Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये अखेरच्या क्षणी एकमत झाले. त्यामुळे शुक्रवारी पार पडलेल्या झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकला आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषा गायकवाड यांनी एकहाती विजय मिळवला. धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता धाराशिव झेडपीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटता फुटता राहिली आहे. दुसरीकडे भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात प्रचंड आदळाआपट केल्यानंतरही आमदार तानाजी सावंत यांना निमुटपणे महायुतीसोबत जावे लागले आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल लागून महिना उलटला तरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली नव्हती. त्यामुळे मतमोजणी झाल्यानंतर लगेचच विजयी उमेदवारांना घेऊन भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेतेमंडळी सहलीवर गेले होते. त्यावेळेसपासून धाराशिव झेडपीतील सत्तास्थापनेवरून भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच दिसून येत होती. विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील जनतेनेच सरळ सत्ता कोणाच्या हाती न देता त्रिशंकू अवस्था करीत कौल दिला होता. त्यामुळे जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळाली.
धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपचे 19, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6, अपक्ष व इतर पक्षाचे 4 असे एकूण 44 सदस्य महायुतीच्या बाजूने होते. तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे 7, काँग्रेस 3 असे 10 महाविकास आघाडीचे संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीमधील भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेने वेगवेगळी जुळणी केली होती.
धाराशिवचे राजकारण पाहता याठिकाणी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील व शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यात आडवा विस्तव जात नाही. त्यामुळेच तानाजी सावंत यांनी पहिल्या दिवसापासूनच भाजपसोबत जाण्यास नकार दर्शवला होता. त्यामुळे सावंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जवळीक ठेऊन सत्तास्थापन करणार का? याबाबत उत्सुकता लागली होती. मात्र शिंदे सेनेतील 7 सदस्य सावंत यांचे होते तर इतर आठ जण महायुती म्हणून निवडून आले होते. त्यामुळे ते आठ सदस्य भाजपसोबत जाण्यावर ठाम राहिले. दुसरीकडे महाविकास आघाडीतील दहा सदस्यांनी सावंत यांना पाठिंबा दर्शवला असता मात्र, त्यासाठी एकनाथ शिंदे यांचा निर्णय महत्त्वाचा होता.
शिवसेनेच्या धाराशिव जिल्हयातील सर्वच नेत्यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन एकत्र असल्याचे दाखवले होते. त्याच वेळी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर देखील दावा केला होता. त्यामुळे एकीकडे उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यासोबतच यावेळी तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषदेतील गटनेता म्हणून त्यांचे समर्थक विकी सावंत यांची निवड करीत व्हिपचे अधिकार त्यांच्याकडे ठेवत बाजी मारली असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन सदस्य सुरवातीपासून भाजपसोबत सहलीवर गेले होते. त्यामुळे शिवसेनेची अडचण झाली होती.
त्यातच गेल्या चार दिवसापासून धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला होता. तर गटनेते म्हणून विकी चव्हाण हे सभागृहात पक्षाचा व्हीप जारी करणे तसेच पक्षाची ध्येयधोरणे प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी पार पाडणार होते. त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायकी ठरणार होती. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती तर दुसरीकडे अध्यक्षपदाबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे झेडपी अध्यक्षपद शिंदेंची शिवसेनेकडे राहणार असे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी दुपारपर्यंत सीएम फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याबाबत बैठक झाली नव्हती. त्यामुळे झेडपी अध्यक्ष पदाबाबत सस्पेन्स कायम होता. धाराशिव झेडपीचा अध्यक्ष भाजपच्या अर्चना पाटील की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उषा गायकवाड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शेवटच्या क्षणी महायुतीसोबतच्या तहात शिंदे यांची शिवसेना बॅकफूटवर गेली.
गेल्या महिनाभरापासून सहलीवर असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य गुरुवारी धाराशिवमध्ये दाखल झाले. शुक्रवारी निवड होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच अचानक निरोप आला. त्यानुसार या निवडणुकीसाठी अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष नको म्हणून त्यांच्या विरोधात प्रचंड आदळाआपट केल्यानंतरही आमदार तानाजी सावंत यांना निमुटपणे महायुतीसोबत जावे लागले असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यातच भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा फॉर्म्युला सांगितला जात नसल्याने त्याबाबत सस्पेन्स कायम आहे. विशेषतः महायुतीकडून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे सर्व नेतेमंडळी उपस्थित होते. मात्र, यावेळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
शुक्रवारी झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील या विजयी झाल्या त्यांना 55 पैकी 45 इतके मतदान झाले. त्यामध्ये भाजप 19, शिंदे शिवसेना 15, राष्ट्रवादी काँग्रेस 6, अपक्ष 5 असे 45 मते पडली तर त्यांच्या विरोधातील उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या कांचनमाला सांगवे यांना 9 मते पडली तर काँग्रेसचा एक सदस्य गैरहजर राहिला. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषा गायकवाड यांनी एकहाती विजय मिळवला. त्यांना 55 पैकी 45 इतके मतदान झाले. तर विरोधातील काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांना दहा मते पडली. अध्यक्ष पदाचे मतदान होताना गैरहजर असलेल्या काँग्रेसच्या सदस्या लता शिंदे उपाध्यक्ष निवडीवेळी हजर राहिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.