Mumbai News : गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर जोरात चर्चा सुरु आहेत. त्यामुळे एकीकडे या चर्चेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर राजकीय विश्लेषकांचे मते मात्र संमिश्र आहेत. काही जणांना वाटते की दोघे एकत्र आल्यास मराठी मतांचे विभाजन थांबेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल, तर काहींना हे प्रत्यक्षात शक्य वाटत नाही.
वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते तर महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला केवळ 20 जागा मिळाल्या, तर राज ठाकरे यांच्या मनसेला एकही जागा मिळाली नाही. या पराभवाचे एक कारण म्हणजे मराठी मतांचे विभाजन, जे दोघे जण वेगळे लढल्यामुळे झाले. त्यामुळे या दोन्ही पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयारी सुरु केली आहे.
सुरुवातीला राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे महायुतीसोबत जाईल असे सर्वानाच वाटत होते. मात्र, महायुतीकडे मनसेसाठी सध्या तरी जागा दिसत नाही. येत्या काळात महायुतीमध्येच मुंबई महापालिकेच्या जागावाटपावरून भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठा संघर्ष उफाळून येणार असल्याने त्या ठिकाणी मनसेला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने आता ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढतील यावरुन चर्चा सुरु झाली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मुंबईत दहा जागा जिंकता आल्या आहेत. त्यानुसार जर पहिले तर सध्यस्थितीत शिवसेनेला या विधानसभा मतदारसंघातील 50 ते 60 जागा मिळवणे अवघड जाणार नाही. मात्र, त्यापुढे एक-एक जागा जिंकताना मात्र मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची मुंबईत मोठी ताकद होती. मात्र, आता भाजपची ताकद मुंबईत वाढली आहे. शिवसेनेत दोन वर्षापूर्वी पडलेल्या उभ्या फुटीनंतर ठाकरे गटासाठी पूर्वीप्रमाणे निवडणूक आता सोपी राहिली नाही. त्यामुळे या सगळया परिस्थितीचा विचार केला तर शिवसेना व मनसेला मराठी मतावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळेच आता ठाकरे बंधू एकत्र येतील, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला स्पेस नाही. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना व मनसेमध्ये फारसे सख्य नसल्याने महायुतीमध्ये काही तडजोड होऊन राज ठाकरेंना सोबत घेता येईल का या दृष्टीने चाचपणी करण्यात आली. त्यासाठीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला जाऊन भेट घेतली. मात्र, त्या दोघांच्या भेटीनंतरच महेश मांजरेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत आली.
त्यामध्ये मराठी माणसाच्या मुद्दयावरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दाखवली. त्यानंतर अवघ्या तासाभरातच संधी साधत उद्धव ठाकरे यांनी सकरात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे सध्या तरी ठाकरे बंधू एकत्र येतील, असा कयास राजकीय वर्तुळात लावला जात आहे.
दुसरीकडे यापूर्वी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप व शिवसेना युती तुटल्यानंतर अचानक मनसे व शिवसेना युतीची चर्चा झाली होती. काही जागांचे वाटपही झाले होते. मात्र, ऐनवेळी मनसे व शिवसेना यांच्यातील बोलणी फिस्कटली होती. त्यामुळे या युतीबाबत राजकीय वर्तुळातून शंका उपस्थित केली जात आहे.
राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते, शिवसेना व मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. भविष्यकाळात बाळासाहेब ठाकरे यांचा नावलौकिक टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही भावांना एकत्रित यावे लागणार आहे. उद्धव व राज ठाकरे यांची वय पाहता हे दोघेही भविष्यात ठाकरे ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी योग्य निर्णय घेतील, असे वाटते. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची किमया व त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी नक्कीच त्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.
दोन्ही ठाकरे बंधूंची इगो जरी मोठी असले तरी ते एकत्र आल्यानंतर बरेच प्रश्न सुटणार आहेत. सध्या मुंबईत मराठी मतांची टक्केवारी ३५ टक्के इतकी आहे. तर मुस्लिम मतदार १९ टक्के इतके आहेत. दोन्ही मिळून जवळपास ५४ टक्के मते आहेत. मात्र, हे दोन्ही समाजाची एक गट्टा मतदान कोणत्याच एका पक्षाला होणार नाही. मात्र, मनसे व शिवसेनेत मराठी मताचे होणारे विभाजन टळणार आहे, असेही देसाई म्हणाले.
राज व उद्धव ठाकरे एकत्रित आल्यानंतर हिंदूंची मते त्यांना पडतील. मात्र, मुस्लिम समाजाचे मतदान कॊणाच्या पारड्यात पडणार याकडेही लक्ष असणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी होता. मात्र, आता नव्या समीकरणनंतर काय फरक पडणार याची देखील गोळाबेरीज केली जाईल. उत्तर भारतीय व गुजराती मते कोणासोबत जाणार याचे देखील समीकरण या निवडणुकीत महत्वाचे असणार आहे.
दुसरीकडे राज व उद्धव यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढली तर त्यांची महायुतीसोबत सरळ लढत होणार का काँग्रेस आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढणार यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे. त्यामुळे येत्या काळात ही लढत तिरंगी असणार की सरळ लढत होणार यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे. काँग्रेसची मुंबईत ताकद आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नगण्य आहे. त्यामुळे या सर्व समीकरणाचा विचार करूनच राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा निर्णय घेतील, असे हेमंत देसाई यांनी स्पष्ट केले.
एकंदरीत मुंबईतील नागरिकांची लोकभावना पाहिली तर राज व उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत या दोघांना मोठा फायदा होईल. मुंबईतील नागरिकांच्या मते, केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षाला प्रखरपणे विरोध कोणीही करताना दिसत नाही. त्यामुळे राज व उद्धव ठाकरे हे दोघेच सत्ताधारी मंडळीला प्रभावीपणे विरोध करू शकतील, असे वाटते.
त्यासोबतच येत्या काळात भाषणाच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा असलेला करिश्मा व त्याला उद्धव ठाकरे यांची संघटनात्मक पातळीवरील जोड या दोन्हीची सांगड घालता आली तर निश्चितच आगामी निवडणुकीत त्यांना फायदा होईल. येत्या काळात दोघांनी एकत्र आल्यास मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना फायदा होऊ शकतो, असे चित्र दिसत असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची शक्यता सध्या कमी असली तरी दोघांमध्ये वैयक्तिक संबंध चांगले आहेत. सध्या तरी राजकीय मतभेद आणि भिन्न पक्षीय भूमिका यामुळे त्यांच्यातील राजकीय एकत्र येण्याची शक्यता अल्प आहे. तथापि, राजकारणात काहीही निश्चित नसते, त्यामुळे भविष्यात परिस्थिती बदलू शकते, असे देखील मते काही विश्लेषकांनी व्यक्त केली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.