
Solapur, 25 March : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्याच भाषणात बोलताना ‘मी कुणाच्या नादाला लागत नाही. पण, सावज टप्प्यात आल्यावर सोडत नाही. आता सावज टप्प्यात आलेले आहे,’ असा सूचक इशाराही दिला होता. हा सूचक इशारा नेमका कोणाला होता? माळशिरमध्ये कार्यक्रम होत असल्याने तो मोहिते पाटलांसाठी होता की गोरेंचे साताऱ्यातील कट्टर विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी होता, असा सवाल उपस्थित होत आहे.
जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या हस्ते पिलिव येथे भाजपचे शाखेचे उद्घाटन आणि सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते हे प्रमुख उपस्थित होते. त्याच कार्यक्रमात बोलताना आता सावज टप्प्यात आलं आहे, असे विधान केल्याने ते कोणासंदर्भात होते, याची जिल्ह्यात कुजबूज सुरू आहे.
ग्रामविकास मंत्री गोरे आणि फलटणचे रामराजे (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या विळ्या भोपळ्याचे वितुष्ट संपूर्ण राज्याला माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत रामराजेंच्या गटाचा उमेदवाराचा पराभव झाला असून त्यांनतर श्रीराम सहकारी साखर कारखान्याला स्थगिती दिल्याने फलटणच्या राजकारणात रामराजे गट बॅकफूटवर गेलेला आहे. त्याचा संदर्भ गोरे यांच्या बोलण्याला होता का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मला संपवायला निघालेले स्वतःच संपले, असेही विधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यंतरी सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केले होते, त्यामुळे गोरेंचे नेमके सावज कोण आणि कोणते सावज टप्प्यात आले आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गोरे यांचा कार्यक्रम माळशिरस तालुक्यातील पिलिव येथे झाला, त्यामुळे गोरे यांच्या बोलण्याला माळशिरच्या राजकारणचा पदर होता का, याचीही चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपपासून फारकत घेतली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माझ्याविरेाधात काम केले, असा आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केला होता. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी सातपुते यांनी लावून धरली आहे. त्यानुसार मोहिते पाटील यांना भाजपने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे, त्यामुळे गोरे नेमके कोणाला उद्देशून बोलले, याची चर्चा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात रंगली आहे.
जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले होते?
आत्तापर्यंत मी चार निवडणुका लढवलेल्या आहेत. पण एकही निवडणूक अशी नाही की, माझ्यावर केस झालेली नाही. मी स्वतःहून कुणाच्याही नादाला लागत नाही. पण सावज टप्प्यात आल्यावर सोडतही नाही. आता सावज टप्प्यात आलेले आहे, असे सूचक विधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.