
Solapur, 18 May : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत आणखी सात ते आठ जण अडकल्याची भीती आहे. यामध्ये कारखान्याच्या मालकासह कुटुंबीयांचा समावेश असल्याची माहिती आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारखान्यात सर्व सूत असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली असून ती आटोक्यात येण्याठी आणखी दोन ते तीन तास लागू शकतात, असे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे यांनी सांगितले.
मेहताब सय्यद बागवान, हिना मेहताब बागवान आणि सलमान मेहताब बागवान अशी मृतांची नावे आहेत. या आगीत (Fire) कारखान्याचे मालक हाजी उस्मान मन्सुरी आणि त्यांचा मुलगा अनस मन्सुरी हे कुटुंबासोबत कारखान्याच्या आतमध्ये अडकले आहेत. आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि एनटीपीसीचे कर्मचारी जीव धोक्यात घालून बचाव कार्य राबवत आहेत.
अक्कलकोट रोड (Akkalkot Raod) एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान आग लागली असण्याची शक्यता आहे. कारण अग्निशमन दलाला पहाटे ४.१० ते सव्वाचारच्या सुमारास सेंट्रल टेक्सटाईलला आग लागल्याचा १०१ नंबरला फोन आला होता.
अग्निश्यामक दलाचे केंद्र एमआयाडीसी परिसरात असल्याने तत्काळ एक वाहन घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने शहरातील सर्व केंद्रातील अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सीडीचा वापर करून तिघांना बाहेर काढले आहे. त्यात दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे, असेही साळुंखे यांनी सांगितले.
तिघांनाही छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले आहे. आगीची तीव्रता लक्षात घेऊन पंढरपूर, अक्कलकोट, चिंचोली एमआयडीसी आणि एनटीपीसीचे अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले आहे. त्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणखी दोन ते तीन तास आग आटोक्यात आणण्यासाठी लागू शकतात, असेही साळुंखे यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, सेंट्रल टेक्सटाईलचे मालक हाजी उस्मान मन्सुरी, त्यांचा मुलगा अनस मन्सुरी हे कुटुंबीयांसमेवत तसेच काही कामगार असे सात ते आठ जण आगीत अडकल्याची भीती आहे. आगीच्या तीव्रता लक्षात घेता मृतांचे प्रमाण वाढू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. आडम मास्तर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आगीची माहिती देण्याचा प्रयत्न केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.