
Marathi Asmita Morcha: मराठीचा मुद्द्यानं मुंबईत आणि परिसरात चांगलाच जोर धरल्याचं चित्र आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीच्यावतीनं मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन आज सकाळी मोर्चा काढला. या मोर्चाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला, दरम्यान पोलिसांनी हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला. पण मराठीच्या मुद्द्यावरुन निघालेल्या मोर्चात एकनाथ शिंदेंचे सहकारी असलेले शिवसेनेचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हजेरी लावली.
पण सरनाईक यांच्यासमोरच मोर्चेकरांनी 'जय गुजरात'च्या घोषणा दिल्या. तसंच 'पन्नास खोके, एकदम ओके' अशा घोषणा दिल्या आणि त्यांना मोर्चातून निघून जाण्यास भाग पाडलं. या सर्व घडामोडीतून एकनाथ शिंदेंचा डॅमेज कन्ट्रोलचा प्रयत्न फेल झाल्याची आता चर्चा सुरु झाली आहे.
महिन्याभरापूर्वी प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर इथं एका जाहीर कार्यक्रमात मुंबई आणि मराठी संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं होतं. मीरा-भाईंदरमध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या तोंडून आपोआप हिंदी भाषा सुरु होते. कारण मराठीतून हिंदीपर्यंत जाणं ही मोठी गोष्ट नाही. कारण ज्याला मराठी येतं त्याला हिंदी येतेच येतेच. तसंच ज्याला हिंदी येतं त्याला मराठी देखील येतं. यापूर्वी असं बोललं जातयं की, मराठी आमची मावशी आहे आणि उत्तर प्रदेशची हिंदी आमची आई आहे. पण आजकल आम्ही असं बोलतो की, मराठी आमची मातृभाषा आहे पण हिंदी आमची लाडकी बहीण आहे. आता तर हिंदी ही मुंबईची बोलीभाषा बनली आहे.
सरनाईक यांच्या या विधानावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, सरनाईक यांच्या तोंडी जी भाषा आहे ती भाजपची आणि अमित शहांची भाषा आहे. एकूणच सरनाईक यांच्यावर मराठी जनतेनं मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी कमी व्हावी या हेतूनं तसंच एकनाथ शिंदे यांनी नुकतंच पुण्यात आयोजित हिंदी भाषिकांच्या एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर 'जय गुजरात' अशी घोषणा दिली होती. त्यामुळं त्यांनाही मोठ्या प्रमाणावर टीकेला समोरं जावं लागलं होतं.
एकूणच या दोन्ही नाराजीच्या घटनांमुळं आपलं डॅमेज कन्ट्रोल करण्यासाठी मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसांनी काढलेल्या विराट मोर्चा पाठिंबा देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं घेतला आणि प्रताप सरनाईक यांनाच तिथं पाठवण्यात आलं. मीरा-भाईंदर हे ठाणे शहराचं उपनगर आहे. सरनाईक यांचा मतदारसंघ देखील ठाण्यातील ओवळा-माजिवाडा हा आहे. त्यामुळं आमच्या कार्यक्षेत्रात पिछेहाट होऊ नये, याच उद्देशानं सरनाईक यांनी मनसे आणि मराठी एकीकरण समितीनं आयोजित केलेल्या मराठी अस्मिता मोर्चाला हजेरी लावली, असा निष्कर्षही यातून निघू शकतो.
दरम्यान, सरनाईक यांना मोर्चात सहभागी झाल्याचं पाहिल्यानंतर स्थानिक मराठी लोकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. एकनाथ शिंदेंनी घोषणा दिलेल्या जय गुजरातचा त्यांनी मुद्दाम डिवचण्यासाठी पुनरुच्चार केला. तसंच शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदेंसह त्यांच्या ४० सहकारी आमदारांवर जे आरोप झाले. तोच आरोप 'पन्नास खोके एकदम ओके' पुन्हा मोर्चेकरांनी केला. त्यामुळं प्रताप सरनाईक यांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला.
अंतिमतः मनसे आणि मराठी एकीकरण समितीनं काढलेला भव्य मोर्चा आणि त्यात महाराष्ट्रतील शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याऱ्या राज्य शासनाचा अर्थात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचा मोर्चेकरांनी निषेध नोंदवला. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाचा फायदा नेमका कोणाला होऊ शकतो, हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.