Tanaji Sawant Sarkarnama
विश्लेषण

Tanaji Sawnat : तानाजी सावंतांची नाराजी कायम; सेनेच्या मेळाव्याला दांडी, मतदारसंघाकडे फिरवली पाठ!

Tanaji Sawant discontent News : माजी मंत्री तानाजी सावंत गेल्या दीड महिन्यापासून नाराज आहेत. त्याचा फटका परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumabai News : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर राज्यात महायुतीने सत्तास्थापना केली. मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात नाराजी दिसून आली. महायुतीमधील तीनही पक्षांनी गेल्या सरकारमधील अनेक मंत्र्यांना वगळून नवीन चेहऱ्याना संधी दिली. त्यामुळे नाराज असलेल्या आमदारांची संख्या जास्त आहे. विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेतील तीन मंत्र्यांना वगळण्यात आल्याने त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. माजी मंत्री तानाजी सावंत गेल्या दीड महिन्यापासून नाराज आहेत. त्याचा फटका परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जुलै 2019 साली जलसंधारण मंत्रीपदी वर्णी लागली होती. त्यावेळी त्यांना काहीकाळासाठी मंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर 2019 साली पहिल्यांदाच त्यांनी भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये विजयी झाले. त्यानंतर 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आले. त्यावेळी त्यांना मंत्रिपद देण्यात आले नव्हते. त्यावेळी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत मंत्रिपदासाठी पुन्हा मातोश्रीची पायरी चढणार नसल्याचे सांगितले होते.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सक्रिय राजकारणापासून वेगळे राहत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या काळात देखील सुरुवातीचे अडीच वर्ष ते मतदारसंघापासून दूरच राहिले होते. त्यानंतर जून 2022 मध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने राहिले.

शिवसेना (Shivsena) पक्ष फुटीनंतर आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दिलेली भक्कम साथ पाहता शिंदेंनी त्यांना गेल्या सरकारमध्ये महत्त्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी दिली होती. त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलत वेगळी ओळख निर्माण केली होती. दुसरीकडे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी सुरुवातीच्या अडीच वर्षात झालेले मतदारसंघाचे नुकसान भरून काढले होते.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत भूम-परंडा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या विरुद्धच्या अटातटीच्या लढतीत अल्पशा मताने विजयी झाले होते. त्यानंतर त्यांची पुन्हा राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागेल असे सर्वांना वाटत होते. मात्र, ऐनवेळी त्यांना मंत्रिपद देण्यात न आल्याने ते नाराज झाले आहेत. 16 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून शिवसेनेच्या कुठल्याच कार्यक्रमात सहभागी न होता त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नव्या सरकारमध्येही आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा सावंत यांना होती. त्यासाठी ते बरेच आग्रही होते. पण त्यांच्यसह दीपक केसरकर व अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद नाकारण्यात आले होते. सावंत यांनी मंत्रिपदावर असताना केलीली काही वादग्रस्त वक्तव्ये त्यांच्या अंगलट आली. त्यामुळेच त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते नाराज आहेत. सावंत यांनी नागपूर येथील अधिवेशनातून काढता पाय घेत त्यांनी संपूर्ण अधिवेशनाला दांडी मारली होती.

गेल्या काही दिवसापासून नाराज असलेले सावंत पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीत. दुसरीकडे परंडा मतदारसंघात जात नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसापूर्वी नव्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये धाराशिवच्या पालकमंत्रीपदी प्रताप सरनाईक यांची वर्णी लागली. मात्र, त्यांचे निवडीनंतर स्वागत करणे सावंत यांनी टाळले आहे. तर दुसरीकडे त्यांनी 23 जानेवारीला मुंबईत झालेल्या शिवसेना पक्षाच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे आता येत्या काळात ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूर्वी पालकमंत्री असताना मंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्या काळात विविध निर्णय घेतले आहेत. त्यांची अमंलबजावणी नवीन पालकमंत्री करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांच्याशी येत्या काळात सरनाईक यांना जुळवून घेणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. ते काहीच बोलत नसल्याने त्यांची नाराजी कशी दूर करणार यावर बरीच समीकरण अवलंबून राहणार आहेत.

येत्या काळात धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील आठ नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुका पाहता माजी मंत्री सावंत यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायकी ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात ते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT