
रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यात संघर्ष उफाळला आहे.
माजी आमदारांच्या वारसदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने शिवसेनेच्या अस्वस्थतेत भर पडली आहे.
गोगावलेंच्या 'चेकमेट' वक्तव्यावर अजित पवारांनी पलटवार करत राजकीय वातावरण तापवले आहे.
Raigad Political News : रायगडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार, सुनील तटकरे आणि शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्यात वाद वाढला आहे. तर गोगावलेंसह शिवसेना आमदारांच्या अडचणीत वाढ करणारी खेळी तटकरे खेळताना दिसत आहे. नुकताच रायगडमध्ये माजी आमदारांच्या मुलांचा पक्ष प्रवेश राष्ट्रवादीत झाला. त्यावरून शिवसेनेला घेरण्यासह चेकमेट देण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा येथे सुरू झाली आहे. यादरम्यान गोगावले यांनी शिवसेनेला चेकमेट देणारा अद्याप तयार झालेला नसल्याचे वक्तव्य केलं होते. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पलटवार केला आहे. सध्या या वार-पलटवारामुळे रायगडचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरेंनी रायगडमध्ये आपल्या विरोधकांना घेरण्याची रणनीती आखली. त्यांनी गोगावलेंसह कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधकांना आपल्या पक्षात घेतले. त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणत महत्वाची पदेही दिली आहे. गोगावले यांना मतदारसंघातच तुल्यबळ प्रतिस्पर्धी निर्माण करण्यासाठी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना ताकद दिली आहे. तर नुकताच शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांना फोडत माणगावमध्ये राष्ट्रवादी भक्कम केली आहे. तसेच काँग्रेसमधून प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना अशा शीतयुद्धाच्या दुसऱ्या अंकाला सुरूवात झाल्याची चर्चा आहे.
यावरूनच गोगावले यांनी, राष्ट्रवादीला डिवचले होते. तसेच तटकरे यांना शिवसेनेनं फक्त एका मतदारसंघापर्यंतच मर्यादित ठेवले होतं. त्यामुळेच ते आता बाहेर पडताना दिसत आहेत. माजी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी, अशोक दादा साबळे यांचा मुलगा, मधुकर ठाकूर यांचा मुलगा या तिन्ही माजी आमदाराच्या मुलाला घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असतं की आपण शिवसेनेला चेकमेट देऊ शकतो. परंतु अजून शिवसेनेला चटपट देणारा तयार झालेला नाही. त्यांनी त्याचं काम करावं, आम्ही आमचं काम करू. पण ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी हे त्यावेळा आम्ही दाखवून देऊ असे आव्हान दिले होते.
याच आव्हानावर अजित पवार यांनी पलटवार केला आहे. त्यांनी, गोगावलेंच्या आव्हानाकडे रोख करताना, आम्ही कारे ला कारे करणारे आहोत. माझीच तशी सवय असल्याने तुम्ही ते का करू नये? जर कोण अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घ्या. पण कोणी आमच्या अंगावर यावचं कशाला? तरीही कोणाही तशी बुद्धी सुचलीत तर मागे पुढे पाहू नका. पण कारण नसताना कोणाला अंगावर घेऊ नका.
मात्र आम्ही कोणाच्या नादी लागत नाही, आमच्याही नादी कोणी लागू नये. पण नादी लागलाच तर मग काय करायचं? त्यावेळी मागे घटू नका, त्याला शिंगावरच घ्या, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांनी हा सल्ला भरत गोगावले यांनी इशारा दिल्यानंतर दिला आहे. यामुळे रायगडमध्ये सुरू असलेल्या वादात आता अजित पवारांची एन्ट्री झाल्याने आता पुढे काय होणार याकडेच जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
1. रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यातील वाद नेमका काय आहे?
तटकरे यांनी शिवसेना विरोधकांना पक्षात सामावून घेतल्याने गोगावले अस्वस्थ झाले असून, त्यांनी 'चेकमेट' असं वक्तव्य केलं.
2. अजित पवार यांची प्रतिक्रिया काय होती?
अजित पवारांनी गोगावले यांच्या विधानावर पलटवार करत, चेकमेट करणारे नेते राष्ट्रवादीत तयार आहेत असं वक्तव्य केलं.
3. यामुळे महायुतीमध्ये कोणते बदल होऊ शकतात?
महायुतीतील अंतर्गत वाद उघड होत असून, स्थानिक निवडणुकीत गटबाजी व ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.