Aimim News : लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही नशिबी पराभव आलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. पाच वर्ष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे दिल्लीत प्रतिनिधित्व, त्याआधी विधानसभेत आमदार म्हणून केलेली कामगिरी आणि एमआयएमचा महाराष्ट्रातील पहिला खासदार होण्याचा मान असलेल्या इम्तियाज जलील यांचा सलग दोन पराभवानंतरही राजकीय दबदबा कायम आहे.
वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी झालेली गर्दी, केवळ पक्षाचेच नाही तर सर्वसामान्यांकडून त्यांच्यावर झालेला शुभेच्छांचा वर्षाव हा त्यांनी आमदार, खासदार म्हणून केलेल्या कामाचा, घेतलेल्या भूमिकेचाच परिणाम असल्याचे बोलले जाते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या पंधरा दिवसात प्रचार आणि विजय मिळवत एमआयएमने (Aimim) जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. अर्थात शिवसेना-भाजप युती तुटल्याचा मोठा वाटा त्यांच्या विजयात होता.
पण पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या इम्तियाज जलील (Imtiaz jaleel) यांनी आपली राजकीय कारकीर्द चांगलीच गाजवली. विधीमंडळात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले जातात, आमदारांनी हा धंदा केला आहे, या त्यांच्या खळबळजनक आरोपाने मोठा राजकीय धुराळा उडाला होता. महापालिका निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावताना अनेकदा आक्रमक होत त्यांनी आपली वोट बँक जपली. शहरवासियांच्या पाणी प्रश्नाला जसे सत्ताधारी पक्ष जबाबदार आहेत, तसेच विरोधी पक्ष असलेला एमआयएम त्यांचे नगरसेवक आणि नेतेही असल्याचा सातत्याने त्यांच्यावर आरोप केला गेला.
समांतर जलावाहिनीला इम्तियाज जलील व त्यांच्याच पक्षाने विरोध केला होता, हे सध्या पाणी प्रश्नावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपातून पुन्हा सांगितले गेले. जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे एमआयएम पक्षाची ताकद शहर आणि ग्रामीण भागातही वाढली आहे. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाला याचे श्रेय निश्चितच जाते. आमदार पदाचा कार्यकाळ संपत आल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न इम्तियाज जलील यांच्यापेक्षा त्यांच्या पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर होता.
शहरी भागावर मजबूत पकड असलेला आपला पक्ष लोकसभेची निवडणूक लढवू शकणार नाही, असे मत स्वतः इम्तियाज जलील यांनी ओवेसी यांच्याकडे आधी मांडले होते. परंतु दरम्यानच्या काळात ग्रामीण भागाचा केलेला दौरा, मतदारसंघावर मजबुत पकड असलेल्या शिवसेनेतील बंडाळी पाहता हीच योग्य संधी असल्याचे ठाम मत इम्तियाज आणि त्यांच्या समर्थकांचे बनले. ओवेसी यांच्याकडे आपली ताकद नाही असे सांगितल्यानंतर पुन्हा लढा सांगण्याचे धाडस इम्तियाज यांनी दाखवले आणि 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमने ऐतिहासिक विजय मिळवला.
एमआयएम पक्षाला महाराष्ट्रातला पहिला खासदार तो ही शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून मिळाला. या यशानंतर इम्तियाज जलील आणि पक्षाने मागे वळून पाहिले नाही. इम्तियाज जलील यांची संसदेतील आक्रमक भाषणं, त्यांनी मांडलेले मुद्दे यांची तुलना आधीच्या लोकप्रतिनिधींशी केली जाऊ लागली. खासदार असूनही लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाशी भांडणारे इम्तियाज जलील केवळ मुस्लिमच नाही, तर हिंदू बहुल भागातही लोकप्रिय ठरले. अर्थात या राजकीय प्रवासात त्यांच्यावरही पक्षांतर्गत आरोप, टीका झाली. पण ओवेसी यांनी इम्तियाज यांच्यावर विश्वास दाखवत आरोप करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
सत्ताधाऱ्यांना फोडला घाम..
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील दुसऱ्यांदा मैदानात उतरले. शिवसेनेत फूट पडली असली तरी याचा फायदा मात्र यावेळी एमआयएमला होऊ शकला नाही. मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेले वातावरण, शिवसेनेने मराठा असलेल्या संदीपान भुमरे यांना दिलेली उमेदवारी याचा फटका इम्तियाज जलील यांना बसला. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब ठरली ती म्हणजे त्यांना हिंदू बहुल भागातून मोठ्या प्रमाणात झालेले मतदान. मग याच जोरावर त्यांनी विधानसभेला वेगळी राजकीय खेळी करत स्वतः मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात पूर्वमधून लढण्याचा निर्णय घेतला. तर मध्य मधून नासेर सिद्दीकी यांना दुसऱ्यांदा संधी दिली. दोन्ही उमेदवारांनी लढत चांगली दिली, पण त्यांना यश आले नाही.
लोकसभा आणि विधानसभा अशा सलग दोन निवडणुकीत पराभव झाल्यानंतर एखाद्या नेत्याची किंवा त्याच्या पक्षाची ताकद, चर्चा, वर्चस्व कमी होते. इम्तियाज जलील यांच्या बाबतीत मात्र वेगळेच घडले. आमदार, खासदार असतांना जितक्या चर्चेत ते नव्हते, त्यापेक्षा कितीतरी अधिक चर्चा त्यांची सध्या राजकीय वर्तुळात आहे. महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री, खासदार यांच्यावर कडाडून हल्ला चढवत त्यांच्या बेकायदेशीर मालमत्ता खरेदीची प्रकरण बाहेर काढत इम्तियाज जलील यांनी गेल्या दोन महिन्यापासून धुमाकूळ घातला.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे पाचशे कोटीच्या जमीनीचे प्रकरण काढत इम्तियाज यांनी राजकीय फुटेज मिळवले. शिरसाट यांची बेकायदा मालमत्ता आणि हिबानामाच्या आधारे भुमरे यांच्या ड्रायव्हरला बक्षिस म्हणून मिळालेल्या जमीनीची आता चौकशी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे इम्तियाज जलील यांनी जे आरोप भुमरे-शिरसाट यांच्यावर केले त्याचे सगळे कागदोपत्री पुरावे देखील माध्यमांसमोर आणले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेल्या पलटवाराचा परिणाम इम्तियाज जलील यांच्यावर झाला नाही.
महापालिका निवडणुकीत कस लागणार..
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता एमआयएमने आपले सगळे लक्ष हे आगामी महापालिका निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. दलित-मुस्लिम मतांच्या बेरजेचे राजकारण करून महापालिकेच्या सत्तेला गवसणी घालता येते का? याची चाचपणी इम्तियाज जलील यांच्याकडून सध्या सुरू आहे. खासदार आझाद उर्फ रावण यांच्या पक्षाशी युती करण्यासंदर्भात एमआयएमने प्राथमिक बोलणी केली आहे. याचा कितपत फायदा त्यांना होतो हे महापालिका निवडणुकीत दिसून येईल. तुर्तास आमदार, खासदार नसतानाही इम्तियाज जलील आपला राजकीय दबदबा राखून असल्याचे स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.