Mumbai North-East loksabha News : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून विद्यमान खासदार मनोज कोटक यांना नाकारत भाजपने मिहिर कोटेचा यांची उमेदवारी अंतिम केली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत येथे आहे. मिहिर कोटेचा यांचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना आदित्य ठाकरे उपस्थित होते. युती तुटल्यावर ही जागा पहिल्यांदा जिंकण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाणार आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदरसंघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप (पश्चिम), घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, मानखुर्द, शिवाजीनगर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व मतदारसंघांचे वेगवेगळे प्रश्न, समस्या आहेत. महायुतीतील भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), रिपब्लिकन पक्ष (आठवले) आणि इतर घटक पक्ष यांनी येथे जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आम आदमी, कम्युनिस्ट आदी घटक पक्ष यांनीही मतदारसंघ पिंजून काढला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला अधिक वेग आला आहे. मुलुंड आणि घाटकोपर येथे गुजराती मतांचे प्राबल्य आहे. त्यामुळे कोटेचा यांनी विक्रोळी, घाटकोपर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिरकाव केला आहे. मानखुर्द, शिवाजीनगर येथे मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
भाजपने चाचपणी सुरू केली आहे. भांडुप, विक्रोळी, घाटकोपर येथे मराठी मतदार मोठ्याप्रमाणात आहे. घाटकोपर रमाबाई कॉलनी तसेच पश्चिमेच्या झोपडपड्यांमध्ये दलित मोठ्याप्रमाणात आहेत. तेथे भाजपने पाय पसरायला सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटानेही या विभागात जोरदार प्रचार चालविला आहे.
कोटक आणि पाटील यांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद एकत्र आली आहे. त्यामुळे भाजपचे कोटेचा त्याचा कसा मुकाबला करतात, हे पाहावे लागेल. दलित आणि मुस्लिम यांचा कल महाविकास आघाडीकडे दिसत असून महायुतीसाठी ती बाब अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. कोटेचा यांना यावेळी अधिकची ताकद लावावी लागेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोमय्यांचा निसटता पराभव
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांची अटीतटीची लढत झाली होती. सोमय्या यांचा विजय निश्चित होता. अखेरच्या क्षणाला मानखुर्द, शिवाजीनगर येथील पेट्या उघडल्या आणि चित्रच बदलले. संजय पाटील सुमारे साडेतीन हजार मतांनी विजयी झाले होते. सोमय्यांचा निसटता पराभव झाला होता.
प्रचारातील मुद्दे
- कांजूर डम्पिंग ग्राऊंडची समस्या
- झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास
- रखडलेला गोरेगाव मानखुर्द लिंक रोड
- उपनगरीय लोकलचा प्रश्न
- धारावीवासीयांच्या स्थलांतराला विरोध
- ट्रॅफिक कोंडी
Edited By : Umesh Bambare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.