

Malegaon Shetki Sangh : मालेगाव येथील शेतकरी सहकारी संघाच्या (शेतकी संघ) पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्व १५ जागांवर दणदणीत विजय मिळवत संघावरील हिरे घराण्याचे तब्बल ६० वर्षाचे वर्चस्व संपुष्टात आणले. या निकालामुळे संघाच्या राजकारणात सत्ता परिवर्तन घडले असून हिरे घरण्याला धक्का बसला आहे. तर भुसे गटाने प्रथमच संघावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवत सर्व १५ जागा जिंकल्या. शेतकी संघाच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला असून मंत्री भुसे यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. युवा नेते अद्वय हिरे समर्थित पॅनलचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. या निकालामुळे संघावरील हिरे कुटुंबीयांची ६० वर्षांची सत्ता हातातून निसटली.
मागील दोन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर यंदा तब्बल ११ वर्षानी प्रत्यक्ष निवडणूक झाली. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व १५ जागांवर उमेदवार उभे केले होते. तर भाजप नते अद्वय हिरे यांच्या जनशक्ती पॅनलकडून 9 जागांवर उमेदवार रिंगणात होते.
संघाच्या एकुण १५ जागांसाठी रविवारी (दि. २१) रोजी मतदान पार पडले. सोमवारी (दि. २२) सटाणा नाका येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी झाली.
विजयी उमेदवार खालील प्रमाणे-
सोसायटी गट : आत्माराम अहिरे, सुभाष गिल, सचिन साळुंके, ईश्वर सिसोदे, दिनकर चव्हाण, आकाश हिरे
वैयक्तिक सभासद गट : मधुकर देवरे, विजय निकम, रविंद्र शेवाळे, मयूर हिरे
महिला राखीव : मंगला भामरे, पुष्पा शिंदे
इतर मागास प्रवर्ग : अनिल निकम
अनुसूचित जाती-जमाती : काळू ठाकरे
विमुक्त जाती-भटक्या जमाती : प्रदीपकुमार पवार
भुसे व कांदेंनी ठोकला तळ
मतदानाच्या दिवशी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह नांदगावचे आमदार सुहास कांदे, युवा सेना विस्तारक अविष्कार भुसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदान केंद्र परिसरात दिवसभर तळ ठोकून होते. मतदारांशी संपर्क, मतदान प्रक्रियेवर लक्ष आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यावर त्यांनी विशेष भर दिला. दुसरीकडे विरोधी गटाकडून अपेक्षित उत्साह दिसून आला नाही. या विजयामुळे शेतकी संघावर पहिल्यांदाच शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली आहे. याउलट या निवडणुकीत भाजप नेते अद्वय हिरे हे मतदानासाठीही उपस्थितीत राहिले नाही असे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतीची चर्चा रंगली होती.