

Pune Election: ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात मकर संक्रातीचा सण आला असून, या काळात उमेदवाराकडून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेट वस्तूंचे प्रलोभन दिले जाते. त्यावर बंदी असतानाही शहरात भेट वस्तू वाटप बिनधास्तपणे सुरु आहे. त्याचे व्हिडिओ स्टेटसवर ठेवले जात आहेत. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असले तरी महापालिका प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक रंगात आली आहे. प्रभागात सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राज्यातील अनेक नेते पुण्यात प्रचारासाठी येत आहेत. आरोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. त्यास जोरदार प्रत्युत्तरही दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्याकडे जात असून, मंगळवारी (ता. १३) सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्याचे प्रयत्न उमेदवाराचे सुरु आहेत.
यंदाच्या वर्षी मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजे १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांत आली आहे. यानिमित्ताने महिलांना सुवासिनीचे वाण म्हणून भेटवस्तू दिल्या जातात. त्यासाठी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने मतदारांना प्रलोभन देण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी मकरसंक्रांतीचा वाण, भेटवस्तू देऊ नयेत असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.
सध्या शहरात अनेक उमेदवारांकडून असे कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. पण उमेदवाराच्या निकटवर्तीयांकडून महिलांना भेटवस्तू वाटप केले जात आहे. त्यावेळी उमेदवाराचा गुपचूप प्रचार केला जात आहे. वस्ती भागातील महिलांना गटागटाने बोलावून भेट वस्तू दिल्या जात आहेत. काही ठिकाणी रात्री, तर काही ठिकाणी दिवसा हे प्रकार घडत आहेत. पण महापालिकेच्या भरारी पथकांना आत्तापर्यंत असा एकही प्रकार सापडलेला नाही.
शहरात अनेक ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना प्रशासनाने मात्र, त्याकडे डोळेझाक केल्याचे चित्र आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये संबोधित प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात ही कारवाई येते. पण कारवाई केली जात नसल्याने आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे.
महापालिका निवडणुकीत माझी भूमिका ही मॅनेजरसारखी आहे. निवडणूक यंत्रणा राबविणे, कारवाई करण्याचे अधिकार हे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आहेत, असे वक्तव्य महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत केले. मतदार याद्यांमधील दुबार नावे, उमेदवारांचा अर्ज दाखल करणे, त्यावरील आक्षेप, थकबाकीचे ना हरकत प्रमाणपत्र देणे व त्यावरील आक्षेप यावर निर्णय घेण्याचे अधिकार हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आहेत. तेथे आपण काही करून शकत नाही. तसेच माझ्याकडे निवडणूक प्रक्रियेबाबत कोणाचीही तक्रार आलेली नाही. प्रशासन निःपक्षपणे निवडणूक प्रक्रिया राबवत आहे, असेही नवल किशोर राम यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.