Dhule News : धुळे मतदारसंघात बंडखोरांनी काँग्रेसला ( Congress ) घाम फोडला आहे. त्यामुळे पक्षाचे उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारात अडथळे येत होते. पण, काँग्रेसमधील बंडखोरी रोखण्यासाठी पक्षाच्या अनेक नेत्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येऊ लागले आहे.
काँग्रेसने धुळे मतदारसंघात माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव ( shobha bacchav ) यांना उमेदवारी जाहीर केली. येथील धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर ( Shyam Saner ) आणि नाशिकचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे इच्छुक उमेदवार होते. डॉ. बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर दोन्ही जिल्हाध्यक्षांनी राजीनामे देत बंडखोरीचे संकेत दिले होते. ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना अथक प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. या पार्श्वभूमीवर पक्षाला गुरुवारी ( 25 एप्रिल ) गुड न्यूज मिळाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी सनेर यांच्याशी चर्चा करून बंडखोरी थांबवण्याची विनंती केली होती. मात्र त्याला यश आले नव्हते. गुरुवारी सनेर यांनी पक्षाच्या निवडणुकीच्या बैठकीत सहभागी होऊन कार्यकर्त्यांना धक्का दिला. पक्षाचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपण काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे धुळ्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात आता प्रचाराला गती येऊ शकेल.
दुसरीकडे मालेगाव शहरात अखिल भारतीय पर्सनल बोर्डाचे सर्वात तरुण सदस्य आणि मुस्लिम समाजातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असलेले मौलाना उमरेन यांनी उमेदवारी दाखल करावा यासाठी दबाव होता. उमरेन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असता तर मालेगाव शहरातील चार लाख अल्पसंख्याकांची मते तसेच धुळे शहरातील अल्पसंख्याक समाजावर त्याचा मोठा परिणाम झाला असता. उमरेन हे बिगर राजकीय कार्यकर्ते आहेत. अत्यंत अभ्यासू म्हणून देशभर ते परिचित आहेत. सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. त्यामुळे त्यांचा मुस्लिम समाजावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्याने हादेखील काँग्रेसला मोठा दिलासाच आहे. त्याचा थेट लाभ काँग्रेस पक्षाला होणार आहे.
धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला पक्षांतर्गत विसंवादाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अद्याप प्रचाराला गती आलेली नाही. मालेगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते माजी आमदार असिफ शेख यांच्यासह शहरातील प्रमुख मुस्लिम नेते अद्याप काँग्रेसच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. त्यांना प्रचारात सक्रिय करणे हे एक मोठे आव्हान आहे. या आव्हानावर पक्षाचे नेते आणि उमेदवार कशी मात करतात हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. काँग्रेसला प्रचार गतिमान करावयाचा असल्यास या समस्यांवर त्यांना तोडगा काढावा लागेल. काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( Edited By : Akshay Sabale )
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.