

PM Modi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या तीन दिवसांपासून कामकाज होऊ शकलेलं नाही. विरोधीपक्ष पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्याच्या सेशनमध्ये माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळं दोन दिवस मोठा गदारोळ माजला होता. विरोधक आणि सत्ताधारी खासदारांकडून एकमेकांना जोरदार विरोध केला जात होता. त्यामुळं वारंवार लोकसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं होतं.
दरम्यान, काल संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडणार होते. पण त्यांचं भाषण होऊ शकलं नाही आणि मोदींच्या भाषणाशिवयाचं धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पण मोदींनी भाषण न करण्यामागं त्यांच्यावर काँग्रेसच्या महिला खासदारांचा हल्ल्याचा कट होता असा आरोप लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केला आहे.
माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रात भारत-चीन सीमेवर चीनकडून भारतावर चाल करुन येत असल्याचा उल्लेख असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणात हात वर करत 'तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा', असा आदेश तत्कालीन लष्करप्रमुख जनरल नरवणे यांना दिला होता. नरवणेंच्या पुस्तकातील या दाव्यावर 'कारवां' या मासिकात लेख छापून आल्याचा संदर्भ राहुल गांधी देत असताना याबाबतची माहिती मांडण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत होते. पण सत्ताधारी खासदारांनी त्यांना बोलूच दिलं नाही.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, खासदार निशिकांत दुबे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना भाषण करण्यापासून अडवत तुम्ही सभागृहात कुठल्याही वर्तमानपत्रांतील लेखांचा किंवा अप्रकाशित पुस्तकांचा संदर्भ देऊ शकत नाही. पण राहुल गांधी राहून राहून आपला एकच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळं अनेकदा सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. त्यातच काल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांसमोर कागद भिरकावल्यानं ८ खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं.
दरम्यान, हाच मुद्दा काल काँग्रेसकडून याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषणादरम्यान घेरण्याचा प्रयत्न केला जात होता. यासाठी काँग्रेसच्या महिला खासदारांचा एक गट पंतप्रधानांच्या दिशेनं येत होता. यावेळी पंतप्रधान आपल्या भाषणासाठी तयार होते. या महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या जागेभोवती घेराव घातल्यासारखी स्थिती निर्माण केली होती. ही परिस्थिती भीतीदायक होती पण संसदीय कार्यमंत्र्यांनी तत्काळ यात हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली, असा आरोप भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी केला. तर पंतप्रधानांवर हल्ल्याची शक्यता असल्यानं आपणच त्यांना भाषणासाठी सभागृहात येऊ नये अस सांगितल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं.
मनोज तिवारी यांनी सांगितलं की, पंतप्रधानांवर हल्ल्यासाठी येत असलेल्या महिला खासदारांमध्ये वर्षा गायकवाड, ज्योतिमणी, प्रतिभा धानोरकर यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या हातात 'डू व्हॉट इज राईट' असं लिहिलेला बॅनर आपल्या हातात पकडला होता. आदल्या दिवशी काँग्रेसच्या ८ खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी त्यांचं आंदोलन सुरु होतं. या काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या जागेजवळ उभं राहून आंदोलन करत होत्या, असा दावाही खासदार मनोज तिवारी यांनी केला आहे.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या खासदारांनी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेल्या मोदींवर हल्ल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हल्ला करण्यासारखं आमच्या हातात काहीही नव्हतं. केवळ विरोधाचा बॅनर होता. हातातील काचेल्या बांगड्यांनी हल्ला करणार होते हे जे सांगितलं जात आहे, ते साफ खोटं आहे. लग्न झाल्यापासून मी कधी हातात काचेच्या बांगड्या घातलेल्या नाहीत, असंही गायकवाड यांनी सांगितलं. आम्ही आमचं म्हणणं सातत्यानं अध्यक्षांना सांगत होतो, यावेळी एक नव्हे दोनदा नव्हे तर वारंवार भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे आपल्या जागेवरुन उठून काहीतरी वेगळाच विषय काढून सभागृहाला विचलित करत असतात. बेजबादारपणे भाषा ते वापरतात. काल तुम्ही वेगळं नरेटिव्ह मांडत होतात, आज तुम्ही महिला खासदार हल्ला करणार असल्याचं वेगळं नरेटिव्ह घेऊन आलात. भाजप इतकं खोटं बोलत हे काय तुम्हाला आज माहिती आहे. खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपची निती आहे, हे तुम्हाला माहिती नाही का? काहीही झालं तरी आम्ही सत्त बोलत राहणार असं यावेळी वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.