

Ramdas Athwale: पुण्यात काही दिवसांपूर्वी विषारी दारु प्यायल्यामुळं २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून या प्रकारावर तोडगा म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शासनाला एक तोडगा सुचवला आहे. त्यानुसार, हातभट्टीची दारु शासनमान्य करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पण त्यामुळं काय उपाय होऊ शकेल हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलत असताना रामदास आठवले यांना पत्रकारांनी पुण्यातील विषारी दारुचे बळी गेलेल्यांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आपली सविस्तर भूमिका मांडली. आठवले म्हणाले, "कितीही कारवाया केल्या तरी हातभट्ट्या सुरुच असतात. त्यामुळं हातभट्टीच्या दारुला जर परवानगी दिली तर त्याचा महसूल शासनाला मिळेल. यामुळं हातभट्ट्यांवर नियंत्रण ठेवता येईल. यामुळं त्यावर प्रशासनाचं पूर्णपणे नियंत्रण असेल, त्यामुळं मग अशा प्रकारे जी प्राणहानी हेते ती होणार नाही. त्यामुळं त्याचाही विचार सरकारनं करावा"
दरम्यान, सध्या हातभट्टीची दारु अर्थात जी कुठेही हातानं अगदी घरामधील छोट्याशा भट्टीत, छोट्याशा ड्रममध्ये अवैधरित्या तयार केली जाते. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांना शासनाची मान्यता नाही, म्हणजे हा अनियंत्रित आणि बेकायदा व्यवसाय आहे. साखर, ज्वारी, मका, बटाटा, मोहाची फुलं, उसाचा रस, खजूर, तांदूळ आणि नासलेली फळं हे आंबवून त्याचा अल्कोहोलयुक्त द्रावण काढलं जातं. त्यात अधिक नशेसाठी मिथाईल अल्कोहोल, युरिया, बेशरमच्या झाडाची पानं असे घातक घटक वापरले जातात. या पदार्थांमुळं अधिकची नशा येते पण त्यामुळं अंधत्व, विषबाधा होण्याची दाट शक्यता असते.
ही हातभट्टीची दारु अत्यंत कमी किंमतीमध्ये विकली जाते. शासनमान्य देशी दारुपेक्षाही या दारुची किंमत कमी असते, त्यामुळं या दारुचे ग्राहक जास्त करुन, दिवसभर जास्त अंगमेहनतीची कष्टाची कामं करणारा गरीब मजूर आणि कामगार वर्ग आहे. ही दारु प्रामख्यानं ग्रामीण भाग, झोपडपट्ट्यांमध्ये गुप्तपणे विकली जाते. ही बेकायदा दारु असली आणि वारंवार पोलिसांनी कारवाया करुन या दारु तयार करण्याचे अड्डे उद्ध्वस्त केलेले असले तरी ते पुन्हा मांडले जातात आणि ही दारुविक्री केली जाते. या स्वस्तातल्या दारुला जास्त मागणी असल्यानंच वारंवार कारवाया होऊन देखील ती तयार करणारे पुन्हा अडडे उभे करतात.
पुण्यात काही दिवसांपूर्वी विषारी दारु प्यायल्यामुळं २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पुणे जिल्ह्यातील हडपसर, दापोडी, फुगेवाडी आणि लोणावळा परिसरात हे मृत्यू झाले होते. केवळ काही हजार रुपयांच्या फायद्यासाठी दारु बनवणारा मुख्य आरोपी योगेश वानखेडे यानं मुंबईहून आणलेलं मिथेनॉल हे रसायन मिसळलं होतं. कमी दारुच्या प्रमाणात अधिक नशा निर्माण करण्याचा हा प्रकार होता. म्हणजेच अधिक प्रमाणात ही दारु विकून पैसा कमावण्यासाठी ही बेकायदा दारु विक्री झाली आणि ती प्राशन केल्यानं आर्थिक दुर्बल घटकातील आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा यात बळी गेला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.