Mumbai News : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. महापालिका निवडणुकांसाठी गुरुवारी(ता.15) मतदान होणार असून उमेदवारांची धडधड चांगलीच वाढली आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत मोठा दावा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मोठी रणनीती आखतानाच झंझावती प्रचार केला.शिवसेना फुटल्यानंतरची ही पहिलीच महापालिका निवडणूक असल्यानं उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबईत कुणाची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहे. याचदरम्यान,मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील 29 पैकी 26 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर निवडून येणार असं मोठं विधान केलं आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा करतानाच महाराष्ट्र हा पुन्हा एकदा नेमका कुणासोबत असेल हेही स्पष्ट होईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच महायुतीचीच सत्ता महापालिकांमध्ये दिसणार असून मुंबईतही भाजपच सत्तेत येणार असल्याचं भाकीत केलं आहे.इतर ठिकाणी मित्रपक्षांचे महापौर बसणार आहे, असंही मुख्यमंत्री यांनी सांगितलं.
तसेच मुंबई महापालिकेत निकालानंतर जर गरज पडली तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सोबत घेणार का या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी एकीकडे रोखठोक भूमिका मांडतानाच दुसरीकडे निकालच सांगून टाकला आहे. ते म्हणाले, मुंबईत अशी बिलकूल गरज पडणार नाही.आम्ही बहुमताने महापालिकेत सत्तेत येऊ असा दावा त्यांनी केला. आता पुन्हा कोणत्याही नव्या राजकीय युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. याचवेळी फडणवीसांनी दोघांशी वैयक्तिक संबंध चांगलेच राहतील असं विधानही केलं.
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र हा पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल.भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल. महायुतीचीच सत्ता महापालिकांमध्ये असेल. महाराष्ट्र कुणासोबत असेल हे अधोरेखित होईल. महाराष्ट्रातील अनेक शहरात मी प्रचारासाठी फिरलो.
पण मला असा विश्वास वाटतो की लोक आमच्या बाजूने आहेत. आम्ही भाजीपाल्याचा ठेला चालवणाऱ्याला आणि डॉक्टर, वकील यांना सुद्धा तिकीट दिले आहे. आम्ही टॉक शो केले. सभा घेतल्या. कोपरा बैठका घेतल्या. यामध्ये आम्ही विकासाचा मुद्दा अजेंड्यावर ठेवला.
फडणवीस म्हणाले,आम्ही बीडीडी चाळीत 80,000 मराठी बांधवांना हक्काचं घर बांधून दिलं. तसेच अभ्युदय नगर,पत्रा चाळ,विशाल सह्याद्री,मोतीलाल नगरच्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी त्यांचं हक्काचं घरं दिली. नाहीतर तो वसई-विरारच्याही पलिकडं राहायला गेला असता. मराठी माणूस हा विरोधकांसोबत नाही. अमराठी तर त्यांच्यासोबत नाहीच असा दावा करतानाच ठाकरे बंधूंना चिमटा काढला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांचा प्रचार संपल्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात मराठी माणसाच्या संस्कृती,भाषेचे जतन आणि संरक्षण होईल. पण मराठी माणसाचा विकास म्हणजे काय,गेल्या 25 वर्षांत मराठी माणसाला उपनगरात पलायन करावं लागलंय आणि यांनी केवळ वल्गना केल्या. परप्रांतिय अथवा उत्तर भारतीय रिक्षा चालकाला दोन चापटा मारणे हा काही विकास नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी मराठी-अमराठीचा मुद्दा पेटवण्याचा विरोधकांनी मोठा प्रयत्न केला.पण त्यांना अपयश आल्याचा आरोपही केला.
तामिळनाडूचे नेते के.अण्णामलाई हे मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी आले असतानाच मुंबई हे शहर महाराष्ट्राची राजधानी केव्हा शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज ठाकरे संजय राऊत यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर अण्णामलाई यांनीही ठाकरेंना खुलं आव्हान देताना मी मुंबईत येतो,माझे हात-पाय तोडा असं म्हटलं होतं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी के,अण्णामलाई आणि ठाकरे बंधू यांच्यात पेटलेल्या वादावर भाष्य केलं. ते म्हणाले,के अण्णामलाई यांनी चुकून बोलता बोलता बॉम्बे म्हटलं. याचा अर्थ ते मुंबईविरोधात आहे असे होत नाही.तर विरोधकांनी ज्या प्रकारे तामिळींवर टीका केली, तो अपमान ठरत नाही का,असा टोला फडणवीसांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.