
Farmer Loan Waive: ईडीच्या कारवाईच्या फेऱ्यात अडकलेल्या विरोधकांना भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर शांत झोप लागते असं खुद्द भाजपत दाखल झालेले लोक सांगतात. त्यामुळं आता हाच फंडा एका शेतकऱ्यानं अवलंबला आहे. शेतमालाला भाव मिळावा तसंच कर्जमाफीचं आश्वासन देऊनही ते पूर्ण होत नसल्यानं एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात चक्क भाजपचं पिक लावलं आहे. जेणेकरुन आपल्यालाही भाजपत गेलेल्या विरोधकांप्रमाणं शांत झोप लागेल.
शेतमालाला भाव मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी याकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतातील तीन एकरात भाजपचे झेंडे पेरले आहेत. हे झेंडे सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सुरू असलेल्या पदयात्रेदरम्यान माजी आमदार बच्चू कडू यांनाही या झेंड्यावरून महायुती सरकारवर टोलेबाजी केली. तुमच्या पक्षाचे झेंडे पेरले आतातरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी त्यांनी केली.
सध्या विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. पीक चांगले आले तर बाजारात भाव मिळत नाही दुसरीकडं निसर्गाच्या लहीपणामुळं शेतमाल खराब झाला तर सरकार मदत करीत नाही, अशा विपरित परिस्थितीतून शेतकरी जात आहे. कारंजा तालुक्यातील सुकळी गावातील शेतकरी प्रकाश चौधरी यांच्याकडे एकूण चार एकर शेती आहे. चार एकर शेती करण्याचीही त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे त्यांनी फक्त एक एकर शेतीच्या तुकड्यात पिकांची लागवड केली. शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे, परिस्थितीकडे केंद्र व राज्यातील भाजप महायुती सरकारचे लक्ष जावं याकरिता त्यांनी उर्वरित तीन एक शेतात भाजपचे झेंडे पेरले आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी आपल्या यात्रेदरम्यान या शेतकऱ्याची दखल घेतली. रासायनिक खते व बी बियाण्यांच्या वाढल्या आहेत. त्यातच शेतमालाला रास्त भाव दिला जात नसल्याने उत्पादन खर्चही त्यांना परवडत नाही. कोणी हिंमतीनं शेती करायचे धाडस केलं तर कधी पाऊस धोका देतो, कधी अतिवृष्टी होते, वादळवारं येतं. वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरूच असतो. किमान सत्तेवर असलेल्या भाजपच्या झेंड्याची लागवड केल्यास सरकारचे डोळे उघडेल, हमी भाव वाढवून दिला जाईल हीच भावना यामागे शेतकरी चौधरी यांची असल्याचे कडू यांनी सांगितलं.
महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं आहे. याकरिता बच्चू कडू यांनी यापूर्वी सात दिवस उपोषण केले होतं. त्यानंतर सरकारने एक समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आहे. पावसाळी अधिशेनाचा पहिला आठवडा उरकून गेला आहे. मात्र, कर्जमाफी समितीची स्थापना करण्यात आली नाही. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी कर्ज माफी दिली जाईल. ती योग्य वेळ केव्हा येणार असा सवाल कडू यांनी केला. सरकारने दिलेल्या त्यांच्याच आश्वासनांचे स्मरण करून देण्यासाठी आपण पदयात्रा सुरू केली आहे. केंद्रासह राज्यात भाजपाचे सरकार आहे, असं असताना देखील शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे पेरून काही फायदा नाही, म्हणून पीक घेतल्या पेक्षा भाजपाचे झेंडे लावलेले बरे असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.