
Nandurbar News : नंदुरबारमध्ये महायुतीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे माजी मंत्री व आमदार विजयकुमार गावित यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या मित्रपक्षांसोबत युती न करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी मित्र पक्षांवर युतीविरोधी काम करत विरोधकांना मदत केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा विजयकुमार गावित विरुद्ध चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वादाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
नंदुरबार म्हणजे भाजपनेते डॉ. विजयकुमार गावित असे एक राजकीय समीकरण बनले आहे. या समीकरणाला गेल्या काही दिवसात मोठा धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत कन्या डॉक्टर हिना गावित यांचा पराभव झाला. त्यानंतर डॉ. विजय कुमार गावित यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही ही त्या मागील महत्वाची कारणं आहेत. त्यामुळे गावित यांची अस्वस्थता वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका त्यांनी चांगल्याच मनावर घेतल्या आहेत.
नंदुरबारमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचीही ताकद आता वाढली आहे. आमश्या पाडवी व चंद्रकांत रघुवंशी हे दोघेही तेथे आमदार आहे. दरम्यान नंदुरबारमध्ये शिवसेना आणखी बळकट करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे मंत्रिपद गेल्याने गावितांकडे होणारी गर्दी कमी झाली आहे. चंद्रकांत रघुवंशी यांचा गट व गावितांचे सर्व विरोधक हे एका बाजूला व विजयकुमार गावित हे एकटे एका बाजूला असे चित्र सध्या आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या गावित एकटे पडल्याचे चित्र आहे.
गावितांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी फार आधीच कंबर कसली आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आमदार रघुवंशी यांना आव्हान देण्यासाठी माजी मंत्री विजयकुमार गावित आता कंबर कसून कामाला लागले आहेत. तीन महिने झालेत ते शहरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे.
नंदुरबारच्या राजकारणात खरा संघर्ष हा डॉ. विजयकुमार गावित व चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील आहे. या दोघांचे नाते तसे तर साले -पाहुणे या प्रमाणेच असल्याचे सांगितले जाते. कारण दिवंगत लोकनेते बटेसिंहभैय्या रघुवंशी व डॉ. गावित यांचे सासरे आर.पी. वळवी हे जीवलग मित्र होते. मित्राचे जावई म्हणजे आपले जावई असे बटेसिंहभैय्या मानत होते.
त्यातूनच चंद्रकांत रघुवंशी व डॉ. गावित यांचे साले-पाहुण्याचे नाते असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अनेकदा राजकारणात किंवा त्यापलीकडे हे दोघेही नेते एकमेकांना साले-पाहुणे म्हणून टोमणेही मारत असत. मात्र या दोघांमध्ये राजकीय मतभेद आजही कायम आहेत. साधारण २००१ च्या विधानसभेपासून या नेत्यांच्या वादावर अनेकदा पडदा टाकत त्यांना जोडण्याचे प्रयत्न झाले. पंरतु त्याच्यातील कडी तुटतच राहिली.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाही महायुतीत असूनही रघुवंशी यांनी विरोधात काम केल्याचा आरोप गावित समर्थकांनी केला होता. त्यातून रघुवंशी यांची आमदारकीची संधी हुकेल अशा अफवाही पसरल्या होत्या. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गावित विरुद्ध रघुवंशी असा सामना पाहायला मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां दोघांसाठीही राजकीय अस्तित्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यात कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.