

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये रविवार (दि. ११) गोदावरी नदीच्या किनारी भाजी बाजार पटांगणावर सभा झाली. या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल करत त्यांना प्रत्युत्तर दिलं.
फडणवीसांनी प्रभू श्रीरामांचे नाव घेत भाषणाला सुरुवात केली. फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये आल्यानंतर मी सर्वात आधी प्रभू श्रीरामांना नमन करतो...वंदन करतो. रामाय राम, भद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथायं..सीताय पतेल महा..अशा प्रभू श्री रामाच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो.
मी प्रभू श्रीरामचंद्रांना वंदन करतोय पण काल परवा दोन भाऊ येऊन गेले. नाशिकमध्ये आले पण रामाची आठवणच झाली नाही. नाशिकमध्ये येऊन ज्यांनी राम मांडला नाही. आता त्यांच्यामध्ये राम उरला नाही. आणि जो राम का नही वो किसी काम का नही असं म्हणत त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे व शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंवर तोफ डागली.
फडणवीस पुढे म्हणाले, अलिकडच्या काळात काही लोकं म्हणायला लागले देव खरंच आहेत की नाही. असा प्रश्न काही लोकांना पडायला लागला. देवाची खिल्ली काही लोक या ठिकाणी उडवायला लागले. पण जाऊ द्या. त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणार नाही. मी एवढच सांगू इच्छितो की या नाशिक शहरामध्ये खऱ्या अर्थाने जो काही विकास झाला आणि जो काही विकास यापुढे होणार आहे तो करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती भारतीय जनता पार्टीमध्येच आहे.
माझी खिल्ली उडवली गेली. म्हणाले, नाशिक दत्तक घेतलं होतं. त्यांच काय झालं. खऱ्या अर्थाने हो..मी सांगितलं होतं की, मी नाशिक दत्तक घेतोय. मात्र, २०२७ साली मी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली आणि लगेच २०१९ साली विरोधी पक्षाचा नेता झालो. दोनच वर्ष मला मिळाले. पण मी त्यानंतरही तक्रार केली नाही. कारण तक्रार करणारे लोकं आम्ही नाही आहोत. विरोधी पक्ष नेता म्हणून देखील जेव्हा कोव्हीडचा काळ होता तेव्हा हे उबाठाचे, मनसेचे , कॉंग्रेसचे , राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते. त्यावेळी या नाशिकमध्ये हा देवाभाऊ आला होता आणि या ठिकाणच्या प्रत्येक कोव्हीड केअर सेंटर आणि आयसीयूपर्यंत जाणारा हा देवा भाऊ होता. पण मला तुम्हाला विचारायचंय तुम्ही किती वेळा नाशिकला आले ? मी तर वर्षातून चारवेळा नाशिकला येतो. पण तुम्ही किती वेळा नाशिकला आले असा सवाल फडणवीसांनी ठाकरे बंधूंना केला.
निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणूका झाल्या की नाशिकला विसरायचं अशा पद्धतीने हे निवडणूक पर्यटक आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोकं आहेत. आजही तुम्हाला मी सांगतो नाशिकशी माझं नातं तेच आहे. कालही होतं आजही आहे आणि उद्याही राहील. या नाशिकची जबाबदारी आम्ही घेतली आहे.
नाशिककरांनी तुम्हालाही सत्ता दिली होती. त्यावेळी तुम्ही काहीच केलं नाही. मी आजही सांगतो ज्यावेळी कुंभमेळ्याची वेळ आली तेव्हा यांनी हात वर केले. काही करता येणार नाही म्हणून सांगितल. आमच्याकडे वेळ कमी होता. पण गिरीश भाऊ आणि आम्ही २०१५ च्या कुंभमेळ्यामध्ये यांनी सांगितलं. महापालिका एक पैसाही देणार नाही. म्हटलं काही हरकत नाही. सगळा पैसा राज्य सरकारच्या वतीने देईन. सगळा पैसा त्याहीवेळेला राज्य सरकारच्या वतीने दिला आणि कुंभमेळा निर्विघ्न पार पडला.
राज ठाकरेंना हाणला टोला
कुंभमेळ्याची देखील खिल्ली उडवणारी ही लोकं आहेत. गंगेचं पाणी पिणार नाही म्हणून सांगतात आणि गोदातीरी येऊन याठिकाणी भाषणं करतात. अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे काम करणारे हे लोकं आहेत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.