Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Devendra Fadnavis Sabha : शिंदे-सावंत कुटुंबाच्या एकीचे बळ मतांमध्ये दिसलं पाहिजे; देवेंद्र फडणवीसांची ताकीद

Vijaykumar Dudhale

Solapur, 28 April : माढा तालुक्यातील दोन शक्ती आता एकत्रित आल्या आहेत. शिंदे आणि सावंत कुटुंबीय एकत्र आले आहेत, त्यामुळे शिंदे आणि सावंत कुटुंबीयांना मी सांगतो की, आता तुमच्या एकीचे बळ मला मतांमधून दाखवा. मतांमध्ये ती ताकद आणि बळ मला दिसलं पाहिजे, अशी विनंतीवजा ताकीद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे आणि सावंत यांना दिली.

माढा लोकसभा मतदारसंघाचे (Madha Loksabha Constituency) भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता. 28 एप्रिल) माढा तालुक्यातील वाकाव येथे देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला व्यासपीठावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, रश्मी बागल, उमेदवार निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढ्यात शिंदे कुटुंबीय आणि सावंत कुटुंबीय एकत्र आले. कारण, मोदी है तो मुमकीन है, असे सांगत आता तुमच्या एकीचे बळ मला मतांमध्ये दिसलं पाहिजे. या निवडणुकीतील मत तुम्ही भाजपसाठी नव्हे; तर मजबूत भारत बनविण्यासाठी देणार आहात, हे लक्षात ठेवा. तुम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच नव्हे; तर मोदींना मत देणार आहात, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस म्हणाले, देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. देशातील जाणत्या नेत्यांना माहिती आहे की, देशाला पुढे नेण्याचे काम फक्त मोदीच करू शकतात. त्यासाठीच शिंदे आणि सावंत हे एकत्र आले आहेत. ही लढाई मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामधील नाही. ही देशाची लढाई असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आहे. तालुक्याचा नेता कोण ही ठरविण्याची ही निवडणूक नाही.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले. कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी भीमा नदीत आणून ते दुष्काळी भागाला दिले जाणार आहे. सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या या योजनेला आम्ही तत्वतः मान्यता दिली आहे. जागतिक बॅंकेनेही त्याला अर्थपुरवठा करण्याचे मान्य केले आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर सोलापर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, ऊस कारखानदारीसाठी नरेंद्र मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. साखर कारखान्यावरील इन्कम टॅक्सचा प्रश्न काँग्रेस सरकार सोडवू शकले नाही. शरद पवार हे शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटायचे आणि आता आम्हाला शब्द मिळाला आहे, आता इन्कम टॅक्स रद्द होणार, असे सांगितले जायचे. पण, तो कारखान्यावरील टॅक्स काँग्रेस सरकारने कधीही रद्द केला नाही. मात्र, देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हा 25 हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ केला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला

समाजातील प्रत्येक घटकांना मोदी यांनी मदत केली आहे. एक मजबूत भारत नरेंद्र मोदी यांनी तयार केला आहे, त्यामुळेच आज आम्हाला अमेरिकेपुढे जाऊन रडावं लागत नाही. पाकिस्तान आणि चीनही आपल्याकडे वाकड्या नजरेनी पाहत नाही. तसा भारत मोदींनी बनवला आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT