
Mumbai News : प्रहारचे नेते बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकरमध्ये मंत्री होते. त्याकाळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी कडू यांनी खंबीरपणे साथ दिली होती. मात्र, शिंदे सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले होते. त्यानंतर कडू यांनी महायुती सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असून गुरूकूंज मोझरी येथे गेल्या चार दिवसांपासून बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाची दखल अद्यापही राज्य सरकारने घेतलेली नाही. त्यातच कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यावर आता प्रशासन काय भूमिका घेईल? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि प्रमुख अशी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची सुरुवातीपासूनची ओळख आहे. प्रहार हा पक्ष त्यांनी समाजातील दुर्लक्षित वर्ग, अपंग, शेतकरी आणि गरीब जनतेसाठी स्थापन केला आहे. त्यांच्या आंदोलनात्मक आणि आक्रमक शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. विदर्भातील एक आक्रमक नेतेअशी त्यांची आजही ओळख आहे. विदर्भातील जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आतापर्यंत शेतकरी, विद्यार्थी, अपंग व आरोग्याशी निगडित प्रश्नावर राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
अचलपूर मतदारसंघातून 2004 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून बच्चू कडू पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले होते. त्यानंतरच्या काळात 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील सलग चार वेळा त्यांनी विजय मिळवला. सलग चारवेळा आमदार असल्याने 2019 साली उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर बच्चू कडू यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. या काळात त्यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पद देण्यात आले होते. त्यांनी अपंग कल्याण, महिला व बालविकास, शालेय शिक्षण इत्यादी विभागांमध्ये काम केले.
त्यानंतरच्या काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यावेळी शिवसेनेत उभी फूट पडली मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत ४० आमदार गेले होते. त्यावेळी राज्यातील राजकीय भूकंपाचे केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असे होते.
या बंडाच्यावेळी सुरुवातीला प्रहारचे नेते बच्चू कडू हे नव्हते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या या संकटाच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून बच्चू कडू यांना गुवाहाटीला शिंदे गटासोबत जाण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये जाण्यासाठी पावले टाकली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच एका मुलाखतीप्रसंगी सांगितले होते. त्याचमुळे बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते.
तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि राज्यात महायुतीचे सरकार आले. सुरुवातीच्या काळात बच्चू कडू यांची मंत्रिपदी वर्णी लागली नाही मात्र, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता होती. मात्र त्यांना मंत्रीपदी संधी मिळाली नाही. मात्र, त्यांच्या मागणीनुसार अपंगासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले. मात्र, शेवटपर्यंत बच्चू कडू त्यांच्या मंत्रिपदाच्या मागणीवर ठाम होते. त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती. त्यासाठी सातत्याने संघर्ष करीत राहिले. मात्र, मंत्रिपद मिळाले नाही.
त्यांच्यातील व नवनीत राणा, रवी राणा यांच्यातील वादामुळे मंत्रिपद त्यांना मिळाले नाही. उलट त्यांच्यातील व महायुतीमधील दरी सातत्याने वाढतच गेली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे काम केले नाही. त्यामुळे ते महायुतीपासून दूर गेले. एवढेच नव्हे तर त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
गेल्या चार दिवसांपासून बच्चू कडू यांनी गुरूकूंज मोझरी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाची दखल अद्यापही राज्य सरकारने घेतलेली नाही. त्यातच कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडे एकेकाळी त्यांना साथ देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडून काय भूमिका घेतली जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.