
Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना कालावधीत खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 17 जानेवारी 2024 रोजी अटक करण्यात आली होती.आता चव्हाण यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतर युवासेनेचे प्रमुख आणि वरळीच शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) ट्विट करत बंडखोर आमदारांना डिवचलं आहे.
आता वर्षभराच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा शिवसेना नेते सूरज चव्हाण यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सूरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता.4) न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठापुढे सुनावणी पार पडली. सूरज चव्हाण यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जा्मीन मंजूर करण्यात आला आहे.
यावर आता शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे ट्विटमध्ये म्हणतात, अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले. सर्व काही मिळूनही, चोरासारखे पळून गेले, कृतघ्न झाले. ज्या उद्धवजींनी भरभरुन दिलं त्यांच्याच वडीलांचा फोटो, दिलेलं नाव चोरलं आणि आईसारख्या पक्षावर वार करुन निर्लज्जपणे मंत्रीपदं मिळवली, पापाचा अमाप पैसा साठवला. पण दुसऱ्या बाजूला मात्र, एक प्रामाणिक माणूस, आमचा लढणारा वाघ आणि भाऊ... सूरज! असा कौतुकाचा वर्षाव आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटमधून केला आहे.
कोरोना काळातील मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकर यांची चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीनंतर चव्हाणांना ईडीकडून अटक करण्यात आली. तसेच कीर्तीकर यांनाही चौकशीसाठी नोटीस बजावली होती.
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सुरज चव्हाणांची ईडीकडून अनेकदा चौकशी करण्यात आली होती. आता चौकशी पूर्ण झाल्यानंतर चव्हाणांना ईडीने अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी सुरज चव्हाणांच्या घरी ईडीची धाड पडली होती. त्यानंतर स्वतः ईडी कार्यलयात जाऊन ते चौकशीला सामोरे गेले होते. मात्र ईडीकडून ठाकरेंच्या अतिशय विश्वासू पदाधिकाऱ्याला अटक झाल्यामुळे ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई महापालिकेत कोरोनाच्या काळात कथित खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकणात ईडीने सुरज चव्हाण यांची चौकशी केली होती. तसेच सुरज चव्हाणांनी अनेक कंत्राटदारांना चढ्या दराने कंत्राटं मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे.
कोरोना काळात काळात स्थलांतरीत होऊ न शकलेल्या आणि मुंबईतील बेघरांसाठी खिचडी वाटप करण्यात आलं होतं.यासंबंधी मुंबई महापालिकेने तब्बल 52 कंपन्यांना खिचडी वाटपाचं कंत्राट दिलं होतं.सुरुवातीच्या चार महिन्यांच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटप करण्यात आल्याचं मुंबई महापालिकेने सांगितलं होतं.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच खिचडी वाटपामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत ईडीकडे तक्रार केली होती. यानंतर ईडीकडून या घोटाळ्यात एन्ट्री झाली होती.तसेच या ईडीनं या घोटाळ्यातील 3 कोटी 64 लाखांपैकी 1.25 कोटी चव्हाणच्या बँक अकाऊंटला तर 10 लाख रूपये अन्य कंपनीच्या खात्यात जमा केल्याचा आरोप ईडीने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.