

Nagpur Political News: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार संदीप जोशी यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर रिक्त होणाऱ्या या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. अवघ्या 13 महिन्यांचा कार्यकाळ लाभल्याने जोशी यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी अचानक राजकीय निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे या जागेसाठी भाजपमध्ये ‘रस्सीखेच’ सुरू झाली आहे. या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाला संधी देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
गत विधानसभा निवडणुकीत मध्य नागपूर मतदारसंघातून प्रवीण दटके यांचा विजयी झाले होते. त्यांच्या रिक्त जागेवर नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना संधी देण्यात आली. पण त्यांना अवघ्या 13 महिन्यांचा कार्यकाळ लाभला. आता त्यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केल्याने या जागेसाठी प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, विक्की कुकरेजा आणि मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश ठाकरे यांची नावे आघाडीवर आहेत.
दयाशंकर तिवारी यांनी विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूरवर दावा केला होता. मात्र त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून संधी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर नागपूरमधून म्हणून विक्की कुकरेजा यांचेही नाव चर्चेत असून, त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत त्यांनी मी आता महापालिकेची निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणूनही त्यांचे पारडे जड आहे.
शहर विरुद्ध ग्रामीण संघर्ष :
दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजू पोतदार यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. पोतदार सध्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. नुकतेच नागपूर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन डॉ. राजीव पोतदार यांना विधान परिषद सदस्य म्हणून उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे. या मागणीमुळे शहर विरुद्ध ग्रामीण अशी स्पर्धा सुरु झाली आहे. यात कोणाचे पारडे जड ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.