

Prithviraj Chavan: शिवसेना उदधव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदार नुकतेच फुटले आणि त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे २० खासदार फुटले आणि त्यांनी आपला गट एका कोणालाही माहिती नसलेल्या पक्षात विलीन केला. त्याच्याही आधी आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे ६ खासदार फुटले आणि त्यांनी आपला गट थेट भाजपतच विलीन केला.
या ताज्या तीन घटनांमुळं आणि तत्पूर्वी २०२२ मध्ये मूळ शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह आपल्या वेगळ्या गटासह पक्षावरच दावा केला. पण ही सगळी पक्षांतरी पक्षांतरबंदी कायद्याला डावलून झाली आहेत. याच पक्षांतरबंदी कायद्याबाबत एक महत्वाची माहिती दिवंगत माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिली होती. या माहितीबाबतचा गौप्यस्फोट नुकताच पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वाहिनीशी बोलताना केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "राजीव गांधींनी 1980 च्या दशकात पक्षांतरबंदी कायदा पहिल्यांदा आणला, कारण उत्तरेच्या काही राज्यांमध्ये घोडेबाजार सुरु झाला होता. कारण दिवसभरात दोन-दोन माणसं इकडं तिकडं गेली होती. हे थांबवण्यासाठी चांगल्या उद्देशानं राजीव गांधींनी पक्षांतरबंदी हे विधेयक आणलं. यामध्ये एक तृतीयांश खासदार जर फुटले तर त्यांना परवानगी दिली गेली होती पण त्यानंतर हा कायदा अधिक कडक करण्य्यासाठी २००३ साली पंतप्रधान वाजपेयी आणि त्यांचे सहकारी अरुण जेटली यांनी या पक्षांतरबंदी विधेयकात बदल केले आणि दोन तृतीयांशची अट टाकली.
चव्हाण पुढे म्हणाले की, "मला आठवतंय आम्ही संसदेत बसलेलो असताना अरुण जेटली मला स्वतःहून म्हणाले की, पृथ्वीराज दोन तृतीयांशची अट टाकल्यानं आता बिल्कुल पक्षांतर होणार नाही. मला अरुण जेटलींचे ते शब्द आजही आठवतात. महाराष्ट्रात आज जे काही होतंय त्यामुळं. पण ठीक आहे कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचं होतं, कोणाला तरी मंत्रीपदं पाहिजे होती. त्यांनी घोडेबाजार केला त्यांना ५० खोकी काय पाहिजे होतं ते त्यांनी केलं, असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटंल आहे"
पण माझा राग आहे सुप्रीम कोर्टावर आहे, तो असा की, हा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना सरन्यायाधिशांनी या खटल्याची सुनावणी का केली नाही? कारण निर्णय न घेतल्यामुळं जो लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीची जी अपरिमित हानी झाली ती कधीही भरुन येणार नाही. ती मालिका पुढे सुरु आहे. आज सहा लोक गेले. हा घोडेबाजार आहे, आज आकडे बोलले जातात की, आमदाराची किंमत ५० खोके तर खासदाराची किती? असं त्रैराशिक मांडलं जातंय. त्यामुलं काय झालंय की, माझं स्पष्ट मत पाहिजे की, पक्षांतर बंदी विधेयक रद्द केलं पाहिजे आणि अगदी सोप्प विधेयक आणलं पाहिजे की तुम्ही पक्ष बदलला की राजीनामा दिलाच पाहिजे. त्यामुळं पक्ष बदलून इकडून तिकडे उड्या मारायच्या हे बिल्कूल खपवून घेतलं जाता कामा नये. हे सुप्रीम कोर्टाच्या प्रोत्साहानामुळं हे घडतं आहे.
दरम्यान, एखाद्या माणसानं सरकारी काम करायला जर काही पैसे घेतले तर ते आपण समजू शकतो पण हा जो भ्रष्टाचार आहे लोकशाहीतला तो अत्यंत चीड आणणारा प्रकार आहे. मला वाटतं की महाराष्ट्रात काही लोकशाही अस्तित्वात नाही, अशी तिखट शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.