Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
विश्लेषण

BJP national president : भाजपचे नवे 'राष्ट्रीय अध्यक्ष' मोदी-शहांपेक्षा होणार पॉवरफूल! पक्षप्रमुख कसा निवडला जातो? संघाची भूमिका काय असते?

Powerful BJP leader after Modi Shah News : भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड कशी केली जाते आणि त्यामध्ये आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय असते? हे जाणून घेऊ यात.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : भाजपने सध्या देशभरातील संघटनात्मक निवडणुका पूर्ण करण्यावर भर दिला आहे. देशातील 36 राज्यापैकी जवळपास 29 राज्यातील संघटनात्मक निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात लवकरच भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावरून परतले आहेत. या वर्षाअखेरीस बिहार विधानसभेची निवडणूक होणार असल्याने त्यापूर्वी आता नव्या अध्यक्षाच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होऊ शकतो.

सध्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ दोन वर्षांपूर्वीच संपला आहे, मात्र त्यांना सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. त्यांच्या कार्यकाळात भाजपने लोकसभेसह अनेक महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड कशी केली जाते आणि त्यामध्ये आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय असते? हे जाणून घेऊ यात.

राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला होता येते? काय आहेत अटी

भाजपच्या संविधानानुसार, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड "निर्वाचक मंडळ" करते. या मंडळात राष्ट्रीय परिषदेचे सदस्य आणि राज्य परिषदेचे सदस्य सहभागी असतात. जो किमान 15 वर्षे पक्षाचा सक्रिय सदस्य असेल, त्यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष होता येते.

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 20 सदस्यांना सुचवावे लागते नाव

भाजपच्या नियमानुसार, निर्वाचक मंडळातील किमान 20 सदस्य एखाद्या व्यक्तीच्या अध्यक्षपदासाठी संयुक्तरित्या प्रस्ताव मांडू शकतात. हे प्रस्ताव अशा किमान पाच राज्यांमधून आले असले पाहिजेत. ज्याठिकाणी राष्ट्रीय परिषदेचे निवडणुकीचे काम पूर्ण झालेले असते. याशिवाय, उमेदवाराच्या संमतीसह नामांकन पत्र सादर करणे आवश्यक असते.

राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी 19 राज्यांच्या संघटनात्मक निवडणुकाची गरज

राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीत अगोदर जिल्हा संघटनांच्या, राज्य संघटनांच्या आणि राष्ट्रीय परिषदेच्या निवडणुका पूर्ण झालेल्या असाव्यात. भाजपने संघटनात्मकदृष्ट्या भारताला 36 प्रांतांमध्ये विभागले आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक प्रांतांमध्ये निवडणुका झाल्यानंतरच अध्यक्षपदाची निवड केली जाते. बहुधा ही निवड सर्वानुमते केली जाते. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी 19 राज्यांच्या संघटनात्मक निवडणुकाची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.

काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये थेट मतदान प्रक्रिया नाही

भाजपमध्ये (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कधीच थेट मतदान झालेले नाही. संघ आणि पक्षाचे वरिष्ठ नेते परस्पर विचारविनिमय करून, पक्षाच्या गरजा लक्षात घेऊन अध्यक्ष ठरवतात. काँग्रेसमध्येही बऱ्याचदा असेच घडले आहे. याचा एक सकारात्मक भाग असा की, पक्षात अंतर्गत संघर्ष कमी होतो आणि सर्व सहमतीने निवड केली जाते.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो?

भाजपच्या संविधानानुसार राष्ट्रीय अध्यक्षाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. 2010 साली नितीन गडकरी अध्यक्ष असताना पक्षाच्या संविधानात दुरुस्ती झाली होती, ज्यामध्ये सलग दोन वेळा अध्यक्ष होण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, नितीन गडकरी (Nitin Gadkari) दुसऱ्यांदा अध्यक्ष होऊ शकले नाहीत.

जेपी नड्डांना देण्यात आली मुदतवाढ

जानेवारी 2020 मध्ये जेपी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. त्यांचा कार्यकाळ जानेवारी 2023 मध्ये संपला आहे. मात्र, लोकसभा निवडणुका लक्षात घेता त्यांना कार्यकाळ वाढवून देण्यात आला. निवडणुका संपल्यानंतर त्यांना 20 दिवसांची आणखी मुदतवाढ देण्यात आली आणि सांगण्यात आले की अध्यक्षपदासाठी लवकरच निवड होईल. मात्र, अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला.

निवडीमध्ये आरएसएसची भूमिका काय असते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मत आहे की कोणताही व्यक्ती संघटनेपेक्षा मोठा होऊ नये. नव्या अध्यक्षाची निवडही अशा व्यक्तीकडे होईल, ज्याच्यावर पक्ष भविष्यातील निवडणुकांसाठी विशेषतः 2029 च्या लोकसभा निवडणुकाची जबाबदारी टाकू शकेल.

भाजपचा नवा अध्यक्ष ताकदवान असणार का?

भाजप आणि आरएसएस या दोन्ही संस्थांचे नेते नेहमी सांगत आले आहेत की, कोणताही नेता पक्षापेक्षा मोठा नसतो. ही गोष्ट स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी अनेक वेळा स्पष्ट केली आहे. मात्र, अध्यक्ष तोच असेल जो मोदी आणि शाह यांच्याशी ठामपणे समन्वय साधू शकेल. भाजपसाठी 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही महत्त्वाच्या आहेत. विशेषतः यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यूपीमधील झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचं मोठं आव्हान नव्या अध्यक्षासमोर असणार आहे. त्यामुळे अशा नेत्याची चाचपणी सुरु आहे.

कधी झाली भाजपची स्थापना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या जनसंघमधील काही नेत्यांनी 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना केली होती. त्या वेळी अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचे पहिले अध्यक्ष झाले. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसची लाट होती, ज्यामध्ये भाजप फक्त दोन जागांवर विजय मिळवू शकला. 1986 मध्ये लालकृष्ण अडवाणी भाजपचे अध्यक्ष झाले. 1990 मध्ये त्यांनी राम रथयात्रा सुरू केली आणि 1991 च्या निवडणुकीत भाजपने 120 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर 1996, 1998, 1999 आणि नंतर 2014 पासून सलग तीन वेळा भाजपने केंद्रात सत्ता मिळवली आहे. त्यामुळे सध्या देशभरात भाजपचे मोठ्या संख्येने सदस्य आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT