Devendra Fadnavis, Ajit Pawar And Eknath Shinde sarkarnama
विश्लेषण

Maharashtra local body elections: वर्षभरानंतरही महायुतीची ताकद कायम : नगराध्यक्षपदाच्या निकालात दिसला विधानसभेचा पॅटर्न

Mahayuti performance News : विधानसभा निवडणुकीला वर्ष उलटून गेले तरीही महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक आणि मतदारांवरील पकड अजूनही कायम असल्याचे या निवडणुकीत जनतेतून विजयी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाला आहे. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका टप्प्याटप्याने होत आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतीसाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवले. त्यामुळे या निवडणुकीतील यश पाहिल्यानंतर विधानसभा निवडणुकीला वर्ष उलटून गेले तरीही महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक आणि मतदारांवरील पकड अजूनही कायम असल्याचे या निवडणुकीत जनतेतून विजयी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीला वर्ष उलटून गेले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तासमीकरणे फारशी बदललेली नाहीत, हे अलीकडील नगराध्यक्षपदाच्या निकालांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका अनेकदा केवळ स्थानिक प्रश्नांपुरत्या मर्यादित असतात, असे मानले जाते. मात्र यावेळी आलेल्या निकालांमध्ये विधानसभेतील मतदानाचा पॅटर्न ठळकपणे पुन्हा दिसून आला आणि त्यामुळे महायुतीची ताकद अजूनही कायम असल्याचे अधोरेखित झाले.

राज्यात गेल्या चार वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे सर्वाना या निवडणुकीची उत्सुकता लागली होती. जवळपास चार वर्षानंतर प्रथमच राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला. त्यानंतर पहिल्या टप्प्प्यात राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली. त्यामध्ये महायुतीने पुन्हा एकदा वर्चस्व प्राप्त केले आहे.

राज्यात 288 पैकी सर्वाधिक 124 नगराध्यक्ष भाजपचे (BJP) निवडून आले आहेत. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 61 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे 27 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 8 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यासोबतच या निवडणुकीत स्थानिक विकास आघाडी व अपक्ष असे मिळून 20 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत.

महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena), अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून 221 तर महाविकास आघाडीचे 47 तर इतर 20 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. हा महायुतीचा पॅटर्न पहिला तर राज्यातील विधानसभा निवडणुकीला वर्ष उलटले असले तरी यावेळी विधानसभेच्या २८८ जागासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीमधील भाजपचे 132, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41असे एकूण 234आमदार महायुतीचे निवडून आले होते.

महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 तर तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 असे एकूण 46 आमदार निवडून आले होते. एकंदरीत ही आकडेवारी पहिली तर विधानसभा व नगराध्यक्षपदाची निवडणूक पाहता वर्षभरानंतरही महायुतीची ताकद कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. वर्षभरानंतर झालेल्या या निवडणुकीतील यश पाहता या दोन निवडणुकीच्या निकालात फारसा फरक वाटत नाही.

महायुतीला विधानसभेत मिळालेले यश हे केवळ तत्कालीन वातावरणाचे फलित नव्हते, तर संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांशी असलेला थेट संपर्क याचा परिणाम होता, हे नगराध्यक्षपदाच्या निकालांनी पुन्हा सिद्ध केले. ज्या भागांमध्ये विधानसभेला महायुतीला मताधिक्य मिळाले होते, त्याच भागांमध्ये स्थानिक निवडणुकांतही महायुतीचे उमेदवार सरस ठरले. यामुळे मत ट्रान्स्फर आणि युतीतील घटक पक्षांमधील समन्वय अजूनही मजबूत असल्याचे चित्र समोर आले आहे.

या निकालांमधून विरोधकांसाठी मात्र चिंतेचा संदेश जातो. सत्ता-विरोधी लाट उभी राहील, अशी अपेक्षा होती; परंतु ती मर्यादित स्वरूपातच दिसून आली. स्थानिक प्रश्न, नाराजी किंवा नेतृत्वावरील असमाधान याचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसलेला नाही. याउलट, महायुतीने स्थानिक पातळीवरही आपली पकड टिकवून ठेवली आहे. येत्या कळत होत असलेल्या महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल महत्त्वाचे आहेत

हे निकाल पाहता महायुतीसाठी हा आत्मविश्वास वाढवणारा संकेत असला, तरी आत्मसंतोष धोकादायक ठरू शकतो. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि जनतेच्या अपेक्षा यांकडे दुर्लक्ष झाल्यास हे चित्र बदलू शकते. दुसरीकडे, विरोधकांनी केवळ सत्ताविरोधी वातावरणावर अवलंबून न राहता संघटनात्मक मजबुती आणि विश्वासार्ह पर्याय उभा करण्याची गरज या निकालांनी अधोरेखित केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT