
Eknath Shinde News : २०१९ ते २०२४ पर्यंत राज्याला दोन मुख्यमंत्री लाभले तेही शिवसेनेचे. पहिले उद्धव ठाकरे आणि दुसरे एकनाथ शिंदे. मात्र उद्धव यांच्यापेक्षा शिंदे यांचीच कारकीर्द अधिक चर्चेत राहिली. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना राज्यातील जनतेचा जो पाठिंबा मिळाला तितका ठाकरे यांना मिळाला नाही. झटपट निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) पाहिले जाते. इतक्या मोठ्या पदावर असतानाही ते सहज उपलब्ध होतात. लोकांना न्याय देतात किंवा लोकांचा मुख्यमंत्री आहे, अशी त्यांनी आपली प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले आहे.
जग झपाट्याने बदलते आहे. या बदलाबरोबरच राजकारण आणि पक्षही बदलले. ध्येयधोरणे आणि प्रचारही बदलला. राजकारणातही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक पक्ष धडपड करीत असतो. शिवसेना आणि भाजपची सलग पंचवीस वर्षे युती राहिली. या युतीने देश आणि राज्य पातळीवर अनेक चढउतार आणि जयपराजयही पाहिले.
तरीही युती कधी भंगली नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील युतीचा झंझावात लोकांनी पाहिला. या सर्वांच्या एकजुटीने अनेकदा अशक्य ते शक्य करूनही दाखविले. या सर्व ज्येष्ठ मंडळीनंतर मात्र युतीला घरघर लागली.
२०१४ नंतर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाते म्हणावे तसे मधुर राहिले नाहीत तसा आढावा यापूर्वीच्या लेखात घेतलाही आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला स्थान होते. काही मंत्रीपदेही होती. महत्त्वाची खाती नव्हती हे ही खरे. २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे दोन्ही कॉँग्रेसबरोबर गेले व थेट मुख्यमंत्री बनले. महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाला होता. ज्यावेळी ठाकरे मुख्यमंत्री झाले तो प्रयोग त्यांचेच सहकारी एकनाथ शिंदे यांना प्रयोग रुचला नव्हता. पण, पक्षासाठी ते सत्तेत राहिले.
विशेषत: त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर रागही होता. हेच कारण पुढे करीत त्यांनी बंड केले आणि भाजपला जाऊन मिळाले. भाजपनेही आपल्या जुन्या मैत्रीला जागत थेट शिंदेंनाच मुख्यमंत्री केले. भाजप दोन पाऊल मागे आला होता. त्यामागे उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्याचा डाव होता हे काही लपून राहिले नाही. त्यानंतर अजित पवारही भाजपला जाऊन मिळाले हे सगळे होऊ गेले होते. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्याला भाजपचे हे सगळे प्रयोग मान्य होते की नाही हे सांगता येत नाही. ते आजपर्यंत कधी त्याबाबत बोललेही नाहीत. पण, त्यांनी काळाची पावले ओळखून एक एक पाऊल सावधानते टाकत यश खेचून आणले, असे म्हणावे लागेल.
त्या तुलनेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपची साथ सोडताना काहीशी घाई केली असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत संयम बाळगला नाही असे नाही. तरीही शांत राहणे गरजेचे होते. देशात भाजपचा झंझावात आहे. केंद्रात मोदी-शहांशी टक्कर आपण घेऊ शकतो हा विश्र्वास त्यांच्यात कोठून आला? जर भाजपबरोबर राहिलो पक्षाच्या भविष्याला धोका आहे असेही त्यांना वाटले असावे. किती दिवस आपण भाजपबरोबर फरफटत राहायचे हा ही विचार त्यांच्या टीमने केला असेल. या सर्व गोष्टीचा परिणाम अर्थात पंचवीस वर्षाची मैत्री तोडण्यात झाली.
२०१९ मध्ये फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आपले म्हणजे पक्षाचे काही खरे नाही असा समज शिवसेनेचा झाला आणि पुढे शिवसेना दोन्ही कॉंग्रेस बरोबर गेली. हा प्रयोग भाजपला कदापीही आवडणारा नव्हता. पुढे अडीच वर्षे महाआघाडी सरकारला महायुतीने नीट कारभारच करू दिला नाही. फडणवीस यांच्यासारखा विरोधी पक्षनेता समोर असल्याने त्यांनी ठाकरेंना सळो की पळो करून सोडले. शिवसेना खिळखिळी करण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. एके दिवशी शिंदे यांनीही पक्षाला जय महाराष्ट्र केला. ते मुख्यमंत्री बनले. जर शिंदे उद्धव यांच्याबरोबर राहिले असते तर आज काय झाले असते याचा विचारच केलेला बरा !
ठाकरे बरोबर असले काय किंवा नसले काय? त्याने काहीच फरक पडत नाही याचा अंदाज देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या चतुर नेत्याने ठरविले असावे. ठाकरेंच्या ऐवजी शिंदे आणि शिवसेना पक्ष बरोबर असेल तर एक दिवस लढाई आपण जिंकू हा विश्र्वास त्यांनी सार्थ ठरविला. एकनाथ शिंदे यांनीही उद्धव यांच्या मागेमागे फिरण्यात काही अर्थ नाही. देशात मोदींची लाट आहे आणि ती लवकर हटणार नाही याचा काळजीपूर्वक विचार करून त्यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला.
जर भाजप मागे असेल तर घाबरायचे काहीच कारण नव्हते. सत्तेचे भक्कम पाठबळ असल्याने आपण आणि आपल्या पक्षाला कोणताही धोका होणार नाही हे न ओळखतील तर शिंदे कसले. शेवटी तेही बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही त्यांनी वीस वर्षे घालविली होती. त्यामुळे आपल्या नेत्याचे सकारात्मक बाजू व नकारात्मक बाजू काय आहेत याची जाणीव होती. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे आजारपण कोरानाची साथ या सगळ्या संकटानंतर शिंदे योग्य वेळ येताच बाजूला झाले. भाजपच्या साथीने पक्ष तर टिकविला आहेच शिवाय महत्त्वाची पदेही त्यांना मिळाली. जर ते शिवसेनेत असते तर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले असते का? हा ही प्रश्न आहेच.
गेल्या दोन अडीच वर्षापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आहेत. हे दोन्ही नेतेही बलशाली आहेत. शिवसेनेत बंड करताना शिंदे यांनी अजित पवारांनाच लक्ष्य केले होते आणि तेच कारणही दिले होते. पण, पुढे महायुतीचा प्रयोग करताना त्यांनी अजित पवारांशीही जमवून घेतले. आज या त्रिमुर्तीनी इतिहास घडविला आहे. एकत्र येत लोकप्रिय योजना आणल्या. त्याचे मार्केटींग केले. कुठेही कमी पडले नाही. सहा महिन्यापूर्वी लोकसभेला मोठा हादरा बसल्यानंतरही हे तिघेही गप्प बसले नाही. राज्यातील लोकांची मने पुन्हा जिंकायची आणि आपणही जिंकायचे हा विढा त्यांनी उचलला
केवळ सहा महिन्यात महायुती सरकारची मलीन झालेली प्रतिमा त्यांनी उजळवली. लाडकी बहीण योजना आणून त्यांनी पहिला धक्का आघाडीला दिला. शेतकऱ्यांची वीज बील माफी असेल किंवा पिकविमा असेल. प्रत्येक घराला आधार देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला. मात्र अशा योजनांनी कोणतेही पुन्हा सत्तेवर येणार नाही असे आघाडीवाले म्हणत होते तसे झाले नाही. लोकप्रिय योजनांवर महायुती विशेषत: एकनाथ शिंदे स्वार झाले.
२०१९ ते २०२४ पर्यंत राज्याला दोन मुख्यमंत्री लाभले ते ही शिवसेनेचे. पहिले उद्धव आणि दुसरे शिंदे. मात्र उद्धव यांच्यापेक्षा शिंदे यांचीच कारकीर्द अधिक चर्चेत राहिली. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना राज्यातील जो पाठिंबा मिळाला तितका त्यांना मिळाला नाही. झटपट निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदेकडे पाहिले जाते. इतक्या मोठ्या पदावर असतानाही ते सहज उपलब्ध होतात. लोकांना न्याय देतात किंवा लोकांचा मुख्यमंत्री आहे अशी त्यांची प्रतिमा आहे.
इथे एका गोष्टीकडे लक्ष वेधावे लागेल की पक्ष फुटीनंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना ज्या उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी त्यांना गद्दार म्हटले. पन्नास खोकेचा आरोप केला. जे पन्नास आमदार फुटले तेथील जागा पुन्हा निवडून येतील का? असे प्रश्न सातत्याने विचारले जात होते. काहीवेळा असे वाटत होते की, गद्दारी केलेल्या आमदारांना शिवसेना धूळ चारेल पण, वास्तवात तसे काही झाले नाही. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना पुरून उरले. गेल्यावेळी जितक्या जागा जिंकल्या होत्या तितक्या किंवा जे पन्नास आमदार फुटले होते त्यापेक्षा सात जागा अधिक त्यांनी जिंकून दाखविल्या. म्हणजेच पक्षप्रमुख उद्धव यांना ‘हम भी कुछ कमी नही’ हे दाखवून दिले.
याचा अर्थ असा भाजपने शिवसेना संपविली नाही तर ती जिवंत ठेवली, असा काढावा लागेल. हे वास्तव उद्धव ठाकरे यांना मान्य होणार नाही. शिंदेंनी एक पाऊल मागे घेत भाजपशी जुळवून घेतले आहे. मोदी-शहांच्या गुडबुकमध्ये त्यांनी स्थान मिळविले आहे. देशातील आजच्या राजकारणाचा विचार केला मोदींचे वारे आहे ते कमी झाले नाही. केंद्रातील भाजपशी पंगा घेऊन काही फायदा नाही. प्रवाहाविरोधात पोहण्यापेक्षा प्रवाहाबरोबरच जाणे शिंदे ठरविले. काळाची पाऊले त्यांनी ओळखली असाच शिंदेंच्या राजकारणाचा अर्थ काढावा लागेल.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. २०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केले, तेव्हा त्यांना ५० आमदारांनी पाठिंबा दिला होता. अडीच वर्षांनी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिंदेंच्या पक्षाने ५७ जागी विजय मिळविला आहे. म्हणजे एक आमदार अधिक निवडून आणला आहे. पाच वर्षांपूर्वीपेक्षा शिंदे यांची कामगिरी उत्तमच राहिली आहे. यावेळी त्यांनी ८५ जागा लढविल्या आणि ५७ जागा आणल्या, म्हणजे स्ट्राईक रेटही उद्धव ठाकरेंपेक्षा उजवा ठरला आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.