sanjay shirsat, uddhav thackeray, chandrakant patil, sanjay raut, devendra fadnavis  Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : भाजप-शिवसेना युतीची चर्चाच की पडद्यामागं मोठं काही घडतंय? बदललेले राजकारण कोणत्या दिशेने जाणार?

BJP Shiv Sena alliance News : गेल्या दोन महिन्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीकता पाहता नक्कीच पडद्यामागे काही तर घडतंय का ? अशीच चर्चा रंगली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर सत्तास्थापन होईपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. गेल्या दोन महिन्यात महायुतीमधील छोटे-मोठे रुसवे सोडता राज्य सरकारचा कारभार सुरळीत सुरु आहे. गेल्या दोन महिन्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीकता पाहता नक्कीच पडद्यामागे काही तर घडतंय का ? अशीच चर्चा रंगली आहे.

त्यातच उद्धव ठाकरे आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील एका लग्न सोहळ्यात भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत सूचक विधान केल्याने पुन्हा एकदा युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातूनच महाराष्ट्रातील बदललेले हे राजकारण भविष्यात कोणत्या दिशेने जाणार त्याचे संकेत मिळत आहेत.

राज्य मंत्रिमंडळांचा विस्तार पार पडल्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवशेनास उपस्थित राहिलेले शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी एकमेकांवर आरोप करताना झालेले मतभेद विसरून त्यांनी ही भेट घेतल्याने त्यावेळेसपासूनच शिवसेना व भाजप भविष्यात एकत्र येतील, अशी चर्चा रंगली होती. फडणवीस यांच्यावर महाराष्ट्र द्वेष्टे अशा प्रकारची टीका केली जात असतानाच आता त्यांचा उल्लेख देवाभाऊ म्हणून करीत नेमका शिंदे सेनेला टेन्शन देतात की काँग्रेसला इशारा, याची चर्चा जोरात रंगली आहे.

त्यानंतरच्या काळात ठाकरे-फडणवीस यांनी एकमेकांवर टीका करणे टाळले आहे. तर दुसरीकडे मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन वेळा भेट घेतली. त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावेळेस पासूनच भाजप (BJP) व ठाकरे गट कुठे तरी भविष्यात एकत्र येतील का ? अशास्वरूपाच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला गडचिरोली दौरा केला. नक्षलप्रभावग्रस्त या भागात फडणवीस यांनी दौरा करुन एक आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा स्वागत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमधील वाढत्या जवळीकतेबद्दल चर्चा रंगली होती. त्यावेळेस ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील नक्षलप्रभावग्रस्त या भागात केलेल्या फडणविसांच्या दौऱ्याचे तोंडभरून कौतुक केले होते. तर दुसरीकडे शिवसेनेच्या मुखपत्रातून फडणवीस यांच्यावर स्तुती सुमने उधळत असताना देवाभाऊ म्हणून करीत त्यांच्यासाठी पायघड्या अंथरल्या जात असल्याची चर्चा होती. त्यामुळेच सर्वांचे लक्ष येत्या काळात नवीन वर्षात नवीन समीकरण जुळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन-चार वर्षांपासून टोकाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण गढूळ झाले होते. परंतु आता राज्यातील राजकारण बदलण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही फडणवीस यांचे कौतूक केले.

त्यानंतर चारच दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हे एका लग्न समारंभात भेटले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या आणि हास्यविनोदही झाले. यावेळी ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी युती कधी होईल? असा मिश्किल सवाल चंद्रकांतदादांना केला होता. त्यावर चंद्रकांतदादांनीही मिश्किलपणे उत्तर देत, तो माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल असे सांगितले. त्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी पुढच्या घडामोडी काय घडणार हे आम्हाला माहीत आहे, असे सांगत या चर्चांना हवा दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

चंद्रकांतदादांनी ज्या भावना व्यक्त केल्या. त्याबाबत आमच्या काय भावना आहेत. याचे उत्तर आम्ही योग्यवेळी देऊ. सध्या आमच्याकडे युतीची कोणतीही चर्चा नाही. आमच्या बैठकात तो विषय निघत नाही. पण भविष्यात काय होईल, याचं उत्तर माझ्याकडे नाही. मात्र, पुढच्या घडामोडी काय घडणार आहे ? याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहोत, असे सूचक विधान संजय राऊत यांनी करीत युतीच्या चर्चाना हवा दिली.

चंद्रकांत पाटील हे नेहमीच शिवसेना-भाजप युतीचे समर्थक राहिले आहेत. शिवसेना आणि भाजपची जी जुनी पिढी होती, ज्यांनी एकत्र काम केले, त्यापैकी चंद्रकांतदादा हे एक आहेत. आता भाजपमध्ये हौशे, नवशे आणि गवशे आहेत. त्यांना शिवसेना-भाजपच्या 25 वर्षाच्या युतीचे महत्त्व समजणार नाही, अशी टीका करीत संजय राऊत यांनी निशाणा साधला होता.

त्यातच फडणवीस यांनी लग्न समारंभात भेट झाल्यानंतर युतीबाबत चर्चा होत नसल्याचे सांगत, या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व रंगलेल्या चर्चावर धुरळा बसण्याच्या आधीच शनिवारी पुन्हा एकदा शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी वेगळाच बॉम्ब टाकला आहे. शिंदेंचे विश्वासू मंत्री संजय शिरसाट यांनी एका मुलाखतीमध्ये दोन्ही शिवसेना जोडण्याची भाषा केली. ते म्हणाले, 'आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधील अंतर वाढले नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील.'

शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार का? याची चर्चा सुरू झाली. मात्र, शिरसाट यांचे सूर का बदलले आहेत, याचे कारण माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले. ते म्हणाले, भाजप एकनाथ शिंदेंना वेगळे करते आहे, या भीतीतून संजय शिरसाट यांनी गुगली टाकली असावी. तर दुसरीकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय शिरसाट यांनी युतीबाबत कोणतेही भाष्य करू नये, त्याबाबतचा सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील, असे स्पष्ट केले. या सर्व चर्चेअंती गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारण का बदलत आहे ? असा प्रश्न सर्वानाच सतावत आहे.

काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांचे झालेले कौतूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन करण्यात आले आहे का? असा प्रश्न पडला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जोरदार फटका बसला होता. त्यामुळे येत्या काळात भाजपसोबत संबंध चांगले निर्माण करण्याचा हा शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न दिसत आहे. बदललेले हे राजकारण आगामी युती, आघाडीचे संकते आहेत का? हे भविष्यात स्पष्ट होणार आहे. त्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT