
Nashik, 11 January : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी मला भुजबळ यांच्यावर बोलू नका, असा आदेश देण्यात आलेला आहे, त्यामुळे भुजबळ यांच्याबाबत विषय माझ्या दृष्टीने संपला आहे, अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांनी केली.
राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्याला अजितदादा किंवा पक्षातील इतर कोणीही प्रत्युत्तर दिले नव्हते. मात्र, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पहिल्या दिवसापासून भुजबळांच्या विरोधात तलवार उपसली होती.
भुजबळांच्या प्रत्येक विधानाची माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याकडून चिरफाड करण्यात येत होती. त्याला भुजबळ व त्यांच्या समर्थकांकडून उत्तर देण्यात येत होते. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद नको म्हणून पक्षश्रेष्ठींनी कोकाटे यांना भुजबळ यांच्यावर न बोलण्याचा आदेश दिला आहे, त्यानुसार कोकाटे यांनी भुजबळ हा विषय आमच्यासाठी संपला आहे, असे म्हटले आहे.
कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कलगीतुरा नको; म्हणून भुजबळ यांच्यावर बोलू नये, त्यांच्यावर भाष्य करू नये, असा आदेश मला पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेला आहे, त्यामुळे यापुढे मी त्यांच्यावर बोलणार नाही. माझ्या दृष्टीने तो विषय संपला आहे.
अजित पवार यांनी कर्जमाफीच्या विषयावर केलेल्या विधानावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले, राज्याच्या आर्थिक धोरणाबाबत मुख्यमंत्री, अर्थमंत्री निर्णय घेतात माझ्या अखत्यारीतला तो विषय नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता कर्जमाफी हवी आहे. पण, त्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. काही शेतकरी थकीत, तर काही कर्ज भरणारे आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्यांची पंचाईत होते. त्याबाबत कॅबिनेटमध्ये साधकबाधक चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय होईल.
कृषि विभागातील अधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणात अनास्था आहे. काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आहे. अनेक विभाग कृषीमध्ये काम करतात. शेतकऱ्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोचवायला पाहिजे. किती लाभार्थी झाले आहेत, इतर किती शेतकरी इच्छूक आहेत.अहवाल जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत बोलता येणार नाही. पण, केंद्र सरकारशी समन्वय ठेवावा लागेल, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.
पिक विमा योजनेत द्राक्ष बागेच्या नुकसानीचा समावेश व्हावा, अशी आमची मागणी आहे. पाऊस आल्यावर लगेच क्रॅक जात नाहीत. मी नुकसानीचा अहवाल मागितला आहे. अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करण्यात येईल, असेही कोकाटे यांनी सांगितले.
संतोष देशमुख खूनप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे, तो राजकीय विषय आहे. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत, असे सांगून कोकाटे यांनी या विषयावर जादा बोलणे टाळले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या संजय राऊत यांच्या घोषणेवर कोकाटे म्हणाले की, तो ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रश्न आहे. उघडे लढावे की कपडे घालून लढावे, तो त्यांचा प्रश्न आहे. अंडरपॅन्टवर लढावे की लंगोट लावून लढावे, हा त्यांचा प्रश्न, असे सांगून कोकाटेंनी राऊतांच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.