

Nashik Politics : बी. डी. भालेकर शाळा पाडण्यावरुन नाशिकमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. कारण शाळेची इमारत पाडताना, त्या जागेवर शाळाच उभारणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासनाने विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात भालेकर शाळा बचाव समितीने धरणे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला भाजप वगळता सर्व स्तरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे.
भालेकर शाळा बचाव समितीने या विषयावर शनिवारी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. यावेळी शाळा वाचविण्यासाठी समितीने भुसेंना विनंती केली व निवेदन दिले. त्यावर दादा भुसे यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेने महापालिकेची देखील कोंडी झाली आहे. कारण शाळेच्या जागी शाळाच बांधली जाईल असे आश्वासन समितीला भुसेंनी दिले आहे.
बी. डी. भालेकर शाळेची इमारत जीर्ण झाल्याने ती पाडावीच लागणार आहे. परंतु शाळेच्या जागेवर शाळाच उभी राहीली पाहिजे या नाशिककरांच्या भावनेशी मी सहमत आहे. त्यामुळे आयुक्त मनिषा खत्री यांच्याशी मी चर्चा करणार आहे. तसेच पाडल्या जाणाऱ्या इमारतीच्या जागेवर त्याच नावे शाळा उभारली जावी ही नाशिककरांची भावना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविणार असल्याचे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले.
जुने नाशिक, गंजमाळ, भद्रकाली परिसरातील गोरगरिबांच्या मुलांसाठी उभारण्यात आलेली बी. डी. भालेकर शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे शाळेची इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु शाळेच्या जागेवर शाळा बांधणे अपेक्षित असताना शाळेच्या जागेवर शासकीय विश्रामगृह बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परंतु, आता शासकीय विश्रामगृहाच्या नावाखाली येथे आयुक्तांचे निवासस्थान बांधण्याचा घाट घातला जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
सध्याचे आयुक्तांचे निवासस्थान वास्तुशास्त्राला सुसंगत नसल्याचे सांगितले जाते. म्हणूनच आयुक्त आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नसल्याचेही बोलले जाते. त्यामुळे भालेकर शाळेच्या जागेवर आयुक्तांचे निवासस्थान बांधण्याचा इरादा असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शाळा वाचविण्यासाठी शाळेत शिकलेले विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळा बचाव समिती गठित केली. समितीने आयुक्तांना निवेदनदेखील दिले. तसेच मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट समितीने घेतली होती. मात्र प्रशासन शाळा पाडून त्यावर विश्रामगृह उभारण्यावर ठाम राहिल्याने आता समितीने शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली.
शाळा पाडून त्याजागी विश्रामगृह उभारण्या संदर्भात नाशिकमधून मला अनेक फोन आले. या ठिकाणी शाळाच उभारावी, अशी विनंती केली. यासंदर्भात आयुक्त खत्री यांच्याशी मी चर्चा केली. विद्यार्थी संख्येअभावी चार वर्षापासून शाळा बंद असल्याचे सांगितले तसेच शाळा इमारत जीर्ण झाल्याने पाडली जात आहे. इमारत जुनी असेल तर पाडून पुन्हा शाळा उभी करावी, अशी नाशिककरांची भावना आहे. त्यामुळे नाशिककरांच्या भावनेशी मी सहमत असून येथे पुन्हा शाळा उभी करावी, अशा सूचना मी आयुक्त खत्री यांना करणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.