Mumbai News : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने जिंकलेल्या एकूण जागा आणि राज्यातील अपयश पाहता मुंबईतील कामगिरीने त्यांना काहीसे तारले, असेही म्हणता येईल. मुंबईतील 36 जागांपैकी महायुतीला 22, तर महाविकास आघाडीला 14 जागा मिळाल्या. या निकालाचा परिणाम आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर होणार आहे.
मनसे आणि शिवसेनेमुळे मराठी मतदारांत पडलेली फूट, भाजपच्या ‘कटेंगे तो बटेंगे’च्या नाऱ्यामुळे झालेले धार्मिक ध्रुवीकरण, तसेच लाडकी बहीण योजनेला मिळालेला महिलांचा प्रतिसाद, यामुळे मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढली; मात्र त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाल्याचे स्पष्टपणे दिसते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजप आणि एकीकृत शिवसेना युतीने 36 पैकी 30 जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपला (BJP)16, तर शिवसेनेला 14 जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत मुंबईत महाविकास आघाडीला 14 जागा मिळाल्या. त्यात ठाकरे गटाला 10 जागा मिळाल्याने मुंबईतील शिवसेनेचे कॅडर बऱ्यापैकी ठाकरेंकडे कायम राहिले.
1992 च्या दंगलीनंतर शिवसेनेपासून दुरावलेला मुस्लिम समाज काँग्रेसच्या सहकार्याने पहिल्यांदा ठाकरेंकडे वळला. मराठी मते व त्यात मुस्लिम समाजाची भर पडल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा पैकी तीन जागा ठाकरे गटाने जिंकल्या. एक जागा केवळ 48 मतांनी गमावली; मात्र लोकसभेत मिळवलेले यश सहा महिन्यात ठाकरेंसह महाविकास आघाडीने गमावले.
लोकसभेत मुस्लिमांनी ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) ‘वोट जिहाद’ केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी लावून धरला. त्यातून विधानसभेत मुस्लीम समाजाविरोधात ध्रुवीकरण झाल्याने ठाकरेंचा पराभव झाल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. २०१९ च्या तुलनेत मुंबईत यावेळी ठाकरेंना चार जागा कमी मिळाल्या; मात्र मुंबईतील पक्षाचे अस्तित्त्व आणि प्रभाव अजून कायम आहे. पालिका निवडणुकीचे मुद्दे विधानसभेपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी उद्धव ठाकरेंकडे अजूनही कायम आहे. त्यासाठी त्यांना पुन्हा नव्या जोमाने पुन्हा कामाला लागावे लागणार आहे.
ठाण्यात महायुतीपुढे बेबनावाचे आव्हान...
शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला आणि भाजपचाही तितकाच ताकदीचा गड असलेल्या ठाणे जिल्ह्यातून महायुतीचे 16, तर महाविकास आघाडीचे दोन शिलेदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. यंदा महायुतीचे दोन आमदार अधिक निवडून आल्याने त्यांची ताकद नक्कीच वाढली आहे; पण त्याचा फारसा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर जाणवणार नाही.
मोठा भाऊ म्हणून भाजप स्वतःची पाठ थोपटवत असला, तरी जिल्ह्यावर शिवसेना शिंदे गटाची पकड मजबूत आहे. ती तशीच कायम राहणार असल्याने आगामी पालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर अपेक्षित कुरबूर पाहायला मिळेल; पण निवडणुका झाल्याच तर ठाण्यातील सर्व पालिकांवरही महायुतीचेच वर्चस्व असेल.
आनंद दिघे यांच्यामुळे नावारुपाला आलेला ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे यांच्यामुळे पुन्हा गाजला; पण ‘ठाकरे’ हे नाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात मात्र अजून शिंदेंना यश आलेले नाही. जिल्ह्यात शिंदेंचे वर्चस्व असतानाही ठाकरे गटाकडून त्यांना कडवी झुंज मिळत आहे. ठाकरे गटाचा एकही उमेदवार शिंदेच्या रणनीतीसमोर निवडून आला नसला, तरी उमेदवारांना मिळालेली मते लक्षवेधी आहे.
भविष्यात पालिका निवडणुका झाल्याच तर शिवसेना ठाकरे गटाचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही याची ‘काळजी’ घेतली जाईल, असे एकंदरितच आतापर्यंतच्या दोन निवडणुकांच्या अनुभवावरून दिसते.
मनसेचा राज्यातील एकमेव आमदारालाही ठाण्यातून घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. काँग्रेस तर कधीच जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांमुळे राष्ट्रवादी शरद पवार गट काहीअंशी सक्रीय राहिल; पण खरा प्रश्न महायुतीतील घटकपक्षांतील गोडवा आगामी काळातही कायम राहणार का, हा आहे.
महायुतीमध्ये जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्वावरून ठिणगी पडू शकते. पक्षनेतृत्व पातळीवर शिवसेना-भाजपमध्ये सख्य असले, तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये विस्तवही जात नाही. महापालिका, नगरपालिका निवडणुकीत हा बेबनाव पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत.
रायगडमध्ये विरोधी पक्षच जवळपास नेस्तनाबूत
रायगड जिल्ह्यात विरोधी पक्षाची ताकद जवळपास संपुष्टातच आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळविला. आता जिल्ह्यात सत्ताधारी खासदार, आमदारांची एकाधिकारशाही सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात येणारे विकास प्रकल्प, राबवण्यात येणाऱ्या विकास योजनांमध्ये सर्वसामान्यांच्या भल्याचा विचार व्हावा याबद्दल जाब विचारणारा प्रबळ विरोधक शिल्लक राहिलेला नाही. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्यांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत.
जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे. तेथेही या सत्ताधाऱ्यांना विरोध करणारे कोणीच नाहीत. निवडक व्यक्तींच्या हातात जिल्ह्याची सत्ता एकवटलेली आहे. नोकरशाहीवरही दबाव आणत ते बेकायदा कामे करीत असल्याचे येथील लोकांनी पाहिलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी, भूमाफियांचा वाढता उपद्रव, डिझेल तस्करी आदी बेकायदा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असताना सर्वसामान्य नागरिक या गुंडगिरीने त्रस्त आहे, तरीही हा सामान्य नागरिक सरकार दरबारी जाब विचारू शकत नाही. अशा परिस्थितीने जिल्ह्यात अराजकता माजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पनवेल होणार नवे सत्ताकेंद्र
पनवेल मतदारसंघात भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी शेकापच्या उमेदवाराला सलग चारवेळा चारीमुंड्या चीत करण्याचा विक्रम केला आहे. या विजयामुळे पनवेल शहर, सिडको वसाहत, पनवेल तालुक्यात त्यांचा दबदबा वाढला आहे. याचा फायदा भाजपला नक्कीच होणार आहे. सध्या प्रशांत ठाकूर यांच्यासह उरण आणि पेण येथे भाजपचे एकूण तीन आमदार आहेत. पेणचे आमदार रवींद्र पाटील हे वयाने मोठे असले, तरी भाजपमध्ये प्रशांत ठाकूर त्यांना वरिष्ठ आहेत.
ठाकूर यांचा नव्या दमाचा चेहरा म्हणून जिल्ह्यात वापर केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो.जिल्ह्यातील पनवेल हे एकमेव मोठे शहर आणि महापालिका असणारे शहर आहे.
या महापालिकेवर ठाकूर यांची मजबूत पकड आहे. ठाकूर यांनी एक-एक करून शेकापचे सर्व नेते गळाला लावले, तर काहींना पराभूत करून घरी बसविले. पनवेल या मुंबईनजीक झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरातील नेत्याची जिल्ह्यावर पकड झाल्यास भाजपला सोयीचे होणार आहे.
पालघरमध्ये भाजपची जोरदार मुसंडी
पालघर लोकसभा मतदारसंघात डॉ. हेमंत सावरा विजयी झाल्यावर भाजपने जिल्ह्यात चार उमेदवार दिले आणि त्यापैकी तिघांना निवडून आणले. शिंदे गटाचेही दोन उमेदवार विजयी झाल्याने महायुतीकडे सहापैकी पाच जागा आल्या आहेत. त्याचा फायदा महायुतीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार हे निश्चित आहे.
मागील विधानसभेत महाविकास आघाडीला दोन, बहुजन विकास आघाडीला तीन, तर शिंदे गटाकडे एक जागा होती. भाजपची पालघरमध्ये पाटी कोरीच होती.जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी भाजपने सूक्ष्मनियोजन करून पक्षसंघटन मजबूत केली. त्यानुसार लोकसभेला विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा यांना मैदानात उतरवले. त्यांनी बविआचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव केला.
लोकसभेतील यशामुळे उत्साहित झालेल्या भाजपने चार आणि शिंदे गटाने दोन, असे एकूण सहा उमेदवार दिले. बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला अक्षरशः नेस्तनाबूत करत पाच जागा जिंकल्या. केवळ डहाणू या जागेवर विजय मिळवण्यात भाजपला अपयश आले.
माकपचे विनोद निकोले येथे पुन्हा आमदार झाले. लोकसभापाठोपाठ विधानसभेतील यशामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महायुतीला होणार हे निश्चित आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्गात शिंदे शिवसेनेचा उदय...
विधानसभेच्या निकालानंतर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेचा जवळपास अस्त होत शिंदे शिवसेनेचा उदय झाला आहे. गेली तीस वर्षे मातोश्री, शिवसेनाप्रमुख आणि कोकण यांच्या असलेल्या भावनिक नात्याला आणि त्यावर आधारलेल्या भगव्या राजकारणाला हा मोठा हादरा आहे.
भविष्यात वर्चस्वाची खरी चुरस मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे शिवसेनेतच दिसण्याची शक्यता आहे. ठाकरे शिवसेनेला जिल्ह्यातील उरलीसुरली संघटनाही टिकवणे आव्हानाचे ठरेल, अशी स्थिती आहे.
दोन्ही जिल्ह्यात आठपैकी अवघ्या एका जागेवर ठाकरे शिवसेना अर्थात महाविकास आघाडी विजय मिळवू शकली. महायुतीच्या पारड्यात शिंदे शिवसेनेला पाच, भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला प्रत्येकी एक मिळून तब्बल सात जागा पडल्या. ठाकरे शिवसेनेला गुहागरच्या अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. २०१९ ला शिवसेनेला सहा आणि भाजपला एक मिळून महायुतीकडे सात जागा होत्या.
कोकणात विधानसभेची मुख्य लढत दोन शिवसेनेमध्येच होती. त्यामुळे येथे लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर ठाकरे शिवसेनेला कमबॅक करायला आणि शिंदे शिवसेनेच्या विजयासाठी संधी होती; पण भाजपच्या साथीने महायुतीने या निवडणुकीत खऱ्या अर्थाने ठाकरे शिवसेनेचा अस्त केला, असे म्हणायला वाव आहे.
दोन्ही जिल्ह्यात 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेकडे एक खासदार आणि सहा आमदार अशी पदे होती. आता या विधानसभेत खासदारकी आधी गेली आणि विधानसभेत पाच जागा शिंदे शिवसेनेने मोठ्या विजयासह मिळविल्या. शिवाय त्यांच्या मित्र पक्षाच्या पारड्यात आणखी दोन जागा आल्या.यातच ठाकरे शिवसेनेची पारंपरिक स्पर्धा असलेल्या नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र सन्मानजनक मताधिक्याने विजयी झाले. एकूणच हा सगळा निकाल ठाकरे शिवसेनेला खूप मोठा धक्का देणारा ठरला. आगामी काळात शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी चढाओढ दिसण्याची शक्यता आहे.
(लेखनः विनोद राऊत, हेमलता वाडकर, महेंद्र दुसार, सुजित गायकवाड, प्रसाद जोशी, शिवप्रसाद देसाई)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.