Prakash Mahajan Sarkarnama
मुंबई

Prakash Mahajan: "मनसेमध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेणारी व्यवस्था नाही"; महाजन प्रकरणानंतर पक्ष काय घेणार निर्णय?

Prakash Mahajan: मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची पक्षावर असलेला राग आणि नाराजी आता दूर झाली आहे.

Amit Ujagare

Prakash Mahajan: मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची पक्षावर असलेला राग आणि नाराजी आता दूर झाली आहे. युवा नेते अमित ठाकरे यांनी त्यांची भेट घेतल्यांनतर आणि दोघांमध्ये नाराजीवरुन सविस्तर चर्चा झाल्यानंतर महाजनांची गाडी आता पुन्हा पूर्वपदावर आली आहे. आपली सर्व नाराजी दूर झाल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. पण शेवटी प्रश्न असा उपस्थित होतो की, मनसेमध्ये कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेणारी व्यवस्था नाही. पण आता महाजन प्रकरणानंतर हा विषय चव्हाट्यावर आला आहे.

प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले?

अमित ठाकरेंसोबत भेटीनंतर प्रकाश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "एखाद्या वडिलधाऱ्या माणसाशी जेव्हा घरातील लहान मूल येऊन बोलतं तेव्हा त्या व्यक्तीच्या मनातील सर्व राग निवळतात. अमित ठाकरे बोलले म्हणजे प्रत्यक्ष राजसाहेब बोलले असं आहे. मी मांडलेल्या ज्या काही भूमिका आहेत त्या मी विचारुन घ्यायला हव्या होत्या असं त्यांचं म्हणणं होतं. या सगळ्या प्रकरणातून मला या गोष्टीचा आनंद वाटतो की, आम्हाला पक्षांतर्गत एक व्यासपीठ मिळालं. कधी कधी काय होतं की आपल्या भावना व्यक्त करायला पक्षांतर्गत कधी अशी बाजू नसते.

3 Point Summary :

  1. प्रकाश महाजन यांची नाराजी दूर – अमित ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर प्रकाश महाजन यांनी मनसेत पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. पक्षात संवादाचा अभाव अधोरेखित – महाजन प्रकरणातून मनसेत कार्यकर्त्यांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी प्रभावी व्यासपीठाची गरज स्पष्ट झाली आहे.

  3. भविष्यातील संघटनात्मक बदलाची शक्यता – यानंतर मनसे कार्यपद्धतीत बदल करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमित ठाकरेंनी माझ्याबाबत जी भूमिका घेतली, तशी भूमिका आम्हालाही मांडायची असते पण प्रत्येक वेळी ती आम्ही मांडू शकत नाही. जर एखादं व्यासपीठ पक्षांतर्गत असेल तर आमचा पण एक विचार असतो, अजून कोणाचा असतो. पण तो मांडण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म हवा असतो. त्यामुळं ही एक चांगली गोष्ट या चर्चेतून घडलेली आहे आणि अत्यंत समाधानानं मी खाली उतरलेलो आहे. मी मनसेचं काम तसंही सोडलंच नव्हतं आणि सोडणारही नाही. पुन्हा त्याच जोशात आणि इच्छेनं मी काम करेन. माझ्या मनात काही गोष्टी होत्या त्या मी बोललो आणि पक्षानं त्याची योग्य ती दखल घेऊ असं सांगितलं आहे. अमित ठाकरे माझ्यापेक्षा वायनं खूप लहान आहेत पण ते ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलले त्यातून माझा सगळा राग निघून गेलेला आहे, असंही महाजन यांनी पुढे म्हटलं आहे.

मनसेत ऐकून घेण्याची व्यवस्था नाही का?

राजकीय पक्षांमध्ये अनेकदा नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची कुचंबना होत असल्याचा आजवरचं चित्र आहे. वरिष्ठांशी थेट संपर्क होत नसल्यानं अनेकदा कार्यकर्तेच नव्हे तर पदाधिकारी देखील नाराज असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तर या गोष्टी अनेकदा घडल्याचं उदाहरण पाहायला मिळतं. कारण आजवर मनसेच्या स्थापनेपासून अर्थात ९ मार्च २००६ पासून आजवर १९ वर्षांच्या कालावधीत अनेक दिग्गज नेते मनसेला सोडून गेले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर, राम कदम, शिशीर शिंदे, शुभा राऊळ, नितीन नांदगावकर या आमदार महापौर राहिलेल्या या बड्या नेत्यांसह अनेक नगरसेवकांचा आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. पक्ष सोडण्याची यांची अनेक कारणं असली तरी पक्षातील प्रमुख नेते त्यांना थांबवू शकले नाहीत. एकूणच पक्षात कार्यकर्त्यांची खदखद ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म नसल्याची चर्चा होत असते. प्रकाश महाजन यांच्या प्रकरणामुळं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

FAQs :

  1. प्रकाश महाजन का नाराज होते?
    पक्षात कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्लॅटफॉर्म नसल्याने ते नाराज होते.

  2. त्यांची नाराजी कशी दूर झाली?
    अमित ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चेनंतर नाराजी दूर झाली.

  3. मनसेमध्ये कार्यकर्त्यांच्या अडचणी ऐकली जातात का?
    सध्या अशी प्रभावी व्यवस्था नाही, यावर वारंवार चर्चा होते.

  4. पक्ष आता काही बदल करणार का?
    महाजन प्रकरणानंतर संघटनात्मक सुधारणा होण्याची शक्यता आहे.

मनसे स्वतंत्र व्यवस्था उभारणार का?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन एकत्र आले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. पण खरंच दोघांमध्ये राजकीय युती झाली तर दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मनासारखं घडणार असलं तरी सुरुवातीपासून मनसेची साथ करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जर ऐकल्या गेल्या नाहीत तर पक्षाला ही गोष्ट महागात पडू शकते. त्यामुळं आता पक्ष संघटनेत यावरुन काही बदल होतात का? हे पाहावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT