टक्कर देणारे नेते म्हणून संजयकाका यांची ओळख असल्याने 2019 मध्ये सांगली लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे नेते व तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी जोरदार प्रचार करीत निवडणूक जिंकली. पाटील यांना सहा लाख 11 हजार मते मिळाली तर प्रतीक पाटील यांना तीन लाख 72 हजार मते मिळाली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2019 च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार संजय पाटील यांना पक्षांतर्गत जोरदार विरोध झाला. त्यांच्या उमेदवारीवर माजी आमदारांनी आक्षेप घेतल्याने उमेदवारीवरुन धुमशान झाले. खासदार पाटील यांना जिल्ह्यातील नेत्यांचा विरोध असतानाही भाजपच्या श्रेष्ठींनी खासदार पाटील यांच्यावर विश्वास दाखवत दुसऱ्यांदा लोकसभेचे तिकीट दिले. पक्षांतर वाद मिटवण्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यश आले. भाजपच्या नेत्यांना खासदार पाटील यांचेच काम करण्याचा सूचना दिल्या. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षाचे आदेश मानत खासदार पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. 2019 मध्ये काँग्रेसने जागा सोडत आघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगलीची जागा दिली. या जागेवर काँग्रेसचे नेते असलेले व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी निवडणूक लढविली, तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपचे संजयकाकांना 5 लाख 21 हजार 601 स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांना 3 लाख 40 हजार 871 तर बहुजन वंचित पडळकर यांना 2 लाख 96 हजार 979 इतकी मते मिळाली.
खासदार संजय पाटील आणि भाजपमधील नेत्यांमध्ये मतभेद होते. खासदार संजयकाका आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात अनेक कारणांवरुन सातत्याने वाद उफाळून येतात. खासदार गटाकडून सुरू पक्षविरोधी कारवाया आहेत, पक्षात राहून सोयीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप अनेकवेळा त्यांच्यावर झाला. माजी आमदार विलासराव जगताप आणि संजयकाका यांच्यातही मतभेद आहेत. भाजपमधील एका गटाने खासदार पाटील यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे खासदार पाटील यांची कोंडी झाली होती.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी खासदार पाटील यांची छुपी युती असल्याचा आरोप नेत्यांनी केला होता, याशिवाय काँग्रेसच्या काही नेत्यांचीही त्यांचे सख्खे होते. त्यामुळे पक्षात नाराजी वाढली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले सख्य असल्याने 2019 ची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी त्यांनी जोरदार फील्डिंग लावली. फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे 2019 मध्ये खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी मिळाली. जिल्हाध्यक्ष देशमुख व माजी आमदार जगताप यांची फडणवीस यांनी समजूत काढली. त्यामुळे दोन्ही नाराज नेत्यांनी खासदार पाटील यांचेच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. भाजपमधील वाद शामल्याने खासदार पाटील यांनी दुसऱ्यांदा लोकसभेत प्रवेश केला.
खासदार पाटील यांना बालपणापासून राजकीय धडे मिळाले. माजी आमदार कै. दिनकर पाटील हे आमदार असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. तेव्हापासूनच पाटील यांनी लोकांशी जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. सांगली शहर असो अथवा तासगाव तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार पाटील यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले. पाटील हे आक्रमक चेहरा म्हणून परिचित असल्याने लोकांमध्ये त्यांची क्रेझ निर्माण झाली. अनेक प्रश्न घेऊन नागरिक पाटील यांच्याकडे येऊ लागले. शासकीय अधिकाऱ्यांमध्येही पाटील त्यांचा दबदबा होता. जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही ते कार्यकर्त्यांना थेट नावासह ओळखतात.
खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये सोशल मीडियाचा विशेष वापर त्यांच्याकडून झाला नाही. 2019 मध्ये पुन्हा निवडून गेल्यानंतर प्रसिद्धीबाबत सोशल मीडियाचाही वापर करण्यास त्यांनी सुरुवात केली. फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक ग्रुप खासदार पाटील यांनी तयार केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
खासदार संजय पाटील हे सांगली जिल्ह्यातील आक्रमक नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी त्यांचे राजकीय वैर आहे. पाटील यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यावरून अनेक वेळा देशमुखांना आव्हान दिले. खानापूर-आटपाडीचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्याशी खासदार पाटील यांचे तीव्र मतभेद आहेत. नागेवाडी येथील यशवंत साखर कारखान्यावरून बघून घेण्याचे आव्हान खासदारांनी दिले होते. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी खासदार पाटील यांचे जमत नाही. जतमध्ये काँग्रेसचे आमदार व जिल्हाध्यक्ष विक्रम सिंह सावंत यांच्याशी अनेक वेळा खासदारांनी घरोबा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जगताप नाराज आहेत. जगताप यांनी वरिष्ठ नेत्यांकडे ही तक्रार केली असल्याने खासदारांनी दम असेल तर मला विचारा, असा प्रतिसवालही जगताप यांना अनेक वेळा केला आहे.
माजी आमदार कै. दिनकरआबा पाटील
लोकसभेत निवडून गेल्यानंतर मागील साडेनऊ वर्षांमध्ये खासदार पाटील यांनी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जनसंपर्क वाढवला आहे. स्वतःचा मोठा गट नसला तरी त्यांच्याकडे जे कार्यकर्ते आहेत, ते कट्टर आहेत. सांगली मतदारसंघात भाजपने नियोजनबद्ध मांडणी सुरू केली आहे. खासदार संजय पाटील पक्षातील नेत्यांशी साडेचार वर्षे संघर्ष करीत आहेत. मात्र शेवटच्या चार-सहा महिन्यांत सगळे पंक्चर्स काढण्याची कला त्यांना अवगत आहे. आधी आमदार गोपीचंद पडळकरांशी जुळवून घेतले. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि आमदार सुधीर गाडगीळ हे भाजपचे कट्टर नेते आहेत, त्यामुळे त्यांची बेरीजच गृहीत धरली जाते. उरला विषय विलासराव जगताप यांचा, जतमध्ये दुसऱ्या फळीत खासदार पाटील यांनी संपर्क वाढवत नवी मांडणी केली आहे.
टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनांच्या विस्तारीकरणाला मान्यता, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे हे भाजपसाठी प्रमुख स्थानिक मुद्दे असतील. लटकलेले ड्रायपोर्ट, कवलापूर विमानतळ, औद्योगिक विस्तारीकरणाला बसलेली खीळ आदी मुद्द्यांवर विरोधक रान उठवतील, अशी शक्यता आहे. याशिवाय पक्षांतर्गत नेत्यांमध्ये खासदार पाटील यांचे वाद आहेत. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी खासदार पाटील याला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्हाभर संपर्क वाढवून लोकसभेसाठी तयार असल्याचे संकेत ते देत आहेत. त्यामुळे देशमुख आणि माजी आमदार विलासराव जगताप हे कोणती भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
सध्या खासदार पाटील यांनाच उमेदवारी मिळेल, असे चित्र आहे. मात्र पक्षांतर्गत नेत्यांनी तीव्र विरोध केल्यास खासदार पाटील यांचा पत्ता कट होऊ शकतो. खासदार पाटील यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची जवळीक निर्माण केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही वेळोवेळी गुप्त भेट घेऊन राजकीय चर्चा करीत असतात. त्यामुळे खासदार पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये समझोता असल्याची चर्चाही वेळोवेळी होते. याशिवाय काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याशीही जुळवून घेण्याचा प्रयत्न खासदार पाटील करतात. पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या माध्यमातून भाजप विरोधात महाविकास आघाडीकडूनही मैदानात शड्डू ठोकला, तर आश्चर्य वाटणार नाही.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.