

Maharashtra women campaign : महिला आऱक्षणाशी संबंधित विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर झाल्यानंतर भाजपने विरोधी पक्षांविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत विरोधकांचा खरपूस समाचार घेत आहेत. सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार प्रहार केला.विरोधी नेत्यांना आव्हानही दिले. त्याला काँग्रेसने चोख उत्तर दिले आहे.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आणि देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. भाजपाने महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचनेचा ‘कुटील डाव’ रचल्याचा आरोप करत काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेच्या आव्हानाला काँग्रेस तयार असून, “कधी आणि कुठे चर्चा करायची ते सांगा, आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बोलवा,” असे प्रतिआव्हान खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले.
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या प्रणिती शिंदे आणि खासदार शोभा बच्छाव यांनी भाजपावर तीव्र टीका केली. शिंदे म्हणाल्या, महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच मंजूर झाले असताना भाजपाने त्यात जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना या अटी घालून प्रक्रिया लांबवली. “सध्या अस्तित्वात असलेल्या ५४३ लोकसभा जागांमधूनच ३३ टक्के आरक्षण द्यावे,” अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
“विशेष अधिवेशन बोलावून महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे केला गेला, पण प्रत्यक्षात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुढे नेण्याचा प्रयत्न होता. यातून उत्तर-दक्षिण असा भेद निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न होता,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा राजकीय डाव आखण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
खासदार शोभा बच्छाव यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन करत भाजपावर निशाणा साधला. “माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज व्यवस्थेत महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले, तर सोनिया गांधी यांनी ते ५० टक्क्यांपर्यंत वाढवले. काँग्रेसने कधीही अटी-शर्ती लादल्या नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले. आज देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लाखो महिला प्रतिनिधी कार्यरत आहेत, हे काँग्रेसच्या धोरणांचे फलित असल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘काँग्रेस महिला विरोधी’ या आरोपालाही शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “महिलांवरील अत्याचारांच्या घटना – मणिपूरपासून उन्नावपर्यंत – भाजपाच्या काळात घडल्या. या प्रकरणांमध्ये सरकारने काय भूमिका घेतली, हे देशाने पाहिले आहे,” असे सांगत त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले.
महिला आरक्षण विधेयक २०२३ योग्य वेळी लागू केले असते, तर आज लोकसभेत सुमारे १८० महिला खासदार दिसल्या असत्या, असा दावा करत बच्छाव यांनी भाजपावर ‘महिला विरोधी’ असल्याचा आरोप केला.
महिला विधेयकाला विरोध करून काँग्रेसने भ्रूणहत्या केली या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला उत्तर देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार, महिला खेडाळूंवरील अत्याचार, हाथरस, उन्नाव, बदलापूर, खरात प्रकरण हे भाजपाच्या काळातच झाले आहे, ही प्रकरणे भाजपाने कशी हाताळली हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे महिलांची फक्त भ्रूण हत्याच नाही तर महिलांच्या चारित्र्याचे हनन, त्यांच्यावर अत्याचार आणि महिलांच्या हत्या करण्याचे पाप भाजप रोज करत आहे. भाजपाचा व रा. स्व. संघात महिलांना किती स्थान व सन्मान आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, भाजपाच्या इतिहासात एकही महिला भाजपची अध्यक्षा झाली नाही याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
दरम्यान, या संपूर्ण मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, येत्या काळात संसदेसह राज्याच्या राजकारणातही हा विषय अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.