BMC Election 2025 : मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र त्यांनी अद्याप सोबत घेतलेलं नाही. मुंबईतील जागा वाटपाबाबतही भाजप-शिवसेना यांच्यात चर्चा झाली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आमचा कुठलाही संबंध नाही, अशी भूमिका यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी शिवसेनेसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मांडली. यामुळं मुंबईसाठी महायुती विभाजित झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या अनुषंगानं शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आज बैठक पार पडली. यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत आणि प्रकाश सुर्वे हे देखील उपस्थित होते. यावेळी साटम म्हणाले, मुंबईच्या २२७ वॉर्डपैकी १५० जागांवर आमचं एकमत झालेलं आहे. उर्वरित जागांची चर्चा सुरु आहे, पुढच्या दोन दिवसांत यावर चर्चा होऊन युतीची घोषणा होईल. उर्वरित ७७ जागांची चर्चा आमची सुरु असून पुढील दोन-तीन दिवसांत आमची चर्चा होईल त्यानंतर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे घेतील आणि घोषणा करतील, अशी माहिती यावेळी साटम यांनी दिली.
साटम पुढे म्हणाले, शिवसेना-भाजपच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला हा आहे की, मुंबई महापालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन द्यायचं आहे. मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे ही मुंबईकरांची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि रिपाइं कटिबद्ध आहे. त्यामुळं कोण किती जागा लढणार हे महत्वाचं नाही तर २२७ जागांवर महायुती लढेल, १५० पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबईकरांचा महापौर विराजमान होईल. मुंबईचा विकास आणि सुरक्षितता शाबूत राखणं हा आमचा फॉर्म्युला आहे"
सेकंड रनरअप आणि फर्स्ट रनरअप असं आमचं कुठलंही सूत्र ठरलेलं नाही. ज्या लोकांनी २५ वर्षे मुंबई महापालिकत बसून मुंबईचा कोपरा कोपरा विकून खाल्ला, आणि आता स्वतःचं संपलेलं राजकीय अस्त्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता मतांच्या लांगूलचालनासाठी मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महायुती सज्ज आहे. मुंबई महापालिका एका परिवाराची जहागिरी आहे हे जे लोक समजतात त्यांना उत्तर देण्यासाठी महायुती सज्ज आहे. तसंच उमेदवारांबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. आमची महायुती घट्ट आहे शेवटी धनुष्यबाण आणि कमळ हे दोन्ही एकच आहेत, असंही साटम यावेळी म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि आमचा संबंध नाही अशा शब्दांत साटम यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचं काही देणघेणं नाही. नवाब मलिक यांच्यावरती गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाहीत. मुंबईसाठी राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक आहेत, राष्ट्रवादीनं मलिक यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली असल्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर युती करु इच्छित नाही. उद्या राष्ट्रवादीनं आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून दुसऱ्या कोणा नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.