Indian politics : जवळपास 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता सलग 11 वर्ष देशाचे पंतप्रधान. नरेंद्र मोदी यांची ही राजकीय वाटचाल खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे. 26 मे 2014 रोजी त्यांनी देशाचे नेतृत्व स्वीकारले. तेव्हापासून त्यांची ही कारकीर्द देशाच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक वाटचालीत निर्णायक ठरली आहे. त्यांच्या या लक्षवेधी कारकिर्दीत भाजपसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही सिंहाचा वाटा राहिला आहे.
संघाशी सुरुवातीपासूनचा संबंध
मोदींना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती. यातूच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित झाले. त्यांनी संघाचे स्वयंसेवक म्हणून प्रशिक्षण घेतले. 1970-80 च्या दशकात त्यांनी गुजरातमधील विविध जिल्ह्यांत प्रचारक म्हणून संघासाठी पूर्णवेळ काम केले. त्यामुळे संघटनात्मक कामकाज, लोकांशी संवाद आणि नेतृत्व कौशल्ये यांचा त्यांना गाढा अनुभव मिळाला.
संघामध्ये प्रचारक म्हणून काम करत असताना मोदींनी शिस्त, संघटन कौशल्य आणि कठोर निर्णय क्षमता यांची चुणूक दाखवली. पुढे संघाच्या विश्वासामुळेच त्यांना पुढे आणले गेले. गुजरातसह देशभरात भाजपच्या (BJP) प्रचार यंत्रणेत संघाचे कार्यकर्ते "बूट्स ऑन ग्राउंड" म्हणून काम करत होते. प्रचार, मतदान यंत्रणा, कार्यकर्ता व्यवस्थापन यामध्ये संघाचा सक्रिय सहभाग होता.
आणीबाणी आणि संघटनेतील नेतृत्व
1977 मध्ये आणीबाणीच्या काळात, मोदींना "गुजरात लोक संघर्ष समिती"चा सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था मानली जाते. हळू हळू मोदी भाजपमध्येही सक्रिय होऊ लागले. स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्याकडे येऊ लागली. 1990 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी राम रथ यात्रा आणि 1992 मधील एकता यात्रेत सहभाग घेतला.
1991 च्या निवडणुकांनंतर नरेंद्र मोदींना (Narendra Modi) दिल्लीला बोलावण्यात आले आणि राष्ट्रीय स्तरावर संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांनी हिमाचल, उत्तर प्रदेश, पंजाब अशा राज्यांतील निवडणूक आयोजनाचे काम पाहिले. त्याच काळात अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी त्यांचे संबंध दृढ झाले.
1995 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. 1995 ते 1998 या कालावधीत गुजरात भाजपमध्ये गटबाजी सुरू होती. यावेळी मोदींनी बॅकएंड स्ट्रॅटेजिस्ट म्हणून भूमिका बजावली. संघाच्या मध्यस्थीने केशुभाई पटेल यांचे स्थान टिकवले. 1998 मध्ये त्यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून बढती देण्यात आली.
मुख्यमंत्रीपदाची निवड
2001 साली गुजरातमध्ये भूकंप झाल्यानंतर सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर आरएसएस आणि भाजपमध्ये चर्चा होऊन नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय झाला. काही वरिष्ठ नेते या निर्णयाच्या विरोधात होते, पण संघाच्या ठाम भूमिकेमुळे मोदी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी ते विधानसभेचे सदस्य नव्हते, परंतु काही महिन्यांत त्यांनी निवडणूक जिंकून आपले स्थान पक्के केले.
सलग तीन विधानसभा विजय आणि हिंदुत्ववादी नेता म्हणून प्रतिमा
गोध्रा घटनेनंतर 2002 मध्ये झालेल्या दंगलीमुळे मोदी सरकारवर टीका झाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना "राजधर्म" पाळण्याचा सल्ला दिला. काही काळ त्यांना पदावरून हटवण्याची चर्चा झाली होती. मात्र, संघ आणि गुजरात भाजपने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2002, 2007, आणि 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या. याच काळात मोदींनी "विकासपुरुष" अशी प्रतिमा निर्माण केली जी उद्योगजगत आणि मध्यमवर्गात लोकप्रिय ठरली. गुजरात मॉडेलची देशभर चर्चा होऊ लागली. व्हायब्रंट गुजरातचे प्रोजेक्शन होऊ लागले.
2012 ची निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी यांनाही राष्ट्रीय राजकारण खुणावू लागले. त्यावेळी भाजपमध्येही पंतप्रधानपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून मोदींचे नाव पुढे आले. जून 2013 मध्ये मोदींना भाजपच्या राष्ट्रीय प्रचार समितीचा प्रमुख बनवण्यात आले. त्यानंतर अवघ्या चार महिन्यात त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आले.
मोदी हिंदुत्ववादी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात आणि सक्षम नेतृत्व देऊ शकतात, असे संघाचे मत होते. त्यामुळे मोदी यांचे लवकरात लवकर नाव जाहीर करावे या मताचे संघाचे सर्वच नेते होते. त्यावेळी मोदी यांच्या नावाला लालकृष्ण अडवाणी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांचा विरोध होता. पण राजनाथ सिंह, अरुण जेटली, अमित शहा अशा ज्येष्ठ नेत्याचा मोदी यांच्या नावाला पाठिंबा होता.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत "अच्छे दिन", "सबका साथ, सबका विकास" या घोषणांवर भाजपने जोर दिला. तर संघाने देशभरात कार्यकर्त्यांची फळी उभी केली. ही निवडणूक संघटनात्मक आणि रणनीतिच्या दृष्टिकोनातून यशस्वी ठरली. सोशल मीडियाचाही या निवडणुकीत अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आला.
यात भाजपने दणदणीत विजय मिळविला. एकट्या भाजपला 282 जागांवर यश मिळाले. 1984 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले होते. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 आणि 2024 या लोकसभा निवडणुकांत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला.
एकूणच नरेंद्र मोदी यांची ही निवड संघ व भाजपच्या संयुक्त निर्णय प्रक्रियेतून झाली होती. संघाचा या संपूर्ण प्रवासात निर्णायक सहभाग होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.