
Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर राज्यात 5 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर सर्वकाही आलबेल आहे असे वाटत असताना गेल्या दोन महिन्यापासून महायुतीमध्ये या-ना त्या कारणाने धुसफूस पहायाला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून शिवसेनेतील मंत्र्यांकडे असलेल्या खात्यावरून धुसफूस सुरु आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकंडील उद्योग खात्यात तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकंडील परिवहन खात्यातील काही निर्णयावरून भाजपचा हस्तक्षेप वाढला असल्याने याबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. त्यानंतरही महायुतीमधील भाजप (Bjp), एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु आहे. या सर्व बाबीचा परिणाम राज्य सरकारच्या कारभारावर होत आहे. राज्यातील जनतेने महायुतीच्या पारड्यात मोठे बहुमत दिले आहे. त्यामुळे जनतेच्या सरकारकडून प्रचंड अपेक्षा आहेत. मात्र, दुसरीकडे या अंतर्गत कुरघोडीमुळे सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.
राज्य सरकार स्थापन झाल्यापासून धुसफूस सुरूच असून सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार, त्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आणि आता पालकमंत्र्यांच्या नियुक्ती, सरकारी बंगले यावरून तीन घटक पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राज्यातील महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे यांच्या शिवसेनेला काही धक्के दिले आहेत. विस्तारपुर्वी शिंदे यांना गृह खाते देण्यासही विरोध झाला होता. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्या परिवहन खात्यात हस्तक्षेप करीत एसटी बस खरेदीची निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतर सिडकोच्या अध्यक्षपदावरून शिंदे यांचे विश्वासू संजय शिरसाट यांची उचलबांगडी करण्यात आली. याशिवाय छोटे-मोठे अनेक निर्णय बदलण्यात आले. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पाहवयास मिळत आहे.
त्यानंतर नाशिक, रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवरून शिंदे गटाला भाजपने मोठा धक्काच दिला. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. याशिवाय शिंदे यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांकडेही नाराजी व्यक्त केल्याचे समजते. यानंतरच फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर असताना सामान्य प्रशासन विभागाला रायगड व नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याचा आदेश दिला. त्यानंतर येथील पालकमंत्र्यांच्या नियक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
त्यानंतरही भाजपचा हस्तक्षेप सुरूच आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकंडील उद्योग खात्याचे प्रधान सचिव व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबाबत नाराजी आहे. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकंडील परिवहन खात्यातील काही निर्णयावरून भाजपचा हस्तक्षेप वाढला असल्याने याबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील जवळीक वाढत चालली आहे. त्याचा फटका तर एकनाथ शिंदे यांना बसत नाही ना अशी चर्चा रंगली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना काही योजना सुरु केल्या होत्या. त्या योजना आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक-एक करुन बंद केल्या जात आहेत. त्यामुळे साहजिकच नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्यातच राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला वगळण्यात आले होते. राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात या समितीची सूत्रं आली आहेत. त्यांनी या सामितीमध्ये अजित पवार यांचा समावेश केला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांना समितीमध्ये स्थान दिले नव्हते. यावरुन शिंदे गटात तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दंडाची मारली होती. त्यानंतर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियमांत बदल करून एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समिती समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा सर्व घटनाक्रम पाहता भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मतभेद असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे येत्या काळात हे दोन्ही पक्षात रुंदावत चाललेली दरी कशी मिटवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.