
Mumbai News, 28 May : "आज बाळासाहेब असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती", असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला होता. शहांच्या याच वक्तव्याला आता ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शहांना चांगल्या उपचारांची गरज आहे. बाळासाहेब असते तर जीवनभर आठवण राहील असे कडक उपचार त्यांच्यावर झाले असते, असा हल्लाबोल सामना अग्रलेखातून शहांवर करण्यात आला आहे. या अग्रलेखातून पहलगाम हल्ल्यावरून शाह यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. तसंच अमित शहा हे देशाला लाभलेले सगळ्यात फुसके गृहमंत्री असल्याची जळजळीत टीका देखील सामनातून करण्यात आली आहे.
सामनात लिहिलं की. अमित शहा हे देशाला लाभलेले सगळ्यात फुसके गृहमंत्री आहेत. त्यांच्या काळात भारतात सुरक्षा, कायदा-सुव्यवस्थेचा जास्त विचका झाला आहे. गुजरातमध्ये मोदींचे हस्तक म्हणून ते काम करीत होते. त्यामुळे मोदी (Narendra Modi) यांचे दिल्लीत आगमन झाल्यावर शहांनी तीच भूमिका राष्ट्रीय स्तरावर साकार करण्याची संधी मिळाली. शहा हे आव तर मोठा आणतात व भाषणेही तावातावाने करतात.
मात्र तो सगळा ‘आव’ आणि ‘ताव’ पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामुळे फुसका ठरला. पाकडे दहशतवादी अचानक आले व त्यांनी 26 हिंदू महिलांच्या कपाळावरचे कुंकू पुसून पलायन केले, ते आजतागायत सापडलेले नाहीत. हे दहशतवादी कोठे गेले हे आता अमित शहांनाही माहीत नाही. 26 महिलांचे कुंकू पुसणारे अतिरेकी पाकिस्तानात गेले? हवेत विरले? जमिनीत गडप झाले की भाजपमध्ये गेले?
याचा खुलासा शहा करीत नाहीत व तेच शहा महाराष्ट्रात येऊन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन उठाठेव करीत आहेत. शहा महाराष्ट्रात येऊन म्हणाले, ‘‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी पंतप्रधान मोदींना गळ्याशी लावले असते.’’ शहा यांचा हा भ्रम आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी सगळ्यात आधी 26 महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसल्याचा ठपका ठेवून अपयशी गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागितला असता, अशा शब्दात शहांवर हल्लाबोल केला आहे.
तर पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) थेट फोन लावून त्यांनी खणखणीतपणे बजावले असते, ‘‘मोदीजी, 26 महिलांचे कुंकू पुसले ही गृहखात्याची निष्क्रियता आणि बेफिकिरी आहे. अशा अपयशी गृहमंत्र्याला लगेच हाकलून द्या.’’ गृहमंत्र्यांना गेट आऊट करण्यासाठी बाळासाहेबांनी रान उठवले असते. बाळासाहेबांनी जाहीरपणे प्रश्न विचारला असता, ‘‘26 हिंदूंची हत्या करणारे अतिरेकी अद्यापि मोकाट का आहेत?
ते अद्यापि पकडले जात नाहीत याला जबाबदार कोण? गृहमंत्री हा फक्त विरोधकांचे पक्ष फोडण्यासाठी खुर्चीवर बसवला आहे काय? अशा प्रश्नांची सरबत्ती बाळासाहेबांनी नक्कीच केली असती. 26 हिंदूंच्या हत्यांकडे डोळेझाक करून ‘सिंदूर’ कारवाईचे राजकारण करणाऱ्या मोदींना बाळासाहेबांनी मिठी मारली असती असे शहांनी सांगणे हा बाळासाहेबांचा अपमान आहे, असं सामनात म्हटलं आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.