
Mumbai News : झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात गरळ ओकली होती. निशिकांत दुबे (Nishikkant Dubey) यांनी केलेल्या संतापजनक विधानानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता आणखी एका खासदारानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचत थेट ललकारलं आहे.
एकीकडे सरकारच्या हिंदीसक्तीच्या निर्णयानंतर राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी एकत्र येत आपली ताकद दाखवली होती. यानंतर मीरा भाईंदर येथे व्यापाऱ्याला मनसेकडून मारहाण झाल्यानंतर आता हिंदी-मराठी वाद पेटला आहे. अशातच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी या वादाला खतपाणी घातलं. त्यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची भावना निर्माण झाली आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी थेट ठाकरे बंधूंना खुले आव्हान दिले आहे. त्यांनी हिंमत असेल तर हिंदी सिनेसृष्टीला महाराष्ट्राच्या बाहेर काढून दाखवा, असं खुलं आव्हानच राज आणि उद्धव ठाकरेंना दिले आहेत. यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सपाचे खासदार राजीव राय यांनी सोशल मीडियावरील एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली आहे. या पोस्टमध्ये म्हणतात,महाराष्ट्रात तुमची राजकीय ताकद निर्माण का होऊ शकलेली नाही? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? गरीब हिंदी भाषिकांसोबत गुंडगिरी करणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे, असल्याचा टोला राय यांनी ठाकरेंना लगावला आहे.
राय पुढे ट्विटमध्ये म्हणतात, हिंदी चित्रपटांमुळे बॉलिवूडला ओळख मिळाली. याच हिंदी चित्रपटांनी तुमच्या कुटुंबाची अब्जो रुपयांची कमाई झाली. या हिंदी चित्रपटांविरोधात तुम्ही का बोलत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर हिंदी सिनेसृष्टीला मुंबईतून बाहेर काढून दाखवण्याचं चॅलेंजही राजीव राय यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिलं.
राजीव राय यांनी यावेळी गरीब हिंदी भाषिक लोक पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात जात असतील, तर हजारो मराठी कुटुंब हे हिंदी सिनेमांच्या मदतीनेच जीवन जगतात, असा दाखला यांनी दिला आहे.
खासदार राजीव राय यांनी यावेळी राज ठाकरेंना आत्मचिंतनाचा सल्लाही दिला आहे.ते म्हणतात, लक्षात ठेवा या देशाची संस्कृती अतिथी देवो भव: अशी आहे. तुम्ही करत असलेल्या गुंडगिरीवर औषध आहे. सगळं काही ठीक होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही थोडं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तुमच्या एकट्याचे नाहीत, तर ते संपूर्ण देशाचे हिरो आहेत असल्याचंही राय यांनी पोस्टमध्ये नमूद करताना राज आणि उद्धव ठाकरेंना फटकारलं आहे.ते म्हणाले,मराठी भाषा ही संस्काराची भाषा आहे. या देशातील एखादा भाग फक्त भाषेच्या मुद्द्यावरून कोणाच्याही बापाचा होऊ शकत नाही. देशातील प्रत्येक भागावर प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याची आठवणही त्यांनी ठाकरे बंधूंना करुन दिली.
'' तुम्ही कुणाची भाकरी खाताहेत, येथे टाटा, बिर्ला, अंबानी आहेत, तेच टॅक्स भरतात, मराठी लोक कुठला टॅक्स भरतात,आमच्या पैशावर तुम्ही जगत आहात, तुमच्यात हिमंत असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर या, युपी, बिहार, तामिळनाडू मध्ये या, तिथं तुम्हाला आपटून आपटून मारु," अशी गरळ भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ओकली. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.