
Raj-Uddhav Thackeray: सरकारला हिंदी भाषेची सक्ती मागे घ्यायला भाग पाडल्याप्रकरणी मुंबईच्या वरळीतील NSCI डोम या सभागृहात मराठी विजयाचा मेळावा पार पडला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधुंनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यासाठी ज्या मराठी माणसांच्या कडव्या विरोधामुळं सरकारला नमावं लागलं त्या समस्त मराठी माणसांना या मेळाव्याला येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
ठाकरे बंधुंच्या या आवाहनाला तुफान प्रतिसाद मिळाला. ज्या ८ हजार आसनक्षमता असलेल्या सभागृहात हा मेळावा घेण्यात आला, तिथं क्षमतेपेक्षा अधिक लोक आले होते. अनेकजण तर सभागृहाच्या बाहेरुनच दोन्ही ठाकरेंचं भाषण ऐकत होते. ठरल्याप्रमाणं सर्वात आधी राज ठाकरेंनी भाषण केलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपले विचार मांडले. या दोघांच्या भाषणांची चर्चाही खूप झाली. पण नेमकं कोणाचं भाषण अधिक परिणामकारक होतं? ते मराठी लोकांवर प्रभाव टाकणारं होतं का? जाणून घेऊयात.
राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंपेक्षा वयानं लहान आहेत. पण दोघेही स्वतंत्र पक्षाचे प्रमुख आहेत. दोघांकडं अस्सल ठाकरी शैलितल्या भाषणाची कला अवगत आहे. मुद्देसूद आणि प्रसंगी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर शब्दांत टिप्पणी करणं हे दोघांच्या भाषणांचं वैशिष्ट्य आहे. मराठी माणूस किंवा भूमिपुत्र हा स्थानिक मुद्दा नेहमीच शिवसेनेचा आणि मनसेचा सर्वात प्राथमिकतेचा मुद्दा राहिला आहे. त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक समुहाचं राजकारण म्हणून हिंदुत्व हा देखील दोघांचा अजेंड्यावरचा विषय.
हिंदुत्ववादाचे जनक असल्याचा अविर्भाव मिरवणाऱ्या भाजपला या दोन्ही नेत्यांनी कायमच टोकाचे बोल सुनावले आहेत. पण तरीही हिंदुत्वापेक्षा मराठीत्व हा दोघांसाठी यंदा प्राधान्याचा मुद्दा राहिला. शिवेसनेची स्थापना झाली तिच मुळात मराठीच्या मुद्द्यावरुन आजच्या मेळाव्यानंतर याच मूळ शिवसेनेची तत्व घेऊन काळाच्या ओघात बिछडले गेलेले दोन भाऊ पुन्हा एकत्र आले ते मुळात मराठीच्या मुद्द्यावरच. त्यामुळं आजच्या दिवशी शिवसेनच्या इतिहासातील एक वर्तुळ पूर्ण झालं.
आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण भाषण केलं. म्हणजे ठराविक मुद्दे अधोरेखित करणारं त्याचं भाषण होतं. हे मुद्दे देखील गेल्या काही दिवसांत भाजप आणि महायुतीनं त्यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देणारे मुद्दे होते. तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांचं भाषणं हे नेहमीप्रमाणं ओघवतं भाषण होतं. म्हणजे त्यांनी आपल्या भाषणासाठी विशेष तयारी केल्याचं जाणवलं नाही. पण मराठी भाषेचा मुद्दा त्याचबरोबर त्याअनुषंगानं होत असलेलं राजकारण आणि त्याच्या मुळाशी असलेला भाजप यांचा त्यांनी नेहमीच्या ठाकरे शैलीत समाचार घेतला. तसंच शिवसेना फोडून पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही त्यांनी आपली भडास काढली.
राज ठाकरे यांनी मराठीच्याच मुद्दयापासून सुरुवात करताना आपण दोनदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हिंदीसक्तीचा जीआर रद्द करण्यासंदर्भात पत्र लिहिल्याचं सांगितलं. पण त्यांनी ते गांभीर्यानं घेतलं नाही, पण जेव्हा हिंदीसक्तीला मराठी माणसातील बुद्धिवंतांनी, सामान्य माणूस, कलाकार, पत्रकारांनी जोरदार विरोध करायला सुरुवात केली. त्यानंतर या रेट्यामुळं सरकारला माघार घ्यावी लागली. त्यानंतर ठाकरे मराठीला विरोध करतात पण स्वतःची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवतात या भाजपच्या आरोपांनाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी हे ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले, असं सांगताना खुद्द बाळासाहेब ठाकरे हे देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकल्याचं त्यांनी सांगितलं.
मग या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या हिंदुत्वावर आणि भाषेविषयीच्या कामावर तुम्ही आक्षेप घेणार का? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्याचबरोबर दक्षिणेतील महत्वाचे नेते आणि अभिनेते हे देखील इंग्रजी शाळांमध्ये शिकले पण त्याचं आपल्या भाषांवरचं प्रेम कमी झालेलं नाही, हे देखील राज ठाकरेंनी सांगितलं. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हा दोघा भावांना गेल्या वीस वर्षात कुठलीही ताकद एकत्र आणू शकली नाही, पण ते काम मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं अशा शब्दांत त्यांच्यावर तिरकस शब्दांत टीका केली.
तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठीच्या मुद्द्यासह त्रिभाषा सुत्राविषयची ठाकरे सरकारनं नेमलेल्या समितीच्या मुद्द्यावर भाष्य केलं. जो मुद्दा भाजपनं काऊंटर म्हणून वापरला होता. तसंच गेल्या निवडणुकांचा मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा, शिवसेनेत फूट पडल्याचा मुद्दा तसंच एकनाथ शिंदेंवर असलेल्या रागातून काढलेली भडास हे मुद्दे प्रामुख्यानं मांडले गेले. सर्वात आधी त्यांनी आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत आणि एकत्रच राहणार आहोत, अशी ग्वाही महाराष्ट्राला दिली. आमच्यातील आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना टार्गेट केलं.
डोममध्ये लोकांनी ज्या कारणासाठी विक्रमी गर्दी केली, त्यांना जी आशा होती. ती आशा उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याच्या घोषणेनं पूर्ण केली. आम्ही तुमच्या हिंदुत्वापेक्षा कडवे मराठी हिंदू आहोत, अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावलं. तसंच एकनाथ शिंदे हे मोदी-शहा या आपल्या मालकांच्या मागेपुढे करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी नुकताच 'जय गुजरात'चा दिलेल्या नाऱ्यावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास सांगताना मुंबईला वेगळं काढण्याचा प्रयत्न हाणून पाडू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
एकूणच दोघांच्या एकत्र एकाच व्यासपीठावर येण्याचा परिणाम हा उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी आता आम्ही दोघंही भाऊ एकत्रच राहणार असल्याची केलेली घोषणा ही शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरु शकते. त्याचबरोबर मराठी भाषेच्या राजकारणासाठी म्हणून या दोघांच्या युतीबाबत सोशल मीडिया आणि प्रत्यक्षांत पब्लिकमधील चर्चा या सकारात्मक दिसून आल्या आहेत. त्यामुळं मराठीचं राजकारण म्हणून राज्यात नव्या प्रकारच्या राजकारणाची नांदी हा आजचा मेळावा ठरू शकणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.