
Sangli News : कोल्हापूर सांगलीसह साताऱ्याला धोकादायक ठरणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात आज (ता.18) चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सर्वपक्षीय विरोधी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोन करण्यात आले असून महाराष्ट्र सरकारने योग्य भूमिका न घेतल्यास थेट अलमट्टीवर धडक देऊ असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधी संघर्ष समितीने सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील अंकली टोल नाक्यावर तीन तास चक्काजाम आंदोलन केले.
यावेळी अपक्ष खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुण लाड, गणपतराव पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, उल्हास पाटील, प्रकाश आवाडे, सावकार मादनाईक, राजूबाबा आवळे, रजनी मगदूम, यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीसह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच महापुराचा फटका बसणाऱ्या वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यातील पूरबाधित शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यावर ठाम असून केंद्रीय जलमंत्र्यांनी कर्नाटकच्या शिष्ट मंडळाला बैठकीसाठी बोलावलं आहे. पण याच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने कोणतीच भूमिका घेतलेली नाही. फक्त तोंडी चेतावणी देण्याचे काम सध्या सुरू आहे. यावरून सर्वपक्षीय विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज अंकली टोल नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ज्यात कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. तसेच कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात लढण्याचा निर्धार करण्यात आला. येथे दोन तास चक्काजाम करण्यात आला. यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन दोन्ही बाजूस लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर ठिय्या मांडला. तसेच या प्रकरणी सरकारकडून बैठकीसाठी जोपर्यंत लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका घेतली. ज्यामुळे प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. यानंतर जलसंपदा विभागाकडून लेखी पत्र देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पण मुंबईतील बैठकीत जर ठोस निर्णय झाला नाही तर थेट अलमट्टीवर धडक देऊ असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी सतेज पाटील म्हणाले, एकीकडे कर्नाटक सरकार केंद्रापर्यंत जाऊन आपली बाजू मांडून अलमट्टी धरण उंची वाढविण्यावर ठाम असल्याचे सांगत आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र शासनाने धरणाबाबतची आपली नेमकी अद्यापही स्पष्ट केलेली नाही. यामुळे आता राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. न्यायालयीन लढाईत सरकारचा सहभाग असल्यास त्याचे उत्तर द्यावे. तसेच केंद्राकडे देण्यात आलेला वडनेरे समितीचा अहवाल चुकीचा असून त्याविरोधात सरकारने आवाज उठवावा. अन्यथा याच अहवालाच्या मागून कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवेल, अशी भीती विश्वजीत कदम यांनी व्यक्त केलीय.
तसेच या जनआंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने यावर चर्चा करण्यासाठी 21 मे 2025 रोजी मुंबईत विशेष बैठक आयोजित केल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे. सरकारने आजच्या आंदोलनाची दखल घेत चर्चा करण्यासाठी बुधवारी (21 मे) वेळ दिली आहे. तसेच या बैठकीसाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावण्यात आले असून, ही बैठक पुढील लढ्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. राज्य शासनाने आमची भुमिका कणखरपणे केंद्रासमोर मांडावी हीच अपेक्षा असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच खासदार धैर्यशील माने यांनी, या प्रश्नावरून कर्नाटक सरकारविरोधात तीव्र आंदोलन करावे लागले तरी आम्ही तयार असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या उंची वाढी वाढवू देणार नाही. गरज पडल्यास आपण धरणाच्या उंची वाढीच्या विरोधात केंद्रीय स्तरावर लढा उभारू असे म्हटलं आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी, कर्नाटक सरकारच्या या अडमुठ्या धोरणाविरोधात अलमट्टीत जाऊन आंदोलन करावे लागले तरी करू, पण आता माघार नाही असा निर्धार व्यक्त केला. तर पुढचे आंदोलन कोंगनोळी टोलनाक्यावर करू असेही ते म्हणाले.
मोठा बंदोबस्त
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर पोलिसांनी दोन्ही बाजूला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सांगली कडून जाणाऱ्या वाहनांना विष्णूअण्णा फळ मार्केट जवळच रोखण्यात येत होते. त्यामुळे पोलिस आणि आंदोलनास आलेल्या शेतकऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत होते.
नेत्यांकडून संताप
आंदोलकांची वाहने अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न होत असल्याने आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड यांच्यासह सर्व नेत्यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला.
आमदार अरुण लाड दुचाकीवरून आंदोलनास्थळी
आंदोलकांची वाहने अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याने वादाचे प्रसंग घडत होते. तर दोन्ही बाजूला वाहने अडवल्याने ट्रॅफिक जाम झाले होते. ज्यात विधान परिषदेचे आमदार अरुण लाड देखील अडकले. यामुळे त्यांनी थेट कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून आंदोलन स्थळी हजेरी लावली. तसेच पोलिसांकडून आंदोलकांची वाहने अडवली जात असल्यावरून आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.