
Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसापासून महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. रायगड येथे होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शाह शुक्रवारी सायंकाळी पुणे येथे मुक्कामी आले होते. त्याचवेळी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा केली. त्याचवेळी महायुतीमधील घटक पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती.
त्यानंतर शनिवारी रायगडावरील कार्यक्रमाच्यानिमिताने भाषण करण्याची एकनाथ शिंदेंना अचानक संधी देण्यात आली. हे सर्व नाराजीनाट्य समोर आल्यानंतर शनिवारी दुपारी अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या सर्व घडामोडीनंतर तरी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटलेला नाही. त्यावर शनिवारी रात्री उशिरा व रविवारी सकाळी अमित शाह व एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली तरी रायगडच्या पालकमंत्रीपदाचे भिजत घोंगडे कायम आहे.
रायगड जिल्ह्यात स्थानिक राजकारण फारच गुंतागुंतीचे आहे. येथे शिवसेना (ठाकरे गट), शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप (BJP) यांच्या स्थानिक वर्चस्व टिकवण्यासाठी मोठी रस्सीखेच दिसते. पालकमंत्रिपद हे फक्त एक पद नसून, ते जिल्ह्यातील विकासाच्या निधीवर, प्रशासकीय निर्णयांवर प्रभाव टाकणारे आहे. त्यामुळे कोणताही पक्ष किंवा गट सहजासहजी हे पद दुसऱ्याला देण्यास तयार नाही. त्यामुळेच या वादामागे केवळ सत्तासमीकरणांचा विषय नाही, तर काही सखोल राजकीय आणि सामाजिक कारणंही दडलेली आहेत.
रायगड जिल्हा हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी ठाकरे गटाचे बळ अजूनही शाबूत आहे. त्यामुळे जर शिंदे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी पालकमंत्री नेमताना जनतेतून नाराजीचा सूर उमटू नये, याची काळजी घेताना दिसत असल्याने त्यामुळे निर्णय घेणे अधिकच अवघड झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगडमधील दौऱ्यावेळी भाजपचे मित्र पक्ष असलेले एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी काही केल्या लपून राहिली नाही. रायगड येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने या तीन पक्षातील रुसवे-फुगवे दिसून आले. या कार्यक्रमात भाषण करणाऱ्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नव्हते.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यांनतर त्यांच्यापूर्वी एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी दिली. शिंदेंनी यावेळी भाषण केले. मात्र, एकंदरीतच या निमित्ताने नाराजी काही लपून राहिली नाही. त्यातच अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे सर्वांच्या लक्षात याठिकाणी घडलेला प्रकार समोर आला.
त्याचवेळी केंद्रीय मंत्री शहा यांची शुक्रवारी रात्री पुण्यात भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी त्यांच्याकडील प्रकल्पाना निधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. निधी वाटप तसेच रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत न्याय मिळत नसल्याची भावना शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेऊन कानावर घातली.
निधी वाटप व पालकमंत्री पद हे दोन्ही विषय अजित पवार गटाशी संबंधित आहेत. त्यामुळे यावर अद्याप तोडगा निघालेला नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यातच शनिवारी दुपारी केंद्रीय मंत्री शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. दुसरीकडे मंत्री शिवसेनचे मंत्री भरत गोगावले यांना देखील भोजनाचे निमंत्रण तटकरे यांनी दिले होते. त्यानंतरही गोगावले बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी मतदारसंघातील हनुमान जयंतीच्या कार्यक्रमास हजेरी लावली. त्यांच्या या कृतीमधून पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसल्याचे जाणवत होते.
या सर्व घडामोडीनंतर तरी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल असे वाटत असताना यावर स्नेहभोजनावेळी काहीच चर्चा झाली नसल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर त्यावर शाह यांच्या उपस्थित चर्चा झाली. त्यावेळीही काही तोडगा निघाला नाही. रविवारी सकाळी दहानंतर पुन्हा एकदा शाह व एकनाथ शिंदे यांच्यात या विषयी पुन्हा चर्चा झाली तरी रायगडच्या पालकमंत्रीपदाचे भिजत घोंगडे कायम आहे.
गेल्या तीन दिवसापासून केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे नक्कीच महायुतीमधील तीन घटक पक्षातील संबंध ताणले गेले असल्याचे स्पष्ट होत आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट आणि स्नेहभोजन झाल्यानंतरही वाद कायम राहणं हे महत्त्वाचं आणि लक्षवेधी आहे. सहसा अशा भेटींमुळे राजकीय समीकरणं जुळून येतात किंवा किमान काही ठोस निर्णय होताना दिसतात. पण इथे मात्र तसे घडले नाही.
हे प्रकरण आता फक्त एक साधे पदभाराचं नाही, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या अंतर्गत समतोलाचे प्रतीक झाले आहे. रायगडसारख्या संवेदनशील आणि ऐतिहासिक जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा, यावरून स्थानिक पातळीवर आणि पक्षांतर्गतही तणाव वाढलेला दिसत आहे. त्यामुळे या तीन पक्षातील वादावर आता अमित शाह कशाप्रकारे तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.