Jayant Patil  sarkarnama
विशेष

Jayant Patil Exclusive : रिलॅक्स झालेले जयंत पाटील म्हणतात, 'रेंजमध्ये आल्यावर टप्प्यात कार्यक्रम...'

Jayant Patil statement News : 2018 ते 2025 अशी सात वर्षे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पेलली. त्याच कारकिर्दीविषयी 'सरकारनामा'ला दिलेली मुलाखत....

Sachin Waghmare

Mumbai News : महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अखेर प्रदेशाध्यक्षपदाची भाकरी फिरवली. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अतिशय अडचणीच्या व आव्हानाच्या काळात पक्षाचे नेतृत्व केले. २०१८ ते २०२५ अशी सात वर्षे त्यांनी ही जबाबदारी पेलली. याच काळात पक्षाचे विभाजनही झाले. या काळात पक्ष आघाडीच्या राजकारणात सत्तेवरही आला आणि सत्तेच्या बाहेर फेकलाही गेला. त्याच कारकिर्दीविषयी 'सरकारनामा'ला दिलेली मुलाखत....

तुम्ही जवळपास सात वर्षे प्रदेशाध्यक्ष होता, आता जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवून कसे वाटते आहे?

-एक मोठे ओझे कमी झाल्यासारखे वाटत आहे. कारण प्रदेशाध्यक्ष म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र्रभर फिरावे लागते. राज्यभर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते त्या ठिकाणी आम्ही फिरलो. सर्वच जिल्ह्यांत तीन ते चार वेळा फिरलो. राज्यातील आमच्या पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर आहे त्याचा तणाव कायम असतोच. त्या सर्वांचे उत्तरदायित्व आपल्यावर असते. त्यांना उत्तर आपल्याला द्यायचे असते. त्यामुळे ती माझ्यासाठी मोठी जबाबदारी होती. सात वर्षे मी ही जबाबदारी संभाळली. आता खूप रिलॅक्स वाटत आहे.

या काळात खूप उलथापालथी झाल्या का?

-मी अध्यक्ष झालो त्यावेळी सरकारमध्ये आमचा पक्ष नव्हता. २०१९ साली शरद पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे पुन्हा सत्तेपर्यंत पोहचता आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ जागा जिंकल्या होत्या. सर्वांनी मेहनत घेतले आणि यश मिळाले. अडीच वर्ष आम्ही सत्तेत होतो. दोन लोकसभा व विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या. त्यावेळी बरेच चढउतार पाहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड करण्याचे कारण काय?

-शशिकांत शिंदे हे उत्साही नेते आहेत. शरद पवार साहेबांच्या विचाराला अनुसरून त्यांनी आयुष्यभर काम केले आहे. यश-अपयश आले तरी त्यांनी पवार साहेबांची साथ कधीच सोडलेली नाही. ते चांगले काम करु शकतील, असा विश्वास आहे. त्यांच्या नावाला माझी सहमती होतीच. ही पवार साहेबांची कल्पना होती. त्या निर्णयाला आम्ही सर्वानीच पाठिंबा दिला.

तुमच्या भाजप प्रवेशाबाबत नेहमीच चर्चा असते? तुम्ही अनेक वेळा उत्तरही दिले आहे? पण खरीच काही ऑफर आहे का?

-माझ्याकडे काहीच नाही, अशी चर्चाही नाही. पण राज्यात एक यंत्रणा कार्यरत आहे. अधूनमधून माझी आठवण त्या यंत्रणेला येते. माझ्याबाबत अविश्वास निर्माण व्हावा, विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करण्यासाठी असा प्रयत्न काही घटकांकडून केले जातात. हे घटक पक्षातील आहेत की बाहेरील आहेत याची कल्पना नाही. पण बाहेरचेच हे घटक असतील, असे वाटते.

देवेंद्र फडणवीस राजकारणी व मुख्यमंत्री म्हणून कसे वाटतात?

-फडणवीस २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी उत्साही वाटत होते. अलीकडच्या काळात काय झाले आहे की ते प्रशासनाऐवजी इतर गोष्टीवर जास्त लक्ष देत असावेत असे वाटते. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी समाजात बोलल्या जातात. त्यांना उत्तम ज्ञान आहे, कोणता निर्णय कधी घेतला पाहिजे याचे प्रसंगावधान त्यांच्याकडे आहे. भाजपमध्ये ते सध्या एकमेव नेते आहेत. दुसरा नेता कोणी नाही. बाकीचे कोणी नेते प्रयत्नही करीत नाहीत.

तुम्ही दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. लाडकी बहीण योजनेसारख्या थेट हातात पैसे देणाऱ्या योजना हव्या आहेत का?

- लाडकी बहीण योजनेबाबत दोन गोष्टी आहेत. आपल्याकडे संजय गांधी निराधार योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांना व 62वर्षांवरील पुरुषांना आपण काही योजना देतो. गरीब माणसांना १५०० रुपये आवश्यक आहेत. आमचे सरकार आले असते तर आम्ही हे सुरूच ठेवले असते. निवडणूक काळात मानधन वाढविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर निकष असताना लावले गेले नाहीत. आता 2100 रुपये केले जात नाहीत, ही फसवणूकच आहे. आता निकष सुरू करून नावे वगळण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे आधी दिलीच का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्या पैशातून मतांची अपेक्षा केली आणि आता ज्या मुद्द्यावर मतदान घेतले ते मुद्दे विसरत आहेत. लाडक्या बहि‍णींना दुखावण्याचे काम या सरकारने केले आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी तुमचे मताधिक्य खूप कमी झाले. सगळे युवा जिल्हाध्यक्ष घेरण्याचा प्रयत्न करतात, असे तुम्हाला वाटते का?

- अलीकडच्या काळात कोणालाही नेता व्हावा असे वाटते. विश्वासार्हता सिद्ध न करता काही लोक आमच्या भागातून राज्यापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे वरच्यांना देखील वाटते हा जयंत पाटलांच्या विरोधात काम करतो त्याला महत्त्व देऊया. त्यांना ताकद दिली जाते व रसद दिली जात आहे. विधानसभा निवडणुकीवेळी मी केवळ एक संध्याकाळ मी प्रचार केला. त्यावेळी दोन ते तीन सभा घेतल्या. माझ्या कार्यकर्त्यांनीच माझी निवडणूक सांभाळली होती. आमच्याकडे पक्षाने काही पाहणी करणाऱ्या एजन्सीज लावल्या होत्या. त्यांच्याप्रमाणे या ठिकाणी ६० ते ६५ हजारांचे मताधिक्क्य मिळेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र, माझे वरचे ५० हजार गायब झाले. ज्यावेळी मी जनतेत फिरतो. त्यावेळी जनतेच्या चेहऱ्‍यावर अजिबात लवलेश दिसत नाही.

मताधिक्य कमी झाले यावर तुम्ही नक्की काय विचार करताय?

- माझ्या विरोधातील मंडळी काही खोटा प्रचार करीत आहेत. काही स्थानिक मंडळी माझ्याविरोधात गैरसमज पसरवित आहेत. उसाच्या दरापासून ते हे केले ते केले असे ही मंडळी सांगत असतात. काहीजण उलटतपासणी करीत नाहीत. अन्य कारखान्यांच्या उसाचे दर पाहिल्यानंतर तुमच्या कारखान्याचे दर योग्य होते, असे काही जण आता म्हणत आहेत. काही वेळा अपप्रचार करण्याची व्यवस्था प्रचंड मोठी असते.

जयंत पाटील यांना राग कधी येतो आणि आला तर ते काय करतात?

-राग आला की लगेचच त्यावर प्रतिक्रिया देण्याची किंवा काही कृती करण्याची गरज नाही. राग आला तर आपण कोणता प्रसंग आहे त्याच्यावर बरेच काही अवलंबून आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीने वागत असतात आणि बोलत असतात. रागवायचे कारण नसते. राग येत नाही असे नाही, मी माणूस असल्याने मला राग येतोच. तो लगेच व्यक्त करायला हवा की नाही ते आपल्या सोयीने ठरवायचे असते. लगेच सगळ्या गोष्टी व्यक्त करण्याची गरज नाही. प्रत्येकाला वेळ असतो.

टप्प्यात कार्यक्रम तेथूनच आला आहे का? हे वाक्य प्रचंड प्रसिद्ध झाले आहे. काय वाटते त्याविषयी?

आपण निर्णय घेतल्यानंतर तो रेंजमध्ये आला पाहिजे. कारण त्याच्यावर परिणाम होईल, असा क्षण आला म्हणजे तो टप्प्यात आला, असे आपण म्हणतो. काही लोक टप्प्यात येत नाहीत. यायला वेळ लागतो. पृथ्वी गोल आहे, त्यामुळे प्रत्येकाची वेळ येत असते.

प्रतीक पाटलांना वडील म्हणून काय सल्ला दिला?

-त्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल, कष्ट करावे लागणार आहेत. लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल. त्याच्या परीने तो प्रयत्न करीत आहेत. मी मार्गदर्शन फारसे करीत नाही. पाण्यात पडल्यानंतर तो पोहण्यास शिकेल, अशा अपेक्षा आहेत.

तुमचा राजकारणातील प्रवेश अपघाताने झालाय का? तो काळ कसा होता?

-तो काळ एकदम भारवलेला व मंतरलेला असाच होता. माझे वडील गेले त्यावेळी माझी वयाची 21 वर्ष देखील पूर्ण झाली नव्हती. या भागातील जनतेच्या मागणीनुसार माझ्या मोठ्या बंधूंऐवजी मला पाठवण्याचे ठरले. चार महिने तर राहिले. त्यानंतर यांची मागणी कमी झाली की हा अमेरिकेला शिक्षणासाठी जाईल, असे ठरले होते. असा प्लॅन ठरला होता. मी एकच बॅग घेऊन आलो होतो. त्यानंतर हळूहळू काही घटना घडल्या व त्यामध्ये मी गुंतत गेलो.

वडील राजारामबापू यांच्याकडून नेता म्हणून तुम्हाला काय मिळाले? एखाद्यावेळी त्यांच्या वागण्यातून काही नवीन शिकता आले का?

-त्यांनी उभारलेला साखर कारखाना हा त्यांच्या कामाचा फार मोठा छोटा भाग आहे. यवतमाळ, अकोला, नंदुरबार व शहादा या बऱ्याच भागातील नेते गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वीपर्यंत सांगत होते की, बापू आले की आमच्या घरी येत होते. बापूंचा लोकसंग्रह मोठा होता. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उभारले होते. काँग्रेस व जनता पक्षाच्या नेत्याचा मोठा राबता आमच्या घरी कायम होता.

पक्षात रोहित पवार व तुमचा वेगळा गट आहे का?

-मला माहीत नाही. माझा कोणाशीही वाद नाही. कधी झाला असल्याचे मला आठवतही नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, अजित पवार बाहेर गेले, या सगळ्याचा काही अंदाज होता? पक्ष फुटणार याची वरिष्ठ नेत्यांना कल्पना होती असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले होते ?

- अंदाज नव्हता. काही जणांचा आग्रह होता, मात्र त्या बाजूला मला जाता येणार नाही, अशी भूमिका शरद पवार साहेबांनी घेतली होती. त्यावेळी काही जणांनी एकत्र येऊन हा अचानक निर्णय घेतला. या अचानक घेण्यात आलेल्या निर्णयाची कल्पना शरद पवार साहेबांना नव्हती. मलाही त्याची काही कल्पना नव्हती.

जुने नेते जातील असे वाटले होते का?

-२०१९ साली बंड झाल्यावर कोणीच हलले नव्हते. त्यामुळे कोणी जाणार नाही, असे वाटत होते. यावेळी सर्वांना एकत्रित बोलवण्यात आले. तोपर्यंत कोणालाच माहीत नव्हते की एकत्रित कशासाठी बोलावले आहे. सगळ्याच्या एकत्रित सह्या घेत, एकत्रितच निर्णय घेतला. काही जणांची मूकसंमती होती असे वाटते.

मराठा आरक्षणाबाबत काय वाटते?

-मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी अनेक वेळा आश्वासने देण्यात आली होती. मात्र, त्याची पूर्तता झालेली नाही. त्यासाठी मोठी आंदोलने महाराष्ट्रात झाली. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळावे, याबद्दल कोणाची तक्रार असण्याचे कारण नाही. इतर जातीही त्याबद्दल आक्षेप घेत नाहीत. इतर जातीमधील आरक्षण काढून आम्हाला द्या, अशी चर्चा होत असेल तर इतर जाती ते स्वीकारत नाहीत. पण मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका रास्त आहे. त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत. मराठा समाजाचे मागासलेपण हे सिद्ध करण्यासाठी व्यवस्था करायला पाहिजे. ही तशी मोठी प्रक्रिया आहे.

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला झाला. तोच फॅक्टर मात्र विधानसभा निवडणुकीला चालला नाही. त्याची काय कारणे असू शकतात ?

-जरांगे यांच्या आंदोलनाचा फायदा काही ठिकाणी झाला. त्यांच्या आंदोलनाचा क्षोभ सरकारविरोधात होता. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून एक प्लॅटफार्म तयार झाला. त्याचा फायदा विरोधी पक्षाला नक्की झाला. विधानसभेत ते सातत्य राहिले नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांचे स्वत:चे उमेदवार उभे करण्याच्या चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत होत्या. त्यामुळे त्यांना मानणाऱ्या लोकांमध्ये विस्कळितपणा जाणवला. जरांगे यांचे आंदोलन ओबीसीच्या विरोधात आहे, असे चित्र तोपर्यंत निर्माण झाले होते. त्याचाही फटका बसला.

राजकारणातील घराणेशाहीबद्दल तुम्हाला काय वाटते?

-ज्या नेतृत्वाला स्वीकारले जात नाही त्यांनाच नंतर वारंवार पुढे आणले जाते. त्यावेळी घराणेशाहीचा आरोप केला जातो. गुणवत्ता जर सिद्ध झाली तर हा आरोप कमी होऊ शकतो. देशात वैचारिक राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गटाचे नेतृत्व करण्याचा प्रकार वेगवेगळ्या भागात वाढला आहे. त्याचे नेतृत्व कमी झाले तर समूहच नापास ठरला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT