
Mahayuti Oath Ceremony : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.त्यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा (Mahayuti) शपथविधीचा हा महासोहळा गुरुवारी (ता.5) पार पडला.
या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेतेमंडळींना देण्यात आले होते. पण कोणताही नेता या सोहळ्याला उपस्थित राहिला नाही.पण आता ट्विट करुन काही नेत्यांनी महायुती सरकारचं अभिनंदन केलं आहे. तसेच काही अपेक्षा व्यक्त करतानाच इशारेही दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी शपथ घेतली.याबद्दल तिघांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनीही महायुती सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांनी ट्विटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच नवीन सरकार राज्याच्या हिताच्या मुद्द्यांना प्राथमिकता देऊन युवांना रोजगार, औद्योगिक गुंतवणूक, शेतकरी, महिला सुरक्षा या विषयांसाठी चांगले काम करेल ही अपेक्षा व्यक्त केली आहे. विरोधीपक्षात असलो तरी,आमची संख्या कमी असली तरी महाराष्ट्र हिताच्या प्रत्येक निर्णयात राजकीय भूमिका बाजूला ठेवून सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू.परंतु, महाराष्ट्र हित डावलणारा कुठला निर्णय घेतला जात असेल तर तेवढ्याच टोकाचा विरोध देखील करू असा इशाराही दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीही ट्विट करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतानाच काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.कोल्हे ट्विटमध्ये म्हणतात,महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन ! महाराष्ट्र हितासाठी कार्यरत असताना राज्यात उसवलेली सामाजिक वीण पुन्हा घट्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत व महाराष्ट्राची ओळख असलेला शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा संस्कार आपण जपावा हीच प्रामाणिक अपेक्षा असंही ते म्हणाले आहेत.
तसेच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांचंही अभिनंदन केलं आहे. आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या पिकाला दाम, तरुणांच्या हाताला काम व माता भगिनींना सन्मान मिळेल, राजकीय, वैचारिक, पक्षीय मतभेद बाजूला सारून महाराष्ट्राचे हित हीच प्राथमिकता असेल हा मला विश्वास आहे, असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.
माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनीही नव्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..फेसबुकच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत..हर्षवर्धन पाटील यांनी फेसबुकवर त्यांच्यासोबतचे जुने फोटो टाकत पोस्टवर केली आहे.
हर्षवर्धन पाटील पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या हातून राज्यातील जनतेची सेवा घडेल, आपले राज्य बलशाही बनेल, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.आपल्या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या हिताचे निर्णय होतील, हीच अपेक्षा. त्यांना उज्वल महाराष्ट्र घडवण्याची पुढील वाटचालीस पाटील यांनी महायुती सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन.आपल्या कारकीर्दीत राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा हीच सदिच्छा!अशा आशयाचं ट्विट केलं आहे.
विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनीही ट्विट करत महायुती सरकारचं अभिनंदन केलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात,देवेंद्रजी फडणवीस यांची 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना मी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. 2014 ते 2024 या दशकात विविध भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी त्यांनी घेतलेले निर्णय पाहता माझ्या शुभेच्छा योग्य ठरल्या.
तसेच उत्तम संघटक एकनाथ शिंदे साहेब व उत्कृष्ट प्रशासक अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ! नेतृत्व व कर्तृत्वाची ही युती महाराष्ट्राच्या प्रगतीला नवीन उंची गाठून देणारी ठरेल हा विश्वासही तांबे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नव्या सरकारचं अभिनंदन केलं. ते ट्विटमध्ये म्हणतात, आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. तसेच २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं, त्यामुळे ती संधी हुकली असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून महायुती सरकारला अभिनंदन करतानाच इशाराही दिला आहे. पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.