

Political News : गावातील दूध गोळा करता करता या माणसाला समाजकार्याची आवड निर्माण झाली. त्यांनंतर ते एका मंडळाचे कार्यकर्ते झाले. सातत्याने नागरिकासाठी काम करत असल्याने सर्वांनाच त्यांचे कौतुक वाटायचे. त्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांना डायरेक्ट सरपंच केले. पुढे जाऊन हा माणूस आमदार झाला, राज्यमंत्रीही झाले. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतार अनुभवले. घरात कसलाच राजकीय वारसा नसताना त्यांनी विधानसभेत अहिल्यानगर जिल्ह्यातून पाच वेळा प्रतिनिधीत्व केले. त्यांचे नात्यागोत्यांचे, म्हणजेच सोयरिकीचे राजकारण नेहमीच चर्चेत राहिले.
शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांचा जन्म 4 डिसेंबर, 1958 रोजी अहिल्यानगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे एका शेतकरी-कुटुंबात झाला आणि त्यांनी प्रारंभी दूध गोळा-विक्रीचा व्यवसाय सुरु केला. कर्डिले यांचा मूळ व्यवसाय दूध विक्रीचा होता. सुरूवातीला दुधाचा व्यवसाय होता. दूध विकण्यासाठी ते नगर शहरात येत. मात्र, नेतृत्व आणि संघटन कौशल्य असल्याने तेव्हापासूनच त्यांना राजकारणाचे वेध लागले होते. एक एक पायरी चढत गेलेते स्वतः दुधाचे रतीब घालायचे. या दुधवाल्याचा पेहराव एकदम साधा होता. डोक्यावर गांधी टोपी, पांढरा कुर्ता-पायजमा, साधी चप्पल, माथी वारकरी टिळा, असायचा. जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यासह पोलिस अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत ते दुधाचे रतीब त्याकाळी घालत होते.
यातून त्यांचा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क आला. या ओळखीतून ते गावातील आडल्यांची छोटी-मोठं कामं मार्गी लावू लागले. तरुणपणात त्यांनी गावोगावचे कुस्त्यांचे फडही गाजवले होते. त्यामुळे त्याचा देखील त्यांना राजकीय जीवनात मोठा फायदा झाला. कर्डीले हे महाराष्ट्रातील एका ग्रामीण पार्श्वभूमीवरचे राजकीय नेते होते. त्यांचा प्रवास दूध व्यवसायापासून सुरू होऊन लोकशाही प्रतिनिधित्व आणि सहकार चळवळीत मोठ्या प्रमाणावर झळकला.
गावातील सामाजिक व मंडळ-कार्यातून ते सक्रिय झाले आणि स्थानिक सरपंचाच्या पदापासून राजकीय जीवनात त्यांनी पाऊल ठेवले. या दुधवाल्याकडून कामे मार्गी लागतात, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली. कोणतंही काम असलं की, दुधवाल्याकडे, म्हणजे शिवाजी कर्डिले ग्रामस्थ धाव घेऊ लागले. यातून शिवाजी कर्डिले यांचा जनसंपर्क वाढला. गावाबरोबर आजूबाजूच्या पंचक्रोशीत शिवाजी कर्डिले कामे मार्गी लावतात, अशा चर्चा होऊ लागल्या. यातून शिवाजी कर्डिले यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली. सरपंच असल्याने काम कशी मार्गी लावायची, कसा पाठपुरावा करायचा, याचा अनुभव होताच.
प्रशासनातील अधिकारी देखील आपल्या घरचा दुधवाला म्हणून कामं मार्गी लावायचे. विशेष म्हणजे, काम मार्गी लागण्याचा पाठपुराव्यापासून ते, पूर्ण झाल्यानंतर त्याचे आभारापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना शिवाजी कर्डिलेंकडून आवर्जुन रिप्लाय जायचा. यातून शिवाजी कर्डिले यांच्या कामाची पद्धत अधिकच चर्चेत आली आणि ते लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले. शिवाजी कर्डिले यांची दुधवाल्यांमध्ये देखील, आपला माणूस म्हणून चर्चा असायचीच. पुढं-पुढं प्रशासकीय अधिकारी देखील शिवाजी कर्डिले यांचे काम म्हटल्यावर, शेतकऱ्यांची कामं म्हटल्यावर मार्गी लावण्यासाठी मदत करायचे.
यातून शिवाजी कर्डिले यांनी पुढे थेट आमदारकीपर्यंत मजल मारली. आपला दुधवाला म्हटल्यावर पंचक्रोशीतील लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवाजी कर्डिले यांना बळ दिले. त्यावेळी नगर-नेवासा विधानसभा मतदारसंघ होता. 1995 त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. तिथं एकहात्ती विजय मिळवला. तोच कित्ता त्यांनी पुढे 1999 गिरवला. दोन वेळा ते अपक्ष आमदार राहिले. शिवसेनेला त्यांनी या काळात बाहेरून पाठिंबा दिला होता. पुढे ते राज्यमंत्री झाले. त्यांना मत्स्य व बंदरे विकास खाते मिळाले. कर्डिले यांचा राजकीय प्रवास अत्यंत उल्लेखनीय आणि चढ-उताराचा असाच होता. त्यांनी एका सामान्य दूध व्यावसायिकापासून सुरुवात करून आमदार आणि राज्यमंत्रीपद भूषवले.
यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. हा राजकीय प्रवास पुढे भाजपपर्यंत जाऊन पोहोचला. शिवाजी कर्डिले यांनी आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर कधीही मागे वळून पाहिले नाही. भाजपमध्ये असताना त्यांनी आपली दुधवाला म्हणून त्यांची प्रतिमा तशीच होती. त्यांनी 1984-1995 पर्यंत अहिल्यानगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथील सरपंचपद भूषवले होते.
1995 मध्ये नगर-नेवासा मतदारसंघातून अपक्ष म्हणून प्रथमच विधानसभा निवडणूक जिंकून आमदार झाले होते. त्यांनतर 1999 साली पुन्हा याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले. 1995 मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री, मत्स्य आणि बंदरे विकास म्हणूनही काम पाहिले. याच काळात त्यांनी सहकाराने खुणावले. ते 2007 मध्ये जिल्हा सहकारी बँकेचे संचालक झाले. 2008-09 जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. 2009 मध्ये लोकसभेसाठी त्यांनी नशीब आजमावले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढवताना त्यांनी त्यावेळी भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी आणि दिवंगत माजी आमदार राजीव राजळे यांच्याशी लढत दिली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
निवडणूक आयोगाकडून पुढे विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाली. यात नगर-नेवासा मतदारसंघाचे विभाजन झाले. हा मतदारसंघासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा नेला होता. यातून राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. 2009 मध्ये शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 आणि 2014 पर्यंत त्यांनी आमदारकीची बाजी मारली. मात्र 2019 मध्ये त्यांचा राहुरीचे प्राजक्त तनपुरेंकडून पराभव झाला.
भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात महायुतीची सत्ता येताच, जिल्हा सहकारी बँकेत सत्तांतर घडवले. शिवाजी कर्डिले यांना 2023 मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन केले. आता 2024 मधील विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात अतिशय सूक्ष्म नियोजन करून, कर्डिले यांनी विजय मिळवला. सहा वेळा आमदारकी लढवताना, शिवाजी कर्डिले यांचा 2019 मध्ये एकदाच पराभव झाला होता. तर लोकसभा लढवताना, 2009 मध्ये पराभव झाला.
कर्डीले यांनी आमदार आणि राज्यमंत्री म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक समाज उपयोगी कामे केली. त्यांचा प्रवास एका सामान्य दूध व्यावसायिक ते प्रभावी लोकप्रतिनिधी असा असल्यामुळे त्यांची नाळ नेहमी सामान्यांशी जोडलेली राहिली. राज्यातील दुष्काळाच्या वेळी तयांनी सर्वसामान्य नागरिक व शेतकरी डोळ्यांसमोर ठेवूं अनेकांना सढळ हाताने त्यांनी मदत कार्य केले. मंत्री असताना त्यांची ओळख 'छावणी मंत्री' अशीच झाली होती. विशेषतः नगरचे अल्पकाळ पालकमंत्री असताना, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी जनावरांसाठी छावण्या त्यांनी उभ्या केल्या होत्या. या कठीण काळात त्यांनी जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू करण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांना 'छावणी मंत्री' म्हणून ओळख मिळाली. हे काम त्यांच्या जनतेप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे उदाहरण आहे.
कर्डीले यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना कसलाच भेदभाव केला नाही. ते सर्वांचे काम मार्गी लावत होते. दूध व्यवसायिक असतानाच ते नागरिकांच्या समस्यांमध्ये लक्ष घालू लागले आणि लोकांच्या समस्या ते प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते. यामुळे प्रशासनातही त्यांचे काम म्हटले की शेतकऱ्यांची कामे लवकर केली जात होती.
सामान्य लोकांशी असलेला जनसंपर्क हा त्यांच्या कामाचा पाया होता. राजकीय पदे मिळाली तरी त्यांनी सामान्य लोकांशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. कर्डिले हे कोणत्याही पराभवानं खचले नाहीत. त्यांच्या यशाचं गणित जनसंपर्कात होते, असे त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सांगतात. प्रशासकीय काम करून घेण्याची हातोटी होती. त्यांनी राजकारण करताना, विरोधांना कधीही टार्गेट करत राहिले नाहीत. परंतु विरोधकांना कायम शह देत राहिले. विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी, त्यांचा जनसंपर्क फायदा ठरायचा. हा जनसंपर्क त्यांच्या सरपंच काळापासूनचा होता. मतदारसंघासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ते नावाने ओळखणारे कार्यकर्त्यांची फौज होती.
कार्यकर्त्यांची, ग्रामस्थांची कामे मार्गी लावण्यासाठी शिवाजी कर्डिले यांचा रोज सकाळी निवासस्थानी 'जनता दरबार' व्हायचा. या 'जनता दरबारा'ची पद्धत त्यांच्या पहिल्या आमदारकीपासून सुरू होती, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. तो कालपर्यंत सुरू होता. मध्यंतरी त्यांचे आजारपण उफाळले होते. उपाचारानंतर त्यांना डॉक्टरांना पूर्ण आराम सांगितला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची उपचारा दरम्यान भेट घेऊन, आरामाचा सल्ला दिला होता. निवासस्थानी दाखल होताच, सुरूवातीचे काही दिवस आरामानंतर पुन्हा 'जनता दरबार' सुरू झाले होते.
ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जोडण्याचे त्यांनी दमदार काम केले. जनतेशी जोडलेली नाळ शेवटपर्यंत तुटू दिली नाही. त्यांच्या मतदारांमध्ये त्यांची ओळख ‘लोकाभिमुख नेता’ अशीच होती. दूध व्यवसायातून उभे राहत त्यांनी सहकार चळवळ व ग्रामीण विकास यावर लक्ष केंद्रीत केले. राजकारणात वाद-विवाद आणि आरोप देखील झाले, पण त्यांच्या प्रभावशाली राजकीय प्रवासाला लोकांनी मान्यता दिली.
कर्डीले यांनी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणलेली जल जीवन मिशन ग्रामीण पाणीपुरवठा योजना महत्वपूर्ण ठरली आहे. या योजनेअंतर्गत गावागावांत शुद्ध पाणी मिळावे, ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरावा व पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी हे उद्दिष्ट ठेवले त्यांनी ठेवले होते. ठराविक भागात कामाची मात्रा दिली. “एमआयडीसी ते अरणगाव” या भागात एका कामाचे १५ कोटी ५९ लाख ७८ हजार ४५० रुपयांच्या खर्चाने भूमिपूजन झाले आहे. कर्डीले यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला आहे. विशेषतः त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पाणीपुरवठ्याचा ग्रामीण भागात सुधारणा करण्यावर जोर दिला आहे.
कर्डीले यांच्या कुटूंबात पत्नी, तीन मुली, एक मुलगा आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप त्यांचे जावई आहेत. त्यांनी दोन वेळा महापौरपदही भूषवले आहे. त्यांची मोठी मुलगी शीतल जगताप महापालिकेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. त्यांचे दुसरे जावई संदीप कोतकर हे माजी महापौर आहेत. कर्डीले यांच्या कन्या सुवर्णा कोतकर या महापालिकेत उपमहापौर राहिलेल्या आहेत. तर आणखी एक जावई अमोल गाडे आहेत. तर कर्डिलेंच्या कन्या ज्योती गाडे या महापालिकेच्या नगरसेविका होत्या. त्यासोबतच त्यांचा मुलगा अक्षय कर्डीले हा सध्या राजकारणात सहभागी असून भाजप युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे. कर्डीले यांचा संपूर्ण परिवाराच राजकारणात सक्रिय आहे.
दिवाळी फराळ अन् धोंड्याचं जेवण
दिवाळी पाडव्याला त्यांच्या निवासस्थानी फराळचा कार्यक्रम व्हायचा. यावेळी देखील त्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला जिल्हासह राज्यभरातील प्रमुख नेते, प्रशासनातील अधिकारी, जुने-जाणते कार्यकर्ते, नातेवाईकांना आमंत्रित केले जात होते. हा फराळचा कार्यक्रम त्यांनी एखादा अपवाद वगळता कधी खंड पडू दिला नाही. धोंड्याच्या महिन्यात देखील, ते मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नातेवाईकांना बोलावून जेवणाचा कार्यक्रम करायचे. आता त्यांच्या जाण्याने, अशा त्यांच्या जुन्या आठवणींना कार्यकर्ते,पदाधिकारी आणि नातेवाईक उजाळा देऊ लागले आहेत.
दरम्यान, विविध आरोपांमुळे आणि गुन्हे दाखल झाल्याने शिवाजी कर्डिले हे अनेकदा वादातही सापडले होते. मात्र दांडगा जनसंपर्क आणि सतत लोकांमध्ये मिसळण्याची आवड यामुळे त्यांनी जिल्ह्यातील आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.