CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena Mahaadhiveshan : जिथून डरकाळी निघायची, तिथून शिव्याशाप येतात..! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बरसले...

उमेश भांबरे

Kolhapur News : शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन कालपासून कोल्हापुरमध्ये सुरू आहे. आज महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समारोपाच्या भाषणात नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

जेव्हा सेना आपल्याला मिळाली तेव्हा काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली, छातीत धडकी भरली. तेव्हा काही लोकांच्या मनात आपली संपत्ती जाईल, असा विचार आला. पण आम्हाला तुमची संपत्ती नको, बाळासाहेबांचा विचार हीच आमची संपत्ती आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हाला पन्नास खोके म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडून हिणवलं जात आहेत. पण त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात आणि याचा सगळ्यात मोठा साक्षीदार मी आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळाल्यानंतर माझ्यासमोर एक पत्र आले, शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटी आम्हाला पाहिजेत. एक क्षणाचाही विचार न करता ते देण्यास सांगितलं.

आम्हाला 50 कोटी रुपये नको, आम्हाला बाळासाहेबांचे विचार हवे आहेत. उद्धव ठाकरेंच्यावरील अनेक संकटे माझ्या छातीवर घेतली आहेत. जिथून बाळासाहेबांची डरकाळी निघायची तिथून आता फक्त शिव्याशाप येतात. बाप चोरला असा आरोप करता, पण बाळासाहेब कोणत्या एकट्याची प्रॉपर्टी नव्हते. बाळासाहेब हे शिवसैनिकांचे दैवत होते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते दिसतात तसे नाहीत...

एका पक्षाप्रमुखाला सत्तेचा मोह हा आतापासून नाही तर 2004 पासून होता. काही सुप्त इच्छा होत्या. मला शरद पवारांनी सांगितलं, तुम्हाला मुख्यमंत्री व्हावे लागेल. हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी चेहरा अगदी रडवेला होता. तेव्हा मी म्हणालो, त्यांनी स्वतःहून नाव सुचवायला सांगितलं होतं.

मी त्यांना सांगितलं तुम्ही जर मला हे सांगितलं असतं तर मी तसा माहोल तयार केला असता, कारण एकनाथ शिंदेला पद नको प्रेम हवं. ते दिसतात तसे नाहीत, फक्त चेहरा इनोसंट आहे. एका चेहऱ्याच्या मागे अनेक चेहरे आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

माझा आवाज कधीच बंद होऊ शकत नाही...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना मधेच माईक बंद झाला. त्यावर मिश्किलपणे ते म्हणाले, माझा आवाज बंद करू नका. तो कधीच बंद होऊ शकत नाही, कारण माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. 2019 ला तुम्ही लग्न एका बरोबर केलं, संसार दुसऱ्या बरोबर आणि हनिमून तिसऱ्या बरोबर केल्याचा आरोप त्यांनी केला.

तुम्ही भाजप, पक्ष, नरेंद्र मोदी यांना फसवल आहे. तुम्ही बेईमानी केली. जेव्हा तुमच्या परिवाराने मागे केलेल्या काही गोष्टी पुढे येऊ लागल्या, त्यावेळेस तुम्ही नरेंद्र मोदी यांना भेटायला गेला. त्यावेळी सोबत असलेल्या अशोक चव्हाण आणि अजित पवार यांना बाहेर ठेवलं. नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली, बाहेर येऊन दोन ग्लास पाणी पिलात, घाम आला हे मला अशोक चव्हाण आणि अजित पवार यांनी सांगितलं.

त्यांना सांगितलं आता आपण एकत्र येऊ. तुम्ही दोन वेळा बेईमानी केली, मग तुम्ही आम्हाला कसे गद्दार, बेईमान म्हणू शकता. वारसा सांगणाऱ्यांनी सुरुवातीला आरसा पहावा, किती मुखवटे घालून फिरणार. बाळासाहेबांचा वारसा सांगायला तोंडात नाही मनगटात ताकद असावी लागते, असाही टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT