
Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मोठे यश मिळाले. या महायुतीच्या लाटेत राज्यातील दिग्ग्ज मंडळीचे गड ढासळले. बड्या-बड्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असतानाही धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाचे स्टार प्रचारक व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गड राखला. धाराशिव जिल्ह्यातील लोकसभेसह मतदारसंघातील तीन जागेवर शिवसेना ठाकरे गटाला विजय मिळवून दिला. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागत असताना ओमराजे हे सातत्याने चर्चेत राहिले. त्यांचा बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय असतो.
ग्रामीण शैलीतील खुमासदार वक्तृत्वशैली व त्यांच्या तडाखेबंद भाषणामुळे युवा पिढीत त्यांची मोठी क्रेझ असून दमदार वक्तृत्व शैलीच्या जोरावर त्यांनी नेतृत्व सिद्ध करून दाखवले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी व दुसरीकडे संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचं पानिपत झालं असतानाही खासदार ओमराजे निंबाळकरांनी मात्र आपल्या धाराशीव लोकसभा मतदारसंघात मविआला मोठे यश मिळवून दिले . त्यामुळे त्यांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले जात आहे.
शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटींनंतर ओमराजे खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहण्याचे कारणही तसेच आहे. त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळात बाळासाहेबांनी त्यांना साथ दिली आणि तू माझ्या मुलासारखा आहेस, असा शब्द दिला. जनतेच्या कामासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक जाहीर करणारा देशातील पहिला खासदार अशी ओमराजेंची ख्याती आहे. त्याचाच फायदा त्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झाला.
ओमराजे या नावाने लोकप्रिय असलेला हा तोच तरुण नेता आहे, ज्याला बाळासाहेबांनी वयाच्या 26 व्या वर्षी 2009 मध्ये आमदार केले होते. पुढे 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी ओमराजेंना खासदार केले. 2009 पासून युवासेनेच्या माध्यमातून राजकारणात उतरलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राणाजगजितसिंह पाटील यांना अस्मान दाखवले होते. त्यावेळेस पासूनच त्यांची युवा मंडळीत मोठी क्रेज आहे. त्यानंतरच्या काळात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राणाजगजितसिंह पाटील यांना पराभूत करून सव्वा लाख मताच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी संसदेत प्रभावी भाषणे करीत धाराशिवचा आवाज दिल्लीत गाजवला होता.
त्याच कामगिरीच्या जोरावर त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवताना त्यांनी प्रतिस्पर्धी अर्चना पाटील यांचा सुमारे 3 लाख 29 हजार मताने पराभव केला. त्याचवेळी त्यांनी लोकसभा मतदारसंघातील धाराशिव-कळंब, तुळजापूर, परंडा, उमरगा-लोहारा, बार्शी व औसा या सहा विधानसभा मतदारसंघात 50 हजार पेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवले होते. त्यामुळे ओमराजेंनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीचे व त्यांच्या लढाऊ बाण्याचं कौतुक झाले.
एकीकडे संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचं पानिपत झालं असताना ओमराजे निंबाळकरांनी मात्र आपल्या धाराशीव लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेचे उमेदवार निवडून आणले आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे विचलित न होता त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत ठाकरे सेनेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
धाराशिव विधानसभा मतदारसंघातून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. या ठिकाणच्या प्रचारात ओमराजे यांनी आघाडी घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या कैलास पाटील यांचा मतदारसंघ पिंजून काढत प्रचार सभांचा धडाका लावला होता. विशेषतः ओमराजे हे ठाकरे गटाचे स्टार प्रचारक असल्याने त्यांच्यावर धाराशिव जिल्ह्यासॊबतच इतर मतदारसंघाची देखील जबाबदारी होती. त्यांनी ती जबाबदारी निष्ठेने पार पाडली. त्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर या मतदारसंघातून कैलास पाटील सुमारे 36 हजार 566 मताने विजयी होत दुसऱ्यांदा विजयी झाले. विशेषतः गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांचे मताधिक्य दुपटीने वाढले आहे.
उमरगा मतदारसंघातील तीन टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चोगुले हे शिवसेनेतील फुटीवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे याठिकाणी उमेदवार निवडीपासून सर्व प्रक्रिया खासदार ओमराजे यांनी राबवली. या ठिकाणी लोकसभेच्या लातूर पॅटर्नची पुनरावृत्ती केली. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून लिंगायत समाजातील उपक्रमशील शिक्षक प्रवीण स्वामी यांना उमेदवारी दिली. प्रवीण स्वामी यांनी निवडणुकीच्या तोंडावर नोकरीचा राजीनामा दिला.
स्वामी यांची निवड गेल्या 6 महिन्यापूर्वीच ओमराजेंनी करून ठेवली होती. त्यांच्यासाठी ओमराजेनी जुन्या व युवा शिवसैनिकांची सांगड घालत प्रचार यंत्रणा राबवली. त्याचा मोठा फायदा या ठिकाणी झाला. शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत ठाकरे सेनेच्या प्रवीण स्वामी यांनी तीन हजार 965 मताने बाजी मारली. राजकारणाचा कसलाच गंध नसलेले प्रवीण स्वामी केवळ महिनाभरातच आमदार झाले. स्वामी यांच्या या विजयात ओमराजेंचा सिंहाचा वाटा होता.
लोकसभेसाठी धाराशिव मतदारसंघात व सोलापूर जिल्ह्यात असलेल्या बार्शी मतदारसंघातून शिवसेनेचे नेते दिलीप सोपल यांच्या विजयासाठी त्यांनी कष्ट घेतले. या ठिकाणचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी ऐनवेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करीत उमेदवारी घेतली होती. याठिकाणी राजेंद्र राऊत व दिलीप सोपल यांच्यात चुरशीची लढत झाली.
प्रचार काळात बार्शी मतदारसंघात मोठ्या सभा घेत त्यांनी संपूर्ण मतदारसंघात वातावरण निर्मिती केली. त्यातच एका सभेतून ओमराजे यांनी राजेंद्र राऊत यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर ही टीका जिव्हारी लागल्यानंतर राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. या मतदारसंघातून दिलीप सोपल यांनी राऊत यांचा 6 हजार 472 मताने पराभव केला. या ठिकाणी ओमराजेनी राबवलेली बूथ यंत्रणा व प्रचाराची रणनिती गेमचेंजर ठरली.
त्यासोबतच परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची जागा असताना ही जागा सोडली. त्यांनी याठिकाणी उमेदवार न देता महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला ही जागा सॊडली. या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्वीपासून काम करीत असलेल्या माजी आमदार राहुल मोटेला रिंगणातून उतरवले. त्यांच्या प्रचारासाठी भूम-परंडा व वाशी तालुक्यात सभा घेतल्या.
त्यामुळे या ठिकाणची लढत मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची ठरली. या ठिकाणी एक हजार 509 मताच्या फरकाने आरोग्य मंत्री तानजी सावंत यांनी राहुल मोटेंचा पराभव केला. याठिकाणी ही ओमराजेंनी प्रचार सभा घेत मोठी वातावरण निर्मिती केली होती.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला सुटला होता. काँग्रेसने या ठिकाणी धीरज पाटील यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी याठिकाणी बाजी मारली. त्यांनी याठिकानी सुमारे 36 हजार 879 मताने धीरज पाटील यांना पराभूत केले. तर धाराशिव मतदारसंघात असलेल्या लातूर जिल्ह्यात असलेल्या औसा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दिनकर माने यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते प्रचाराची संपूर्ण यंत्रणा राबवत त्यांच्या विजयासाठी कष्ट घेतले होते. मात्र याठिकाणी विद्यमान भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी दुसऱ्यांदा 33 हजार 862 पेक्षा अधिक मताने विजय मिळवला.
या ठिकाणी लोकसभा निवडणुकीपासूनच मतदारसंघ पिंजून काढताना त्यांनी धाराशिव, बार्शी व औसा या ठिकाणी महिलांसाठी होम मिनिस्टरचे आयोजन केले. या स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलानी मतदान केले. त्यासोबतच जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी त्यांनी रोजगार मेळावे घेत युवा वर्गाला सोबत घेतले त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहावयास मिळते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.