

Solapur, 07 March : आजोबांनी रस्त्यावर बसून चपला शिवल्या...वडिलांनी वेटर म्हणून काम केलं आणि आई गिरणी कामगार म्हणून परिस्थितीशी झगडत राहिली. मातीत मळलेल्या लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मला राज्यसभेची उमेदवारी दिली. माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला उमेदवारी देऊन शिवसेनेत जातीपतीला थारा नाही, हे शिंदे यांनी दाखवून दिले आहे, अशी भावना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेकडून डॉ. ज्योती वाघमारे (Dr. Jyoti Waghmare) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज आल्याने वाघमारे यांच्यासह सात जणांची बिनविरोध निवड झाल्याचे मानले जात आहे. राज्यसभा खासदार झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात आलेल्या वाघमारे यांचे बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना वाघमारे यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.
त्या म्हणाल्या, आयुष्यातील 30-35 वर्षे या झोपडपट्टीत गेली, याच झाडाखाली बसून 10 वी ते पीएच.डी.चा अभ्यास केला. वडील नगरसेवक झाले तरी घरं मातीचं होतं. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एका झोपडपट्टीतील मुलीला राज्यसभेत काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते.
शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे हे महिला आघाडीला रणरागिणी म्हणायचे. शिवसैनिक हाच आमचा धर्म, हाच वारसा एकनाथ शिंदेंनी पुढे नेला आहे. गरीब मागासवर्गीय वस्तीत राहणाऱ्या मुलीला, गल्लीतल्या मुलीला दिल्लीपर्यंत नेण्याचं धाडस फक्त एकनाथ शिंदेंच करू शकतात. काही नेते आपल्या कुटुंबाला आपला पक्ष असतात, तर काही नेते आपल्या पक्षाला कुटुंब समजतात, असंही खासदार वाघमारे यांनी म्हटलं आहे.
त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराशिवाय आम्ही शून्य आहोत. बाबासाहेबानी शिका, संघटित व्हा आणि सांघर्ष करा, हा विचार माझ्या आई-वडिलांच्या मनात रुजला,म्हणूनच आम्ही गरिब वस्तीतील असूनसुद्धा मी संघर्ष करू शकले आणि खासदार होऊ शकले.
केवळ उमेदवारी दिल्यानंतर नाही, तर दसरा मेळावा असो किंवा वर्धापन दिन मी प्रत्येक व्यासपीठावर अभिमानाने सांगते, मै भीमराज की बेटी, मैं जय भीमवाली हू. ये रुतबा मेरे सर को संविधानसे मिला हैं, ये अधिकार और खासदार भी तेरे संविधान से मिला हैं, और जो जो मिला वो मुकदर से मिला, मुझे तो मुकद्दर भी संविधान से मिला हैं, अशा शब्दांत खासदार वाघमारे यांनी आंबेडकरांचे आभार मानले.
वाघमारे म्हणाल्या, सोलापूर ही माझी मायभूमी आहे, त्यामुळे माझ्या मायभूमीला नतमस्तक होण्यासाठी मी आलेय. सोलापूरकरांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, प्रत्येक भूमिकेत त्यांनी मला स्वीकारलेलं आहे. दिल्लीत गेल्यावरही मी सोलापूरला कधी विसरणार नाही, सोलापूरचा स्वाभिमान मी दिल्लीत मिरवेन.
मी राजकन्या नाही, संघर्षकन्या आहे. गरिब आई-बापाची पोरगी आहे. माझा बाप मोठा नाही, मी बंगल्यात राहणारी नाही, माझं घरं फाटकं आहे. वस्तीतला लोकांच्या कष्टची जाणीव मला आहे, प्रत्येक कष्टकऱ्याच्या प्रश्नाला मी दिल्ली दरबारी आवाज उठवेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.