Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानावर पार पडला. यामध्ये मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. या दिमाखदार सोहळ्यास पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह १९ राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते. दुसरीकडे या शपथविधी सोहळ्याच्या नियोजनात ढिसाळपणा झाला असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी करीत महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. (Mahayuti Government Oath Ceremoney News)
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानावर देशभरातील दिगग्ज नेतेमंडळीच्या उपस्थित पार पडला. या शपथविधी सोहळ्याच्या नियोजनात ढिसाळपणा झाला होता. सगळे मुख्य नेते मागे बसले होते. महायुतीमधील तीनही पक्षासाठी काही पास येणार होते. ते आले पण थोडाफार होते. त्यामुळे शपथविधी कार्यक्रमात ढिसाळपणा जाणवला, अशी टीका शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी करीत महायुतीला घरचा आहेर दिला.
मुख्य स्टेजवर आमचे एक केंद्रीय मंत्री होते. पण पक्षाचे नेतेमंडळी पण असती तर बरे झाले असते. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होत की, आपला नेता का नसावा ? व्यासपीठावर काही नेते जायला हवे होते. स्टेजवर राज शिष्टाचार प्रशासनाकडून ही कळत नकळत चूक झाली आहे. दखल तर घ्यावी लागेल पण आज लगेच पहिल्या दिवशी तक्रार करणार नाही, असे किरण पावसकर म्हणाले.
महायुती (Mahayuti) सरकारने शपथविधी सोहळ्याचे नियोजन चांगल्या प्रकारे करायला हवे होते. मात्र, या कार्यक्रमाचे नियोजन करीत असताना प्रशासनाकडून ही कळत नकळत चूक झाली आहे. त्याचा फटका उपस्थित नेतेमंडळी व नागरिकांना सहन करावा लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.