Pune News : धाराशिव जिल्हयातील परंडा तालुक्यातील वडनेर गावात २४ सप्टेंबरला रात्रीच्यावेळी पुरात अडकलेल्या चार नागरिकांना वाचवण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर धावून आले. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एनडीआरएफच्या टीमसोबत ते महापुरात उतरले आणि सर्वांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. त्यांचा हा रात्रीच्या वेळी गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यात स्वतः एक राजकीय नेता उतरतो व लोकांना वाचवतो हा व्हिडिओ बाहेर आला अन् त्यानंतर सरकारला पूरपरिस्थीतीची जाणीव झाली. त्यानंतर प्रशासन अंग झटकून कामाला लागले.
या पूरपरिस्थतीत धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) हे स्वत: पाण्यात उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सर्वाना त्यांचे वेगळेपण लक्षात आले. त्यांनी केलेल्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. त्यांच्या या एका कृतीने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.
मराठवाडा, सोलापुरातील सध्याची पावसाची स्थिती कशी आहे? किती प्रमाणात नुकसान झाले आहे?
-पूर परिस्थितीमुळे धाराशिव मतदारसंघात गेल्या आठ ते दहा दिवसापासून सातत्याने फिरत आहे. गावोगावी काही 80 ते 90 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांची आवर्जून भेट घेत आहे. त्यांच्याकडे या मुसळधार पावसाविषयी मी चौकशी करीत आहे. अशाप्रकारचा पाऊस यापूर्वी कधीच पाहिलेला नाही असे ते सांगत आहेत. गेल्या 90 ते 100 वर्षात असा मोठा पाऊस कधीच झाला नव्हता. पुरामुळे घरात कुजलेल्या व सडलेल्या अन्नधान्यचा वास येत आहे. काही जण गेल्या कित्येक दिवसापासून अंगाच्या कपड्यावरच आहेत. या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी पात्राकडेला असलेल्या शेतातून तीन ते चार किलोमीटरपर्यंतची माती अक्षरश: पुरामुळे वाहून गेली आहे. जतन करून ठेवलेले पशुधन वाहून गेले आहे. या स्थितीपुढे हात टेकून गेल्या आठ ते दहा दिवसांत माझ्या लोकसभा मतदारसंघात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. येत्या काळात उदरनिर्वाह कशा प्रकारे होणार? मुलांच्या शिक्षणाचे काय होणार? बँकेचे कर्ज कसे फेडणार? त्यातच शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा येत आहेत. या पुरामुळे झालेले नुकसानीचे पैशात मोजमाप आणि शब्दात वर्णन होऊ शकत नाही.
ही पूरस्थिती अभूतपूर्व असून, असा पूर येईल, असे वाटले होते का?
-धाराशिव जिल्ह्यातील ही पूरस्थिती अभूतपूर्व अशीच आहे. या जिल्ह्यात या पूर्वी एवढा मोठा पूर धाराशिव जिल्हयात कधीच पूर आला नव्हता. धाराशिव जिल्ह्यात नेहमीच दुष्काळी परिस्थती राहत होती. जिल्ह्यातील भूम, वाशी, परंड्यात कधीच सरासरी इतका पाऊस झाल्याचे मला तरी आठवत नाही. या भागातील सीना-कोळेगाव धरण कायम पाण्याअभावी रिकामे राहत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प पूर्णपणे भरली असून आता ती ओसंडून वाहत आहेत. त्यामुळेच नदीकाठच्या अनेक गावात पाणी शिरले आहे. जिल्ह्यात अशा स्वरुपाचा पूर येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असे कधीच ध्यानीमनी ही नव्हते.
शेतकऱ्यांना सध्या नेमकी कोणत्या मदतीची गरज आहे?
-जिल्ह्यातील प्रत्येक भागातील परिस्थिती वेगवेगळी आहे. त्याबाबत मतदारसंघात पाहणीसाठी आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी बोललो आहे. राज्य सरकारला शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आणखी कर्ज काढावे लागणार असेल तर काढावे. मात्र, शेतकऱ्याला पुन्हा उभ राहण्यासाठी आवश्यक सर्व मदत करावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपयाने मदत केली पाहिजे. पंजाब राज्यात विरोधकांचे सरकार आहे मात्र महाराष्ट्रात व केंद्रात तुमचेच डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे मदत करताना हात आखडता घेऊ नका, शेतकऱ्याच्या पदरात काही तरी पडू द्या, अशी विनवणी केली आहे.
कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा येत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत. आता कर्जमाफीसाठी योग्य वेळ येण्याची वाट न पाहता हीच योग्य वेळ समजून शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसेल तर पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तरी तात्काळ कर्जमाफी द्यावी. परवा एका ठिकाणी पंचनाम्यावरून माझा तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यासोबत वाद झाला. त्यांच्याकडून पंचनामे करीत असताना काही निकष शिथिल केले तरी तसा शासन आदेश दाखवा, असे सांगितले जाते. वाहून गेलेल्या जनवारासाठीच्या काही अटी शिथिल केल्या आहेत. मात्र पुन्हा त्या जनावरांच्या लसीकरणाची नोंद आहे का? अशी विचारणा करण्यात आली.
सरकारच्या निकषामुळे तलाठी व जिल्हाधिकारी यांच्याशी मतभेद झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी देखील परंडा तालुक्यातील नागरिकांची भेट घेतली. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनीही झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. त्यामुळे पंचनामा होण्याची वाट न पाहता प्राथमिक स्वरुपात मदत करणे गरजेचे आहे.
माती खरवडून गेल्याने त्याचा दीर्घकालीन फटका बसणार आहे. ही परिस्थिती कशी हाताळावी लागेल?
-नदीकाठची व बंधारे व कालव्याकाठची शेती पुरामुळे वाहून गेली आहे. त्यामुळे येत्या काळात या जमिनीचे नुकसान कोणत्या विभागामुळे झाले आहे, त्या विभागाने या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. वाहून गेल्या शेतात पुन्हा खोदून मातीचा भराव घालण्यास मदत करायला हवी. हा भराव घातल्यानंतर दबलेल्या या मातीला एक वर्षभर ऊन लागू द्यावे लागते. त्यामुळे पहिल्या वर्षी उत्पादन येणार नाही. त्यामुळे उत्पादन येण्यासाठी दोन ते तीन वर्ष वाट पाहावी लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्याला पुन्हा खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
पूरग्रस्तांच्या भावना खूप तीव्र आहेत, त्या नेत्यांशी बोलतानाही जाणवत आहेत. ही परिस्थिती कशी हाताळावी लागेल?
-मदत मिळत नसल्याने पूरग्रस्त ते हतबल झाले आहेत. दहा किलो तांदूळ व गहू व किराणा मालाच्या किटचे वाटप केल्याने त्यांच्या समस्या सुटणार आहेत का? भूम तालुक्यातील ईट व पांढरेवाडी परिसरातील ग्रामस्थ चांगलेच संतप्त झालेले पाहवयास मिळाले. नेत्याला अशा ठिकाणी जात असताना थंड डोके ठेवून जाण्याची गरज आहे. त्याठिकाणी ग्रामस्थांच्या संतापला सामोरे जाण्याची तयारी व त्यांचे ऐकून घेण्याची तयारी असेल तर सामोरे जावे, अन्यथा जाऊ नये.
ढगपिंपरी येथील एकाच शेतकऱ्याच्या 27 गायी वाहून गेल्या आहेत. या एका गायीची किमत एक लाख रुपये आहे. आता त्या शेतकऱ्याला प्रशासनाकडून सरकारच्या निकषाप्रमाणे तीन गायीचे 90 हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल, असे संगितले गेले तर तो शेतकरी नक्कीच चिडणार ना? त्याच्या भावनांचा उद्रेक होणार हे समजून घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. माझी तयारी तर प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेण्याची असते, मी सत्ताधारी पक्षाचा नसल्याने माझ्यावर रोष थोडासा कमी असतो.
एनडीआरएफच्या टीमबाबत काय सांगाल?
-एनडीआरएफची टीम चांगली आहे. त्यांची या आपत्कालीन काळात मदत देखील झाली. परंडा तालुक्यातील वडनेर येथे एका घराच्या स्लॅबवर अडकलेले लहान मुलगा, त्याचे आजी, आजोबासह अन्य दोघांची सुखरूप सुटका करताना एनडीआरएफच्या टीमचे सहकार्य झाले. मात्र मिल्ट्रीची बोट मात्र मध्येच बंद पडली व पाण्यातून वाहून चालली होती. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून त्याठिकाणी असलेल्या एका खांबाला बोट अडकल्याने संकट टळले. त्यावेळी पाइप टाकून व दोरीने बांधून ही बोट सुरक्षितपणे प्रवाहाच्या बाहेर काढली. या ऑपरेशनसाठी केवळ दहा ते पंधरा मिनिटे वेळ लागणार होता. मात्र, बोटीचे इंजिन खराब झाल्याने दोन तास लागले. या बोटीचे इंजिन सुरु करण्यासाठी ही मोठी कसरत करावी लागली. दुसरीकडे एनडीआरएफच्या टीमने एअर लिफ्टिंग करून खराब हवामान असतानाही या भागातील पुरामध्ये अडकलेल्या 27 जणांना बाहेर काढले.
पिकविमा योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी आपण काय प्रस्ताव मांडले आहेत?
-पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये (PMFBY) विमा कंपन्यांनी 2017 ते 2025 या काळात तब्बल 85 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे विमा भरपाई मिळालेली नाही. सुरुवातीला असलेली '100 पैसे निकषाची' पद्धत बदलून ती '70पैसे' करण्यात आली. त्यामुळे निकषांच्या पूर्ततेअभावी अनेक शेतकऱ्यांना कमी विमा मिळाला किंवा मिळालाच नाही. या योजनेसाठी असलेले तीन महत्त्वाचे 'ट्रिगर' हटवण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होऊनही भरीव मदत मिळू शकली नाही.
या 'जाचक' निकषांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर विमा कंपन्यांना 100 टक्के नफा झाला आहे. यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन हे जाचक निकष त्वरित हटवण्याची मागणी केली होती. जर हे तीन 'ट्रिगर' आज लागू असते, तर नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी भरपाई मिळाली असती, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात या पीक विमा योजनेचा लाभ कंपन्यांना न होता, तो थेट शेतकऱ्यांना मिळण्यासाठी या निकषांवर तातडीने फेरविचार होणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. काय करायला पाहिजे?
- ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण व स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत हक्क मिळत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सुविधा पुरवणे महत्त्वाचे आहे.
सध्याच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोणत्या धोरणांवर राज्य सरकारने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे?
- केंद्र सरकारच्या पंचायत राज्य कमिटीवर असल्याने अनेक राज्यांना भेटी दिल्या आहेत. विशेषतः शेजारील कर्नाटक, तेलंगणा सरकार आपलीच एमआरजीएसची (रोजगार हमी योजना) योजना राबवत आहे. दुसरीकडे आपल्या राज्यात ही योजना प्रभावीपणे राबवली जात नाही. त्यामुळे रोजगार मिळविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे याकडे राज्य सरकारने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
लोकप्रतिनिधींचा नागरिकांशी असलेला संवाद कमी होतोय, असे वाटते का?
- सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा नागरिकांशी असलेला संवाद कमी होत आहे. सत्तेत असलेली मंडळी ही पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा हे गणित मांडण्यात व्यस्त आहे. त्यामुळेच संवाद कमी झाला आहे.
राजकीय पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्याचे नुकसान होतेय, असे वाटते का?
- राजकीय पक्षांची मानसिकता कुरघोडी करण्याची नाही. मात्र यापासून बोध घेणे गरजेचे आहे. सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टीका करणे टाळले पाहिजे. मदत मागितल्यानंतर विरोधक टीका करतात असे म्हटले जाते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती. काम करीत असताना काही जण बोलत असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत राजकारणातील नकरात्मकता दूर केली पाहिजे.
खासदार म्हणून तुम्ही कोणत्या नव्या गोष्टींची सुरुवात तुमच्या मतदारसंघात केली?
खासदार म्हणून मतदारसंघातील मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या टेंभुर्णी ते लातूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा पाठपुरावा केला. सध्या या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या दोन वर्षाच्या काळात हे काम पूर्ण होईल. त्यासोबतच सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील आहे. सध्या धाराशिव ते तुळजापूर मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. 2027 पर्यंत या ठिकाणी इंजिन ट्रायल घेतले जाणार आहे. तर तुळजापूर ते सोलापूर रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील आहे. त्यासोबतच हैदराबाद-उमरगा राष्ट्रीय महामार्गाचे कामे अनेक ठिकाणी रखडले होते. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून काम मार्गी लावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.